प्रा. विजय तापसहिंदू धर्मव्यवस्थेतलं ‘शंकराचार्य’ हे सर्वोच्च पद असतं का? तसं ते आहे की नाही हे जाणून घेण्याएवढीही उत्सुकता माझ्यात आणि भोवतालच्या हिंदूंमध्ये मला कधी जाणवली नाही. तसं ते सर्वोच्च पद असेलही एखाद् वेळेस. (नक्की कळत नाही, कारण सामान्य हिंदूंचा शंकराचार्याशी संबंध आलाय/ येतो/ यावा असं कधीच काही घडत नाही, हे एक जसं कारण; तसंच कोणा शंकराचार्यानी कधी आपली भगवी महिरप सोडून अवघड काळात किंवा अवसेपुनवेला रयतेत रस घेतला आहे असंही कधी दृष्टीस आलेलं नाही.) पण तो काथ्याकूट आता नको. इथे मुद्दा असा की, पारंपरिक दृष्टीने पाहता देशातल्या एका शंकराचार्यानी ‘नाटक’ लिहावं म्हणजेच खरं तर महापाप नाही का? नाटकासारख्या एका ‘ताज्य’ आणि ‘उठवळ’ म्हणवल्या गेलेल्या कलाप्रकारात त्यांनी लक्ष घालावं, त्यात रस घ्यावा आणि प्रत्यक्षात स्वत: नाटक लिहावं म्हणजे तर पापाचा कळसच मानायला हवा. असलं पाप करण्याचं धाडस एखादे शंकराचार्य करतात तेव्हा नाटकावर प्रेम करणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य हिंदूंना आनंद झाल्याशिवाय कसा राहील?धारवाडातल्या कुर्तकोटी गावात जन्माला आलेल्या लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील यांनी नाटक लिहिण्याचं महापाप केलं आणि ते ग्रंथरूपात प्रकाशित करून मराठी जनांच्या हाती ठेवलं त्याला आता ९२ वर्ष झाली. या नाटकाचं शीर्षक आहे ‘गंगासंमति अथवा करणमान्यता’! लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील हे करवीर-संकेश्वर पीठाचे ‘शंकराचार्य’ झाल्यानंतर त्यांनी १९३० मध्ये ‘गंगासंमति अथवा करणमान्यता’ हे नाटक साकारलं. शंकराचार्य केवळ नाटक लिहूनच थांबले नाहीत, तर ते नाटक प्रयोगरूपात यावं यासाठीही त्यांनी जंग जंग प्रयत्न केले. गंमत म्हणजे प्रयोगाचे सर्व हक्क त्यांनी चक्क मठाकडे राखून ठेवले. मठाने नाटकाची उठाठेव करण्याची ही बहुधा एकमेव घटना असावी. नाटक प्रयोगांकित व्हावं यासाठी नाटककाराला मन:पूत आग्रह करण्यात सवाई गंधर्व आणि हिराबाई बडोदेकर हे स्थानी कंठसंगीतातले आदर्श गुंतले होते यातच नाटकाचं मोल लक्षात येण्यासारखं आहे. हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी ‘बालमोहन नाटक मंडळी’, ‘आनंद संगीत मंडळी’ आणि ‘नूतन संगीत विद्यालय नाटक मंडळी’ यांच्यात स्पर्धा लागली होती हेही विलक्षण म्हणता येईल. थोडक्यात काय, तर अत्यंत कुशाग्र आणि उच्चकोटीची बुद्धिमत्ता, अपूर्व प्रतिभाशक्ती, बहुभाषाप्रवीणत्व संपादन केलेल्या आणि अमेरिकन विद्यापीठाची पीएच. डी. पदवी मिळवलेल्या कुर्तकोटींनी करणाची आवश्यकता समाजापुढे मांडण्यासाठी नाटक या लोकमाध्यमाचा स्वीकार करण्यात स्वत:च्या आणि धर्माच्या फसव्या प्रतिष्ठेचा बाऊ केला नाही, हे महत्त्वाचं! त्यांच्या नाटक लिहिण्यानं नाटकाचीच प्रतिष्ठा वाढली, हे मात्र खरं! काय आहे बाबा ‘गंगासंमति अथवा हिंदूकरणमान्यता’ हा प्रकार? एका वाक्यात सांगायचं तर विविध कारणांनी हिंदू धर्माचा त्याग केलेल्या किंवा अन्य धर्मानी अत्याचार करून वा प्रलोभने दाखवून बाटवलेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेणं, त्यांचं हिंदूकरण घडवून आणणं- आजच्या परिभाषेनुसार ‘घरवापसी’ हा या नाटकाचा मुख्य विषय आहे. हा विषय मांडण्यासाठी शंकराचार्यानी इतिहासातल्या एका हिंदू-मुसलमान विवाहाची गोष्ट निवडली आहे. विख्यात संस्कृत पंडित जगन्नाथ आणि मोगल सम्राट अकबर याची मानलेली मुलगी लवंगी यांचा विवाह आणि त्या विवाहाला हिंदू आणि मुसलमान धर्मव्यवस्थेतल्या कट्टरपंथीयांनी केलेला विरोध हा या नाटकाचा मुख्य भाग आहे. या नाटकात गमतीचा भाग असा की, यातली कट्टरपंथी मुस्लीम पात्रे वगळता सर्व लहान-मोठी मुस्लीम पात्रे ‘हिंदू’ म्हणवून घेण्यासाठी जन्मजात हिंदूंनाही लाज वाटावी इतकी घायकुतीला आलेली दिसतात. आता शंकराचार्यानीच नाटक रचल्यावर ही पात्रं तशी वागली तर कोण काय म्हणू आणि करू शकणार आहे?आपण आता एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो, ती म्हणजे हे नाटक ब्रिटिशकाळात १९३० मध्ये जन्माला आलं. त्या काळात महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतातच ख्रिस्ती मिशनरी वर्गानं चांगलेच हातपाय पसरलेले होते. ऐच्छिक वा जोरजबरदस्तीच्या धर्मातराच्या वा बाटवण्याच्या घटना घडत होत्या. त्यावर मोठं रणकंदनही घडत होतं. मात्र, शंकराचार्यानी नाटक लिहिलं ते हिंदू-मुसलमान यांचा संबंध असणारं. तसं करणं त्यांना राजकीय कारणांसाठी सोयीचं वाटलं असावं. हिंदू-मुसलमान संघर्ष, शत्रुत्व आणि मुस्लीम राजवटीच्या दीर्घकाळात बाटवाबाटवीच्या घडलेल्या असंख्य घटना यामुळे नाटकातल्या प्रमेयाशी प्रेक्षक विनासायास सहमत होण्याची शक्यता मोठी होती. धर्मातर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेणं असो किंवा अन्य धर्मातल्या लोकांचं हिंदूकरण करणं असो; याच गोष्टी शंकराचार्य यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. आज २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यांची लोकसंख्या अनुक्रमे ७९. ८०, १४.२ आणि २.३ टक्के इतकी आहे. उलट, १९५१ मध्ये ९.८% असलेला मुस्लीम समाज २०११ मध्ये १४.२% झालेला दिसतो. १९५१ ते २०११ मधली हिंदूधर्मीयांची लोकसंख्या दर दशकात साधारण एका टक्क्याने घटताना दिसते. १९५१ मध्ये ८४.१% असणारा हिंदू समाज २०११ मध्ये ७९.