गणितज्ज्ञ मंगला नारळीकर

यांनी ८० वर्षांच्या आयुष्यात आपल्याकडील शहरी राहणीत अनेक बदल पाहिले, अनुभवले. तंत्रज्ञानाने जगणे सुकर केले. कामांचा व्याप-जाच कमी केला, पण त्यातून उरलेल्या वेळेचे लोक काय करीत आहेत?  शहर अणि गावातील  जगण्यातील असमानतेची व्यथा मांडणारा लेख.. 

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
diy best safe summer travel tips and tricks health tips for summer vacation
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग जाताना ‘या’ चार गोष्टी आठवणीने बरोबर घ्या
ow pressure water supply
दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

मी नेहमी मुंबईत राहत असले तरी दर सुट्टीत पुण्याला जात असे. तिथे भरपूर नातेवाईक होते. मुंबईतले घर त्यावेळच्या मोठय़ा व्हिन्सेंट रोडवरील जेस्ताराम बागेत होते. स्वतंत्र संडास- बाथरूम असणारे, एकूण दोन किंवा तीन खोल्या असणारे असे सगळे ब्लॉक होते. चार इमारतींना मिळून खाली मोकळी जागा, झाडे वगैरे असलेली होती. क्वचित एखाद्या घरात दोन किंवा तीन माणसे असली तरी बहुतेक घरात ५-७ किंवा जास्त माणसे राहत असत. आम्ही एखाद्या वेळी पुण्यातील जुन्या पद्धतीच्या घरात गेलो की शेणाने सारवलेली जमीन दिसत असे. पण मुंबईत सगळीकडे, अगदी चाळीतील मैत्रिणींच्या घरीदेखील जमिनीवर फरशी असे. स्वतंत्र असोत वा मजल्यावरच्या लोकांचे सामाईक संडास फ्लशचे असत. त्यामानाने पुण्यात जुन्या रस्त्यांवर, अगदी लक्ष्मी रस्त्यावरील घरांसाठीसुद्धा राहत्या घरापासून चार पावले दूर पाटीचे संडास मी पाहिल्याचे आठवते. ते साफ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी पहाटे येत. तुलनेने लहान शहरात फ्लशचे संडास आणखी उशिरा आले. पुण्यामुंबईच्या घरात नळातून स्वच्छ पाणी येत असे. लहान गावात विहिरीचे पाणी रहाट वापरून काढायचे व तेच प्यायला, इतर कामांना वापरायचे. आजी सांगत असे की, तिच्या लहानपणी म्हणजे अंदाजे १९०० ते १९१० च्या काळात, बायका कपडे धुवायला नदीवर नेत, येताना पिण्याच्या पाण्याची घागर भरून आणत. स्वयंपाकाच्या शेगडय़ांचेदेखील अनेक प्रकार पाहिले व वापरले आहेत.

