|| समीर गायकवाड

लक्ष्मणआबाला जाऊन आठवडा लोटलेला कळलंही नाही. ऐंशी पार झाल्यानंतरही कमरेत जोर असलेला आबा अंगानं दांडगादुंडगा होता. त्याच्यामागची मोप माणसं काठय़ा टेकतच मसणात गेली, पण हा आपला ताठच होता. बत्तीशी बऱ्यापैकी शाबूत होती. नजरदेखील मारकुटय़ा बलागत घनघोर होती. पल्लेदार मिशीला पीळ देत फिरणारा आबा- आपण भलं नि आपलं काम भलं- या विचाराचा होता. गावकी, भावकी कशातच तो मधे पडत नसायचा. शेजारपाजाऱ्याशी मोजकं बोलून रामपारीच रानाच्या वाटंला लागायचा. राबराबून त्याच्या हाताला घट्टे पडलेले, दारं धरून धरून पायातल्या भेगांत मातीनं घर केलेलं! मोकार काम करून थकल्यावर लिंबाखाली बसून ढसाढसा पाणी पिताना त्याच्या नरडय़ाचा लोलक गटागटा हलायचा. घडीभर बूड टेकून झाल्यावर सदऱ्याचं हातुपं दुमडून डोईवर मुंडासं बांधून पुन्हा कामाला लागायचा. दिवसभर काम करून बी आबा दमायचा नाही. चरायला गेलेली गुरं गोठय़ात परतली की त्यांच्या भवताली रुंजी घालायचा. सांच्याला म्हशीच्या पायाशी खेटून बसून मांडीत चरवी धरून धारा काढून झाल्यावर, ताजं धारोष्ण दूध पिताना मिशांना दूध लागायचं तेव्हा आबा दिलखुलास हसायचा. धोतराच्या सोग्यानं मिशा पुसायचा. बलांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचा, विशड कुरवाळायचा, गळ्यातल्या मऊ पन्हाळीला हळुवार खाजवायचा. शेरडं, कोंबडय़ा त्याच्या पायात लुडबुड करायच्या. मग तो त्यांच्यावर लटकेच रागवायचा. आबाला कामाचा इतका सोस होता की रानात काम नसलं तर काम उकरून काढायचा. छत शाकारायचा. भिताडाला शाडूचा पोतेरा द्यायचा. खिसणी हातात घेऊन बलाला खसखसून अंघोळ घालायचा. पिकातलं तण काढायचा. कडब्याची गंज मोकळी करून पुन्हा नीटनेटकी करून रचायचा. अवजारं साफसूफ करून जागेवर ठेवून द्यायचा. काहीच काम नसलं की पिकलेल्या धान्याच्या राशी पोत्यातून मोकळ्या करायचा, त्याची स्वच्छता करून पुन्हा पोत्यात भरायचा! आबा रिकामा बसलेला कधी कुणी पाहिला नव्हता.

pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट
pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
dispute over agricultural land
कोल्हापूर: शेतजमीनीच्या वादातुन झालेल्या मारहाण आणी गोळीबार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