८० % वर आलेला दिसतो. भारतात मुस्लीम सत्ता दीर्घकाळ राज्य करीत होत्या आणि हाती असलेल्या सत्तेच्या आधाराने त्यांनी विविध मार्गाचा अवलंब करून विपुल प्रमाणात हिंदुधर्मीयांचं मुस्लिमीकरण घडवून आणलं असं मानायला जागा आहे. याला उत्तर द्यायचं तर मुसलमानांचं किंवा बाटलेल्या हिंदूंचं नव्याने हिंदूकरण करणं मोलाचं ठरताना दिसतं. उदार धर्मवादी अकबराच्या मुलीचा उच्चविद्याविभूषित, वेदशास्त्र, पुराणे, धर्मशास्त्रनिपुण जगन्नाथ पंडितांशी विवाह लावून देणं नाटककार शंकराचार्याना निकडीचं वाटलं असेल यात शंका नाही. नाटकाच्या माध्यमातून हिंदूकरण चळवळीला किती यश आलं, बाटलेल्या पूर्वाश्रमीच्या किती हिंदूंना आपण परत हिंदू धर्मात आणू शकलो, ते माहिती नाही. मात्र एक खरं, की या नाटकामुळे हिंदूकरणाबद्दलची शंकराचार्याची भूमिका स्पष्ट झाली. असो.शंकराचार्याना नाटक संगीत नाटकाच्या वैभवशाली परंपरेत बसेल असं करावंसं वाटलं, कारण त्यांना ज्या वर्गाला ‘हिंदूकरणा’ची आवश्यकता पटवून देणं गरजेचं होतं, त्या वर्गाची अभिरुची ‘संगीत नाटका’ने पोसलेली होती. तेव्हा नाटकाचा विषय काहीही असला तरी त्यात पदांची चाळीशी बत्तीस रागांमधून रुमझुमताना ऐकू येते. या रागांत यमन, हमीर, बिहाग, दुर्गा, भीमपलास, बागेश्री, दुर्गा, पिलू , शंकराभरण, भैरवी, मांड, जोगीमांड, तोडी, मालकंस असे नेहमीचे राग आहेतच, पण त्यात मालगुंजी, मल्लारी, बरवा, सूरसारंग अशा रागांतल्या रचनाही आहेत. या गानमैफलीत एक पूर्ण संस्कृतातली रचना, एक फटका, दोन गजल आणि लावणी यांचीही भर पडली आहे. नाटकात गाण्यांची जशी सातत्यपूर्ण ये-जा आहे, तशीच पात्रांचीही आहे. चार अंकांत २३ पात्रांशी प्रेक्षकांचा संबंध येतो. पहिल्या अंकात सूत्रधार- नटी यांच्याशिवाय सहा पात्रं आहेत. हीच संख्या दुसऱ्या अंकात दहा, तिसऱ्यात दहा-बारा आणि चौथ्या अंकात दहा अशी आहे. त्यात पुन्हा विभागणी आहे ती हिंदू-मुस्लीम पात्रांची. यात कडवे धर्माभिमानी इमाम, मौलवी आहेत, जगन्नाथ पंडिताचा ध्यास घेऊन अन्नपाण्याचा त्याग करणारी लवंगी आणि तिची सखी गुलशन आहे, कट्टर हिंदूत्ववादी आणि नाटकाच्या पसाऱ्यात व्हिलन ठरणाऱ्या लंबोदर ब्राह्मणाची मुलगी गंगोत्री हिची मैत्रीण रोशन आहे, जणू दुसरा लंकापती रावणच भासावा असा हशमत इथे आहे, आणि अर्थातच बादशहा अकबर, जहांगीरही इथे आहेत. पहिला अंक हा प्रामुख्याने जगन्नाथ पंडित आणि लवंगी यांच्यातील हिंदू आणि मुस्लीम धर्मस्वरूपाची चर्चा करणारा जसा आहे, तसाच तो कर्मठ लंबोदर ब्राह्मण आणि तेवढाच कर्मठ मौलवी यांच्यातील संवादांचा आहे. जगन्नाथ पंडित ऊर्फ नाटककार शंकराचार्य युयूत्सु लवंगीला हिंदू धर्माचं स्वरूप समजावून सांगताना आणि तिला हिंदू धर्माकडे आकर्षित करताना दिसतात. ‘‘हिंदू होणे म्हणजे इस्लामचा त्याग करणे नसून त्याला वाढविणेच आहे.. संकुचित दृष्टीला विस्तृत करणेच आहे.’’ हे वाक्य लक्षात घेण्यासारखं जसं आहे, तशीच लवंगी, अकबर, जगन्नाथ यांची हिंदू धर्माचा महिमा कथन करणारी इतर विधानंही लक्षात घेतली की कुर्तकोटींचा मास्टर प्लॅन तंतोतंत लक्षात येतो. हे उद्गार बघा.. लवंगी म्हणते, ‘‘पंडितजी, आपले सर्व ऐकून हिंदू धर्मच काय तो धर्म आहे याची मला खात्रीच पटली आहे. आता मी मनाने हिंदूच झाले. आम्हा स्त्रियांच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे पतिसेवेपरता दुसरा नाही, हा माझा पूर्ण निश्चय झाला.’’ अकबर लवंगीशी बोलताना म्हणतो, ‘‘तू हिंदू झालीस तर त्यांत वाईट वाटण्याचे काय कारण? मीसुद्धा मनाने कधीच हिंदू झालो आहे. मोगल पादशाहीचा मुकूट डोक्यावर असल्यामुळे मला शरीराने हिंदू होता येत नाही.’’ या नाटकाच्या संदर्भात एक गोष्ट अशी की, इथे शंकराचार्य यांनी काळाची मोडतोड केली आहे. ज्या काळात- म्हणजे जहांगीरच्या काळात ज्या गोष्टी घडल्या, त्या धार्मिक उदारता अंगी असलेल्या अकबराच्या काळात घडल्या असं नाटककार दाखवतो. ही लिबर्टी घेण्यात राजकीय धूर्तता नाही असं कसं म्हणायचं? असं असल्यानेच दुसऱ्या अंकात अकबर पंडितजींना म्हणतो, ‘‘ पंडितजी, तुम्ही अहिंदूंना हिदू धर्माचे द्वार खुले करून दिलेत. हे तुमचे अनंत उपकार आजचा नसला तरी उद्याचा हिंदूस्थान कधीही विसरणार नाही. आपल्या या अमूल्य उपकाराबद्दल हा मोगल सम्राट तुमचा जन्मजन्मांतरीचा ऋणी राहील!’’ या नाटकात काही जोडय़ा लक्षणीय आहेत. लवंगी आणि सरदारकन्या गुलशन म्हणजे मैत्रीचा महामेरू. लंबोदराची मुलगी गंगोत्री ही रोशनची जीवलग. लंबोदर आणि मौलवी हे आपापल्या धर्माचे ठेकेदार. या जोडय़ा नाटकात विलक्षण घटना घडवून आणतात. नाटकातल्या धर्मचर्चेत हिंदू शास्त्री म्हणून ज्यांना कुर्तकोटी पेश करतात त्यांची नावे जेवढी दीर्घ आहेत तेवढा त्यांच्या बुद्धीचा पल्ला दीर्घ नाही. देवधुरंधर, सव्यसाची सारशास्त्री, अनंतशयन घनश्यामशास्त्री, लक्ष्मीरमण लक्ष्मणाग्रजशास्त्री, तांडवप्रिय राजचंडीश्वरशास्त्री आणि प्रचंडमारुताचार्य ही या पंडितांची नावं. हिंदूकरणाला विरोध करणाऱ्यांची थट्टा या नामकरणातून नाटककार करतो. नाटकाच्या अखेरच्या अंकात पूर्वाश्रमीची लवंगी जगन्नाथाशी विवाह झाल्यावर सौ. भामिनी झाली आहे. आणि तशी ती होताच तिची मानसिकता गडकऱ्यांच्या सिंधूची होऊन ती ‘मेड टू ऑर्डर’ सिंधूच झाली आहे. ती म्हणते, ‘‘पतीच्या पायाखेरीज आम्हां स्त्रियांना आनंदाचे स्थान दुसरे कोणते?’’ अगदी पुढच्या क्षणाला ‘कशी या त्यजू पदाला’च ऐकू येईल की काय अशीच एकूण सिच्युएशन! चौथ्या अंकातल्या तिसऱ्या प्रवेशात याच नवजात सिंधू ऊर्फ भामिनीला पळवून नेण्यासाठी हशमत हा सरदार येतो. तो प्रसंग म्हणजे जणू सीताहरणाचीच तंतोतंत नक्कल. परफेक्ट लागलेली रमीच ती! असो. नाटकाचं भरतवाक्य पाहिलं की नाटकाचा एकूण मतलब लक्षात येतो. ते शब्द आहेत-‘होवो अखिलभूमंडळी हिंदूधर्मप्रसार जयजयकार चिरकाल॥जो भरतभूवेदधर्मप्रभू, शंभू। तो लोकभूत्यर्थ वितरो कृपा अतुल॥’कुर्तकोटी शंकराचार्यानी नाटक ही एक सामर्थ्यवान ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून कशी बेमालूम वापरली हे तुमच्या लक्षात आलं असेलच! उगाच नाही लोकमान्य टिळकांनी त्यांना शंकराचार्य होण्याचा सल्ला दिला!vijaytapas@gmail.com