कोळसा किंवा लाकडाच्या तुकडय़ांवर चालणाऱ्या शेगडय़ा, रॉकेलवर चालणारे स्टोव्ह, नंतर विजेवर चालणाऱ्या शेगडय़ा आणि आता सगळीकडे उपलब्ध असणाऱ्या गॅसच्या शेगडय़ा ही बरीच प्रगती झाली. प्रवासाच्या साधनांमध्ये किती बदल झाला ते पाहा. पुण्यात टांगे किंवा मुंबईत व्हिक्टोरिया असत त्या केव्हाच गेल्या. मोटार गाडय़ांची संख्या प्रचंड वाढली. पूर्वी फक्त खूप श्रीमंत माणसांच्या घरी मोटार असे. आता अनेक मध्यमवर्गीयांचे मोटारीशिवाय चालत नाही. पुणे सायकलींचे शहर होते, आता ते मोटार सायकलींचे शहर म्हणावे लागेल. संपर्क साधनांतील नवे अवतार तर जादूसारखेच भासतात. तरी आपण ते कौतुकाने वापरतो. १९४० च्या दशकात फोन अगदी कमी लोकांच्या घरी असत. १९७२ साली आम्ही केम्ब्रिजहून मुंबईत राहण्यास आलो, तेव्हा घरचा फोन मिळवण्यासाठी पाच वर्षे थांबावे लागेल, घरगुती वापरासाठी गॅस सििलडर मिळवण्यासाठीदेखील काही वर्षे थांबायचे, हे ऐकून आम्ही हादरलो होतो. अखेर चक्क वशिला लावून या गोष्टी मिळवल्या हे कबूल करते. आता या सगळय़ा सुखसोयी मध्यमवर्गीय लोकांना सहज उपलब्ध आहेत. फोन आणि इंटरनेट यांनी तर संपर्क क्षेत्रात केवढी क्रांती केली आहे. या सगळय़ा गोष्टी कशा घडल्या? विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानामुळेच ना? आणि ते आपण पाश्चात्त्य लोकांपासून शिकलो. यासाठी आभारपूर्वक धन्यवाद देण्यात कंजुषी का? या सगळय़ा बदलांत थोर भारतीय परंपरा आणि अध्यात्मातील प्रचंड प्रगती यांचा काही सहभाग आहे का? सतत या गोष्टींचा टेंभा मिरवला पाहिजे का? विविध कला, संगीत या गोष्टीत आपली प्रगती खूप होती. तिचा आपल्याला निश्चित अभिमान हवा. पण या गोष्टींचा प्रत्यक्ष जीवन सुलभ करण्यात फार उपयोग झालेला नाही. याउलट युरोपमधील फ्लॉरेन्स, प्राग, पॅरिस अशा शहरांत त्यांच्याकडे विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे म्युझियम पाहायला मिळतात. जीवन सुलभ करण्यासाठी, शारीरिक कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे ही त्या देशांची परंपरा आहे. आपल्याकडे दिल्लीमध्ये एक लोहस्तंभ आहे, त्यावर कधीही गंज चढत नाही हा त्याचा विशेष! पण तो कोणी, कसा बांधला ही माहिती गुप्तच. ज्ञान काही लोकांपुरतेच मर्यादित ठेवायचे हीदेखील आपली परंपरा.

सध्या तरी भारत आधुनिक तंत्रज्ञानाचा खरीददार असलेला दिसतो. जरा सोपे तंत्रज्ञान असेल, तर त्या वस्तू आपल्याकडे कमी खर्चात बनवून इतर देशात विकू शकतो. तेही महत्त्वाचे आहे, पण पुरेसे नाही. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील मोठाली अवजड यंत्रे, बांधकामासाठी लागणारी अवजड सामग्री, विमाने, मोठी संरक्षण सामग्री हे  आपण आयातच करतो. म्हणजे पुन्हा आपण ग्राहक असतो. आत्मनिर्भर होणे कुठे कुठे शक्य आहे, याचा अभ्यास करून त्याचा उपयोग व्हायला हवा. मोठाली मंदिरे, भव्य पुतळे बांधून खरोखर देशाची प्रगती होणार आहे का? चांगले काम करण्यासाठी स्फूर्ती या गोष्टींमधूनच मिळते का? त्यापेक्षा सर्वाना परवडतील अशी हॉस्पिटल्स, तंत्रज्ञान शिकवणारी विद्यालये, सगळय़ा मुलांना उपलब्ध होतील अशा चांगल्या शाळा, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत का? हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्याशास्त्राप्रमाणे व्यवस्थित नोंद ठेवणे हेदेखील औषधशास्त्रासाठी महत्त्वाचे, उपयोगाचे असते.

 रशियाच्या कम्युनिस्ट राजवटीखाली राहून स्वतंत्र झालेल्या देशात, रशियन प्रभावाने एक चांगली गोष्ट झालेली दिसते. या देशांत अनेक उत्तम वैद्यकीय शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. तेथे भारतातूनदेखील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात. आर्मेनिया, युक्रेन अशा अनेक देशांत हे दिसते. 