घराबाहेर पडलेला आबा पारापाशी गप्पा मारत उभा असल्याचं कधी पाहण्यात नव्हतं. कधी कुणाच्या भांडणात पडून त्यानं मध्यस्थी केली नव्हती, की कुणाला दोन टोले लगावले नव्हते. कुणाला शिव्या हासडल्या नव्हत्या. जिभेचा कासरा त्यानं कायम आवळून ठेवलेला होता. आबाची दुनियाच न्यारी होती. त्यात बायको मथुरा होती. जानकी, सावित्री, पार्वती या मुली होत्या आणि एकुलता एक पोरगा सदाशिव होता. पोरींची लग्नं होऊन त्यांना नातवंडे झाली होती. त्यांचं येणं-जाणं होताच आबा हरखून जायचा. सदाशिवलाही तीन मुली आणि एक पोरगाच झालेला. आबाचा जीव आपल्या नातींपेक्षा नातवावर म्हणजे संदीपानवर काकणभर जादाच होता. नातींच्या पाठीवर अंमळ उशिराने झालेला संदीपान हा आबाचा प्राण होता. त्या चिमुकल्यासाठीही आई-बापापेक्षा आज्जाच सगळं काही होता. पितळी घंगाळातून ‘हरहर गंगे बुडुशा’ असं म्हणत म्हणत गरम गरम पाण्यानं आबा त्याला सकाळीच अंघोळ घाली. त्याचं आवरून सावरून झालं की कडेवर घेऊन देवळात जाई. त्याला कडेवर घेतलं की मथुराबाई ओरडे, ‘‘आजूक कितींदी काखंत घेऊन फिरणार हायीसा? वीणा गळ्यात अडकवा म्हटलं की हिव भरतं, खांदं भरत्येत जणू. आन् आता वावभर लांब झाल्येला नातू गळ्यात गुतवताना रुतत न्हाई जणू!’’ तिनं असं म्हणताच आबाला हुरूप येई. संदीपानचा गालगुच्चा घेत तो खळखळून हसे, कराकरा वाजणारी पायताणं पायात सरकावत उंबरा ओलांडून तो बाहेर पडेदेखील. गोपीचंदन अष्टगंध भाळी लावून थाटात बाहेर पडणाऱ्या आज्जा-नातवाच्या जोडीवर मथुरा बेहद्द खूश असायची. एकसुरी आयुष्य जगत आपल्याच वर्तुळात रममाण झालेला आबा नातवामुळे जगण्याच्या नव्या परिघात रंगला होता. त्याला यात नवल वाटत नसायचं, पण हरखून गेलेलं गाव म्हणू लागलं की, ‘नातवाच्या सयीनं पिकलं पान नव्यानं तरारलं बुवा!’ नातवाला घेऊन मंदिरात जाणाऱ्या आबाला रामराम घातला की तो समोरच्याला थांबवे, संदीपानला सांगे की, ‘‘आपल्या नव्या आज्ज्याला रामराम घाला हो देवा!’’ आज्ज्यानं लाडात येऊन असं म्हटलं की ते गोड पोरगं त्याचे इवलेसे हात जोडून ‘लामलाम’चे बोबडे बोल बोले. मग आबाला उधाण येई. तो त्याचे गालगुच्चे घेण्याच्या बहाण्याने आपली मिशी त्याच्या गालावर घुमवे. आज्ज्याच्या मिशांनी गुदगुल्या होताच नातवास बहार येई. तो खुदूखुदू हसू लागे. ‘पोर लई गोड बुवा! असं म्हणत समोरचा मार्गस्थ होताच आबाची छाती फुलून येई. नातू बोबडं बोलतो म्हणून अलीकडे आबादेखील बोबडं बोलू लागला होता. त्याच्यासाठी घोडा होऊन गुडघ्यावर रांगू लागला होता. नातवाने धोतर ओलं केल्यावर फिदीफिदी हसत चक्क विनोद करू लागला होता. त्याची पुस्तकं वाचण्याचं निमित्त करून तोही अक्षरे गिरवू लागला होता.

अक्षरशत्रू असलेल्या आबाला त्याच्या वडिलांनी कधी शाळेत घातलेलं नव्हतं. मोलमजदुरी करून कष्टानं स्वत:चं शेतशिवार उभं करणाऱ्या आबाने घरादारासाठी खस्ता खाल्ल्या होत्या. मिसरूड फुटलं नव्हतं, पावलातला ओलावा ओसरला नव्हता तेव्हा त्यानं नांगराची पाळी धरलेली, मातीच्या ढेकळात आणि शेणामुतात त्यानं आपलं बालपण सडवलं होतं. एका अर्थाने तो आपल्या बापाचा भाऊ झाला होता, इतकी त्यानं मेहनत केली होती. आपल्यातला माणूस मारताना त्यानं स्वत:ला पोलादी चौकटीत चिणून घेतलेलं. पण नातवाने त्याचं विश्वच बदललं. त्याच्या हरवलेल्या बालपणातल्या चीजा तो आता शोधत होता. चालताना इकडंतिकडं बघत भवतालच्या जगाचा कानोसा घेत होता. कष्टाने पिकवलेल्या जुंधळ्याच्या राशीवर नातवाला लोळवताना त्या सोनेरी दाण्यांचा गंध त्याला नव्याने उमगत होता, तो परिमळ त्याला चराचराच्या नव्या व्याख्या शिकवत होता. बांधावर बसून नातवाच्या मऊ रेशमी जावळावरून हात फिरवताना आपल्या हाताचे घट्टे त्याला त्याच्या संघर्षांची नवी जाणीव करून देत होते.

