‘टाटा’ नावाची मोहिनी सर्वसाधारण भारतीयांच्या मनावर आजही कायम आहे. त्यांतही पुन्हा ‘जेआरडी’ या लघुरूपाभोवती तर कौतुक, आदर, अभिमान यांसारख्या भावभावनांचे वलय कोणाही माणसाच्या मनात वसत राहिलेले दिसते. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा असे संपूर्ण नाव कानावर पडले तर ऐकणारा कदाचित पहिल्यांदा दबकून जातो; परंतु त्याच भारदस्त नावाचे ‘जेआरडी टाटा’ हे लघुरूप उच्चारले की एकदम मनामध्ये जिव्हाळ्याचा कोंभ उगवतो. भांडवल, भांडवलशाही, भांडवलदार यांसारख्या संज्ञा-संकल्पनांची आपल्या देशातील राज्यकर्त्यांनाच केवळ नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकालाही अगदी खग्रास अॅलर्जी नसली तरी भांडवलदार, उद्योगपती या जमातीबाबत एक प्रकारची अविश्वासाची भावना व्यापक स्तरावर पूर्वापार नांदत आल्याचे वास्तव नाकारता न येणारे आहे. किंबहुना ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश भांडवल आणि भांडवलदार व्यापाऱ्यांनी एतद्देशीयांच्या स्वातंत्र्याच्या केलेल्या पायमल्लीच्या दारुण आठवणींचा तत्कालीन नेतृत्वाच्या मनावर असलेला प्रगाढ पगडाच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाही समाजवादाचे तत्त्वज्ञान व्यवहारात स्वीकारला जाण्यास बऱ्याच अंशी कारणीभूत असल्याचे विश्लेषण नंदन निलेकणींसारख्या उद्योजकानेही मांडलेले दिसते. असे असले तरीही, पंडित नेहरू यांच्यासारख्या द्रष्टय़ा आणि खंद्या राष्ट्रभक्त लोकाग्रणीचे जेआरडी टाटा यांच्याशी अतिशय मधुर असे स्नेहबंध होते, ही बाब नजरेआड करता येत नाही. राजकीय क्षेत्रातील धुरंधर, उद्योगविश्वातील मान्यवर, देशोदेशीचे उच्चभ्रू, अर्थतज्ज्ञ व अर्थप्रशासक यांच्यापासून ते थेट देशाच्या एखाद्या राज्यातील शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांपर्यंत सगळ्यांनाच आकर्षण वाटणाऱ्या जेआरडी टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वसामान्यांनाही अपार कुतूहल असते. देशाच्या उद्योगविश्वात तसेच समाजजीवनात अनेकानेक जबाबदाऱ्या पेलत असतानाच विविध स्तरांतील व्यक्तींशी पत्ररूपाने संवाद प्रस्थापित करण्याची असोशी विलक्षण जिव्हाळ्याने जपणाऱ्या जेआरडी टाटा यांनी लिहिलेल्या व त्यांना आलेल्या काही निवडक पत्रांचा मराठी अनुवाद आता पुस्तकरूपाने उपलब्ध झालेला असल्याने जेआरडींच्या समृद्ध आणि कार्यव्याप्त जीवनाचे अनेक वेधक कंगोरे आपल्या पुढय़ात उलगडतात.
थोडेथोडके नाही तर चांगले ८९ वर्षांचे आयुष्य जेआरडी टाटा यांना लाभले. या प्रदीर्घ आयुष्यात जेआरडींनी लिहिलेली तब्बल ४० हजार पत्रे टाटांच्या दप्तरात जपून ठेवलेली आहेत. टाटा उद्योगसमूहासारख्या आपल्या देशातील एका अग्रगण्य औद्योगिक घराण्याचे प्रमुखपद जेआरडींकडे जवळपास ५३ वर्ष होते. ती धुरा पेलत असतानाच एअर इंडियाचे अध्यक्षपद त्यांनी ३० वष्रे सांभाळले. यांशिवाय टाटांच्या कार्यविश्वातील अनेकानेक संशोधन संस्था, सरकारी समित्या, अभ्यासगट, समूहातील कंपन्यांच्या नित्याच्या तसेच वार्षकि सर्वसाधारण सभा अशांसारखी उद्भवणारी प्रसंगोपात्त कामे.. हा इतका सारा पसारा सांभाळून असा डोंगराएवढा पत्रव्यवहार जवळपास सहा दशके करणारे जेआरडी हे बहुधा एकमात्र उद्योगमहर्षी असावेत. या उदंड पत्रसंभारातील सुमारे ३०० वेचक पत्रांचा एक संपादित इंग्रजी ग्रंथ २००४ साली प्रकाशित झाला. तोच आता मराठी अवतारात वाचकांच्या पुढय़ात येत आहे, ही मोठी आनंदाची आणि उपकारक बाब होय. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित, वल्लभभाई पटेल, टी. टी. कृष्णम्माचारी, सी. राजगोपालाचारी, जयप्रकाश नारायण यांसारखे देशाच्या राजकीय पटलावरील दिग्गज; जॉन मथाई, पी. एन. हक्सर, एच. एम. पटेल, व्ही. के. आर. व्ही. राव, डॉ. माल्कम आदिशेषय्या यांच्यासारखे प्रशासक-अर्थप्रशासक, एअर इंडियाचे महाव्यवस्थापक व अन्य उच्चपदस्थ अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबई टेलिफोन्सचे महाव्यवस्थापक, भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे महासंचालक, मुंबईच्या वाहतूक नियमन शाखेचे प्रमुख.. यांसारख्या विविध क्षेत्रांतील महनीयांबरोबर जेआरडी टाटा यांनी वेळ व कारणपरत्वे केलेल्या पत्रव्यवहाराची झलक या ग्रंथाच्या पानोपानी शब्दबद्ध झालेली आहे. एखाद्या व्यक्तीला जीवनाच्या आणि लोकव्यवहाराच्या किती अंगांमध्ये प्रगल्भ रस असू शकतो याचे विलोभनीय दर्शन इथे वाचकाला घडते.
‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ ही शब्दसंहती आपल्या विचारविश्वात जेव्हा प्रवेशलीही नव्हती त्या काळात जेआरडी टाटा नावाचा एक समाजमनस्क उद्योजक त्याच भावनेमधून उद्योगांची उभारणी करत संपत्तिनिर्मितीला बांधीलकीच्या भावनेतून हातभार लावत होता, या वास्तवाची प्रचीती जेआरडींनी त्यांच्या अनेक पत्रांत व्यक्त केलेल्या भूमिकेच्या माध्यमातून वाचकाला सतत येत राहते; परंतु तरीही, ‘भौतिक स्वरूपाचं कोणतंही यश अथवा कर्तबगारी – ते न्याय्य आणि प्रामाणिक मार्गानी साध्य केलं असल्याखेरीज आणि त्यायोगे देशाच्या आणि देशवासीयांच्या गरजांची पूर्ती आणि देशहित साधलं गेलं असल्याखेरीज त्याचं काहीही मोल नाही’, हे कोलकाता येथील एका शाळेतील के. सी.भन्साळी नावाच्या शिक्षकाला १३ सप्टेंबर १९६५ रोजी पाठवलेल्या पत्रोत्तरात जेआरडींनी लिहिलेले वाक्य त्यांची उद्योगउभारणीमागील तत्त्वदृष्टी आणि बांधीलकी पुरेशी स्पष्ट करणारे आहे. तर त्याच पत्राच्या सुरुवातीस, ‘भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी स्वत:ला मिळालेल्या संधींचा सर्वतोपरी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केलेला माणूस’ असे स्वत:चे जे वर्णन जेआरडी करतात त्यांत त्यांच्या जीवननिष्ठेचा निखळ उद्गार सामावलेला आपल्याला सापडतो. केवळ इतकेच नाही, तर जेआरडींच्या व्यक्तिमत्त्वातील राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रोन्नतीसंदर्भातील बांधीलकीचाही प्रत्यय त्यांच्या या पत्रात येतो.
परंतु, जेआरडींच्या त्या राष्ट्रप्रेमाला संकुचित राष्ट्रवादाचे अस्तर कणभरही चिकटलेले नव्हते याचा प्रत्यय पुस्तकातील अनेक पत्रांमधून वाचकाला येतो. मुळात जेआरडींचा पिंडच आंतरराष्ट्रीयवादी होता, किंबहुना ‘मी वैश्विक आहे’, असे उद्गारही एका मित्रापाशी त्यांनी एकदा काढले होते. जेआरडींची आई फ्रेंच होती. जेआरडींचा जन्म झाला पॅरिसमध्ये. त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे शालेय शिक्षणही फ्रान्समध्येच झाले. त्यांच्या इंग्रजी बोलण्यात फ्रेंच भाषेची ढब जाणवे, असे जेआरडींचे भारतातील काही स्नेही सांगत असत. जेआरडी यांच्या पत्नी ब्रिटिश होत्या. ही कौटुंबिक पाश्र्वभूमी आणि पुढे व्यवसायानिमित्ताने जगभरात झालेला संचार आणि देशोदेशींच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वांशी प्रस्थापित झालेला निकट संपर्क यामुळे जेआरडींच्या व्यापक बनलेल्या जाणिवांचे आणि जीवनविषयक दृष्टीचे अनेक कवडसे पुस्तकातील पत्रांत आपल्याला सापडतात. २००९-१० या वर्षांसाठीच्या आकडेवारीनुसार टाटा उद्योगसमूहाच्या एकंदर उलाढालीपकी तब्बल ६५ टक्के उलाढाल ही टाटा समूहातील परंतु अन्य देशांत कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या योगदानातून निर्माण झालेली होती. या पाश्र्वभूमीवर, ‘‘टाटा उद्योगसमूहाचे वर्णन आपण कसे कराल?’’ असा प्रश्न जेआरडींनी ज्यांच्याकडे समूहाची धुरा सोपविली त्या रतन टाटा यांना पुढे एकदा विचारला गेला, त्या वेळी ‘भारतीय पाळेमुळे असलेला वैश्विक उद्योगसमूह असे टाटा समूहाचे वर्णन आपण करू,’’ असे रतन टाटा उत्तरले होते. स्वत:चे भारतीयत्व जपत असतानाच जाणिवांचा पस वैश्विक बनवणे हे टाटांच्या ‘डीएनए’तच असावे, हे जेआरडी आणि रतन टाटा यांच्या एकात्म प्रतिक्रियांवरून जाणवते. या प्रक्रियेचे विविध कण या पुस्तकात आपल्याला आढळतात.