आधुनिक वैद्यकाने दिलेल्या महत्त्वाच्या धडय़ाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष असते. माणूस कोणत्याही धर्माचा, जातीचा, वंशाचा,अथवा देशाचा असेल तरी त्याचे शरीरशास्त्र सारखेच असते, निसर्गाने त्यात अशा कारणांमुळे भेदभाव केलेला नाही. तरी आम्ही आमचा जन्माधिष्ठित जाती-भेद विसरत नाही, तो ईश्वर निर्मित आहे अशीच वर्षांनुवर्षे शिकवण होती. काही जातींवर शतकांनुशतके अन्याय झालेला असला तरी जाती-भेद सोडायला समाज तयार नाही. राजा राममोहन रॉय यांनी चालू केलेल्या समाजसुधारणांच्या गाडीला अजून खूप प्रवास करायचा आहे. फुले- आंबेडकर यांच्या विचारांची अजून फार गरज आहे. 

तंत्रज्ञानामुळे जीवनात झालेल्या या सगळय़ा बदलांचा आरोग्यावर नेहमी चांगलाच परिणाम झाला असे नाही. स्वच्छता सोपी झाली, रोगराई कमी झाली, शारीरिक कष्ट कमी झाले, प्रवास सुलभ झाला हे मान्यच. पण शारीरिक व्यायाम कमी झाला, निसर्गाचे सान्निध्य कमी झाले, मोबाइलच्या अतिवापराचे दुष्परिणाम जाणवू लागले. तरी रोजचा व्यायाम हवा म्हणून मी विहिरीवरून पाण्याचे हंडे भरून आणणार नाही, मला नळातून येणारे स्वच्छ पाणी हवे, घरात वीज उपलब्ध हवी. या आता प्राथमिक मागण्या झाल्या आहेत. तरी त्या अजून अगदी लहान व सुदूरच्या लोकांना चैनीच्या गोष्टी आहेत, या प्रचंड असमानतेची खंत वाटते. विजेचे दिवे आल्यावर तेलाचे व रॉकेलचे दिवे सांभाळणे, त्यांची सफाई करणे, ही कामे कमी झाली. कपडे धुण्याची मशिने आल्यावर हाताने कपडे धुणे एकदम कमी झाले. वास्तविक मशीन कपडे धुण्यासाठी बरेच पाणी वापरते. हाताने धुताना जरा कमी पाण्यात काम करणे, त्याच साबणाच्या पाण्यात आणखी कपडे धुणे ही कामे करता येतात. कपडे खळबळण्यासाठी वापरलेले कमी साबणाचे पाणी सफ़ाईच्या इतर कामांसाठी वापरता येते. पण आपण तेवढा वेळ कपडे धुण्यासाठी देत नाही. सगळी कामे कमीत कमी श्रमात आणि झटपट व्हावीत असा आपला प्रयत्न असतो. यात अतिरेक होतो, शहरात पाणी जरुरीपेक्षा अधिक वाया जाते असे नेहमी वाटते.

एकूण शहरी मध्यमवर्गातील लोकांना नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली अनेक आवश्यक कामे सोपी, कमी वेळात करता येतात. त्यांच्या जवळ फुरसतीचा वेळ साठत राहतो. मग टीव्हीचे कार्यक्रम पाहणे, विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांना जाणे, खेळाचे सामने पहायला जाणे, मित्रमंडळीबरोबर खेळ खेळणे, मॉलमध्ये भटकणे, प्रवासाला जाणे इत्यादी गोष्टींना भरपूर वेळ देता येतो. त्यामानाने निसर्गसान्निध्यात भटकणे, संगीताचा आनंद घेणे, चांगली पुस्तके वाचणे हे छंद कमी जोपासले जातात. वर दिलेल्या सगळय़ा सुधारणा शहरात राहणारे, तुलनेने सधन लोक उपभोगतात. पण अजूनही दूरवरच्या लहान गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असते, हंडे घेऊन बायका पाण्यासाठी लांबवर जातात. हे वास्तव कसे सुधारेल? एकूण आपल्या देशात ही प्रचंड असमानता आहे, ती व्यथित करते. ती कशी दूर करता येईल?

mjnarlikar@gmail.com