नातवाला घेऊन शेतात येताच आबाला वेगळाच हुरूप येई. संदीपानला म्हशीच्या पाठीवर बसवताच ‘क्येसं टोचत्येत’ म्हणून तो विव्हळायचा मग लगेच आबा आपल्या मिशा म्हशीच्या पाठीवर घासायचा आणि म्हणायचा, ‘‘आता पुनिंदा बसून बगा वो बाळराजे, क्येसं टोचत्येत का!’’ त्यानं मान हलवताच आबा त्याला उचलून खांद्यावर बसवे. खांद्यावर सवारी घेऊन संपूर्ण शिवारात फेरी होई. आमराईत जाताच बारकाल्या झाडावर सूरपारंब्याचे लुटुपुटुचे डाव रंगताना आबा खोटंखोटं खाली पडायचा, निपचित व्हायचा. शांत पडलेल्या आज्ज्याला पाहून रडवेला झालेला संदीपान त्याच्या छातीवर डोकं टेकवून रडायचा, गाल ओढायचा, ‘उठा की आबा,’ म्हणत काकुळतीला यायचा. मग हळूच एक डोळा उघडत ‘भ्व्वा’ करत आबा नातवाला मिठीत घ्यायचा. दोघं मातीत लोळायचे. विहिरीलगत असलेल्या केळीच्या बागेत चोर-पोलीस खेळून दमायचे. दिवस मावळल्यावर दमलेल्या उन्हाच्या किरणांवर स्वार होऊन घरी परतायचे. शाळा सुरू झाल्यापासून संदीपानचं रोजचं शेतात येणं कमी झालं होतं. नित्यनेमाने शेतात येणारा आबा, संदीपान संगं आला नसला की त्यांच्या रोजच्या खेळण्या बागडण्याच्या जागी जाऊन बसायचा आणि एकटय़ानंच गालात हसायचा. आपल्या थकलेल्या धन्याला असं खुळ्यागत हसताना पाहून गडय़ांना बरं वाटायचं, कारण त्याचा हा रंग त्यांनी याआधी कधी पाहिलाच नव्हता. आबाला उतारवयात मिळालेलं सुख नियतीला पाहवलं नसावं.

दिवाळीच्या सुटीत केळीच्या बागेत चोर-पोलीस खेळायचं की आंधळी कोशिंबीर खेळायची यावरून आज्ज्या- नातवात लटका वाद होऊन टीवायएटी नातू जिंकला. त्यानं आज्ज्याच्या डोळ्याला रुमाल बांधला, ‘एकदोन साडेमाडेतीन’ म्हणत धूम ठोकली. काही क्षण थांबून आबानं डोळ्यावरचा रुमाल सरकवला, इकडंतिकडं पाहिलं तर संदीपान गायब! पावलांचा आवाज न करता त्यानं डाव सुरू ठेवला, पण बराच वेळ झाला तरी नातू दिसेना म्हटल्यावर त्यानं हाळ्या दिल्या, तरीही काहीच प्रतिसाद आला नाही. मग मात्र आबा घाबरला आणि ढांगा टाकत त्यानं संदीपानचा शोध सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच त्याचा शोध संपला तेव्हा तो धरणीला खिळून गेला. आबाला राज्य देऊन धावत आलेला संदीपान पाय घसरून विहिरीच्या कठडय़ावरून आत फेकला जाऊन, कडेला असलेल्या गुळवेलींच्या मांसल मुळांच्या बेचक्यांत अडकला आणि त्याच्या गळ्याला फास बसून विहिरीच्या कडेला लटकत होता!

त्या दिवसापासून आबाचं चतन्य हरपलं. तो भ्रमिष्ट झाला नाही, पण गोठून गेला. त्यानं स्वत:ला कोंडून घेतलं. ज्या विहिरीत पोरगा फासावर गेला ती विहीर बुजवण्याचं सदाशिवनं ठरवलं. दगडमातीचे ढिगारे रचले गेले. विहीर बुजवायच्या गोष्टी कानी पडताच मनाशी निश्चय करून दिवस मावळायच्या बेतात असताना, देवळात जाऊन येतो म्हणून आबाने शेताचा रस्ता धरला. नजरा चुकवत शेत गाठलं आणि आंधळी कोशिंबिरीचा राहिलेला डाव पुरा केला!

गळ्यात गुळवेलीची मुळं अडकवून, पाठीला भलामोठा दगड बांधून, डोळ्याला रुमाल बांधून त्यानं विहिरीत उडी घेतली. संदीपानच्या अकाली मृत्यूनंतर वस्तीवरचे गडी तेरावा होईपर्यंत सुटीवर गेलेले.  कुणाला काही पत्ताच लागला नाही. त्या रात्री विहिरीच्या पाण्यात आबा डोळे मिटून निपचित पडला तेव्हा त्याचा ओलाचिंब झालेला नातू त्याच्या छातीवर डोकं टेकून रडू लागला, गाल ओढू लागला, ‘उठा की आबा’चा धोशा त्यानं सुरू केला. आबानं ‘भ्व्वा’ केलं नाही. डोळ्यावरचा रुमाल काढून त्याला कडकडून मिठी मारली. त्यांचे अश्रू विहिरीत विरघळताच पाण्याला गहिवरून आलं.

sameerbapu@gmail.com