जेआरडींच्या व्यक्तिमत्त्वदर्शनाबरोबरच हा पत्रसंग्रह आपल्याला सफर घडवून आणतो ती १९१३ ते १९९३ या संपूर्ण कालखंडाची. त्या अर्थाने हे पुस्तक म्हणजे समाजेतिहासाचे एक अव्वल साधन ठरते. समाजवादप्रधान अर्थव्यवस्थेकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे बाजारपेठप्रधान अर्थकारणापर्यंत हळूहळू घडत आलेले स्थित्यंतर जेआरडी यांनी त्यांच्या हयातीत पाहिले व अनुभवले. आíथक पुनर्रचनेच्या पाऊलखुणा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उमटण्याच्या बेतासच जेआरडींनी समूहाची सूत्रे रतन टाटा यांच्याकडे सुपूर्द केली; परंतु १९९१ साली झालेल्या बदलांची आवश्यकता जेआरडी त्याआधी कित्येक वष्रे पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, जगजीवनराम, रफी अहमद किडवई, पी. एन. हक्सर यांच्यासारख्या जाणकारांपुढे किती पोटतिडिकेने मांडत होते याचा आलेख या पुस्तकातील संबंधित पत्रांमध्ये चितारलेला सापडतो. खासगी उद्योग क्षेत्राला सापत्न वागणूक देण्याची शासनसंस्थेची मानसिकता उद्यमशीलतेला आणि नवसर्जनाला कशी मारक आहे याची गाथा पंडित नेहरू यांच्यापासून ते थेट १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या मोरारजी देसाई यांच्यापर्यंत जेआरडी सादर करत राहिले; परंतु शासनसंस्थेच्या अंतरंगात काहीही फरक कसा कधीच पडत नसतो याची प्रचीती, जनता पक्षाच्या कारकिर्दीत जेआरडींना ज्या पद्धतीने एअर इंडियाच्या अध्यक्षपदावरून दूर केले गेले त्यावरून आली. या प्रसंगानिमित्ताने तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारात व्यक्त होणारे जेआरडींचे भारदस्त व संयत व्यक्तिमत्त्व यात न्याहाळायला मिळते.
भाषेच्या वापराबाबत जेआरडी आयुष्यभर विलक्षण जागरूक होते. विलक्षण प्रगल्भ, सूक्ष्म आणि नर्म विनोदी शैली त्यांना उपजतच लाभली होती. इंग्लंडच्या धावत्या दौऱ्यावर १९४९ सालच्या एप्रिल महिन्यात निघालेले पंतप्रधान पंडित नेहरू उत्तम हापूस आंबे मिळवून देण्याबाबत एका पत्रान्वये जेआरडींना लिहितात. माऊंटबॅटन कुटुंबासाठी ते भेट द्यायचे असले तरी सामान जास्त वाढवायचे नसल्याने फार आंबे आणू नका, अशी पुस्तीही पंडितजी त्या पत्राला जोडतात. त्या पत्राला लिहिलेल्या उत्तरातील एक मार्मिक वाक्य जेआरडींच्या प्रसन्न विनोदाची लोभस झलक दाखविणारे आहे. ‘‘पंतप्रधानांसमवेत जाणारे आंबे खासंखास असल्याने त्यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू नसतो, त्यामुळे त्यांचे वजन काहीच नसते,’’ असा मोठा मासलेवाईक शेरा मारून जेआरडी पत्र संपवतात!
जेआरडींची ही पत्रे वाचणे हा आपल्याला समृद्ध बनवणारा अनुभव ठरतो. एका लोकविलक्षण आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात राहिल्याचे समाधान हे पुस्तक आपल्या पदरात घालते हे निश्चित.
‘जे.आर.डी. टाटा यांची पत्रे’ – संपादन – अरिवद माब्रो, मराठी अनु. सुप्रिया वकील, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – ५०९, मूल्य – ४५० रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2014 रोजी प्रकाशित
एक समृद्ध पत्रानुभव
‘टाटा’ नावाची मोहिनी सर्वसाधारण भारतीयांच्या मनावर आजही कायम आहे. त्यांतही पुन्हा ‘जेआरडी’ या लघुरूपाभोवती तर कौतुक, आदर, अभिमान यांसारख्या भावभावनांचे वलय कोणाही माणसाच्या मनात वसत राहिलेले दिसते.
First published on: 29-06-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A complete treasure of letter writing experience