सारिका चाटुफळे-कुलकर्णी

मी म्हटलं, ‘अगं, मी जाड होते आहे असं म्हणू नकोस. बाकीचे सगळे बारीक होत आहेत, असं म्हण.’ ती माझ्याकडे खुळ्यागत बघून निघून गेली. आता जर डॉलर सशक्त होतोय आणि रुपया घसरत नाहीये असं म्हटलेलं चालतं, तर मग हे का चालू नये?‘हर्षांचा वर्षांचा दिवाळसण आला..’ हे गाणं आकाशवाणीवर लागलं आणि लक्षात आलं, आली की दिवाळी! खरं तर मागचे वर्षभर महाराष्ट्रात एवढे फटाके वाजतायत, की खरी दिवाळी आली तरी वेगळी लक्षातच येत नाहीए.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Narendra modi
Vision 2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पुढच्या २५ वर्षांचं नियोजन, म्हणाले, “१५ लाखांहून अधिक…”
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी

दिवाळी हा सण साजरा केला जातो तो यासाठी, की प्रभू श्रीराम अयोध्येला पोहोचले आणि रयतेने त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ सर्वत्र दिवे लावून त्यांचे स्वागत केले. या सणाच्या निमित्ताने नुकतीच मला एका मित्राने लंकेतली सांगितलेली कथा आठवली. प्रभू श्रीराम सर्व वानरसेनेला घेऊन रावणाशी युद्ध करायला सज्ज होत होते. तितक्यात तिकडे रावणाच्या पक्षात बिभीषणाने गडबड केली. ‘तुम्ही रयतेला टाइम देत नाहीत आणि मलापण टाइम देत नाहीत!’ असं किरकोळ कारण सांगून त्याने रावणाशी युती तोडली आणि विरोधी पक्षाला- म्हणजे रामाला येऊन तो मिळाला. रावण खरं तर सात्विक, ‘शिव’भक्त होता. तो बोलला, ‘आपण असं काय पण केलेला नाय.’ तरीही बिभीषणाने ऐकले नाही. तो गेलाच. बरोबर आपले ४० अक्षौहिणी सैन्य घेऊन गेला. रावणाला अतीव दु:ख झालं. रावण ओरडला, ‘गद्दार.. गद्दार..’ त्यामागे रावणाची उरलीसुरली सेनासुद्धा ओरडली, ‘गद्दार.. गद्दार..’ समुद्राच्या पलीकडून प्रतिध्वनी आला- ‘खोके.. खोके..’ अजूनही लंकेतल्या जमिनीला कान लावले तर ‘गद्दार.. गद्दार, खोके.. खोके’ असा आवाज येतो, असे त्या मित्राने मला खात्रीलायकरीत्या गुप्तपणे सांगितले आहे.

सेनेचा हा आवाज एवढा मोठा होता की त्याने लक्ष्मणाला भोवळ आली. मला तर आतापर्यंत वाटायचे की, धनुष्यबाणातील ‘बाण’ लागून लक्ष्मण मूíच्छत झाला होता. पण माझी माहिती चुकीची निघाली. तर.. लक्ष्मण पडला. मग रामाने हनुमानाला संजीवनी आणण्याची आज्ञा केली. हनुमान गुवाहाटीकडे संजीवनी आणायला रवाना झाला. खरं तर आधी गुवाहाटी हे ठिकाण हिमालयात होते. पण बरेच लोक इतिहास बदलतात तसा भूगोलही बदलला गेल्यामुळे हल्ली नकाशात गुवाहाटी पूर्वेकडे दिसते आहे. इतकं लॉंग डिस्टन्स फ्लाय करणं अवघड वाटलं म्हणून हनुमानाने मध्ये सुरतेला स्टॉप घेतला. गुवाहाटीहून संजीवनी घेतली आणि रिटर्न जर्नीमध्ये जीवाचा गोवा करायला काही क्षण तो थांबला. या रिटर्न जर्नीमध्ये संजीवनी वनस्पती थोडीशी गोव्यात पडली. त्यामुळे त्यानंतर अमृत प्राशन करायला गोव्याला जायची पद्धत रूढ झाली.

तर आपल्या दिवाळी या सणाला इतका मोठा इतिहास आहे हे मला अशातच समजले.दिवाळी म्हटलं की काही समीकरणं अगदी पक्की असतात नाही! जसे की फराळ, फटाके, दिवे आणि पहाट. मला एका मैत्रिणीने विचारले, ‘मागची दोन र्वष शक्य नव्हतं. पण या वर्षी दिवाळी पहाटच्या रंगारंग कार्यक्रमाला येणार आहेस ना?’तिला म्हटलं, ‘बाई गं, शपथेवर सांगते- मला हल्ली पहाटेच्या कुठल्याही कार्यक्रमाची भीतीच वाटू लागली आहे. पण तरीही कार्यक्रम कोणाचा आहे त्यावर मी ठरवते- जायचं की नाही ते.’ती म्हणाली, ‘अगं, माझे मामा छान भाषण करतात. मामी छान गाते. त्यांचाच ठेवलाय कार्यक्रम.’आता ती जाहिरातच ‘मामा-मामीची दिवाळी पहाट’ अशी करतेय.

आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला परंपरा असणं गरजेचं असतं. तशी या दिवाळी पहाट कार्यक्रमालासुद्धा आहे. झालं काय, की एकदा तानसेन सकाळी उठला. त्याची कफ प्रवृत्ती असल्याने तो घसा खाकरू लागला. त्याचं घसा खाकरणं एवढं जोरात होतं की ते अकबराच्या महालापर्यंत ऐकू गेलं. सगळ्यांना वाटलं की, तानसेन भैरव राग गातोय. नेमकी ती दिवाळीची पहाट होती. त्यामुळे त्या दिवसापासून दिवाळीच्या पहाटे गाण्याचा कार्यक्रम करायची प्रथा पडली. पुढे उत्तर भारतात ही प्रथा लोप पावली. पण मला अभिमान वाटतो की महाराष्ट्राने मात्र ही प्रथा अजूनही जिवंत ठेवली आहे.तमाम लोकांना दिवाळी आवडण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे फराळ. ऑफिसमध्ये सगळ्यांनी मला विचारलं, ‘झाला का फराळ आणून?’ आधी लोक फराळ कोणी बनवला, ते ओळखायचे. पण हल्ली तो कुठून आणला, ते ओळखतात.मी सांगितलं, ‘नाही हो, होममेड आहे फराळ.’
फराळ काल ऑफिसमध्ये घेऊन आले तर सगळ्यांनी आवडीने खाल्ला. पण सुमी म्हणाली, ‘अगं, या करंज्या तर एकदम शलाकाकडच्या वाटताहेत.’
मी म्हटलं, ‘हो. तिच्याकडच्याच आहेत.’

सुमी- ‘काल तर म्हणालीस होममेड आहेत म्हणून.’
मी- ‘हो, तिने तिच्या घरीच बनवल्या आहेत ना!’
परवा भेटलेल्या एका मैत्रिणीने तर कहरच केला. खूप दिवसांनी भेटली होती. मला म्हणाली, ‘अगं, दिवाळीची एवढी कामं झाली. साफसफाई झाली. पण तू काही बारीक व्हायचं नावच घेत नाहीएस. जाडच होते आहेस दिवसेंदिवस.’
मी म्हटलं, ‘अगं, मी जाड होते आहे असं म्हणू नकोस. बाकीचे सगळे बारीक होत आहेत, असं म्हण.’ ती माझ्याकडे खुळ्यागत बघून निघून गेली. आता जर डॉलर सशक्त होतोय आणि रुपया घसरत नाहीये असं म्हटलेलं चालतं, तर हे का चालू नये?
दिवाळीचं वातावरण फार छान असतं. सगळीकडे छान दिवे लागलेले असतात. सोसायटी सजलेली असते. लहान मुलं तर उत्साहाने फटाके उडवत असतात. बऱ्याच जणांनी उत्साहाने किल्ला बनवायला घेतलाय. एकाच घरातील उदित आणि विनीतने वेगवेगळा किल्ला बनवलाय. आता त्यावर लावायच्या चित्रांसाठी भांडण चालू आहे. जुनी चित्रं कोणत्या किल्ल्यावर, हा वाद पेटलाय. मर्यादित चित्रांमधील कोणती चित्रं कोणाकडे असणार आणि किल्ल्याला नाव कुठलं द्यायचं, यावरून जाम वादंग चालू आहे. एक वेळ महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय चालू आहे त्यावर लवकर उपाय सापडेल, पण लहान मुलांनी एकदा नाही म्हटलं की मग त्यांचं भांडण सोडवणं अवघडच हो. माझ्या मते भांडण करू द्यावं. भांडण हे तर आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आता मला सांगा, भांडण झालं नसतं तर रामायण घडलं असतं का? किंवा महाभारत घडलं असतं का? २४ तास चालणारे बातम्यांचे चॅनेल्स चालले असते का? त्यामुळे अशी भांडणारी मुलं किंवा भांडणारी मोठी माणसं हे आपल्या संस्कृतीचे पाईक आहेत.

दिवाळीत मला सगळ्यात जास्त भाऊबीज आणि पाडवा आवडतो. चिकार ओवाळणी मिळते. अहोंनी मला विचारलं, ‘तुला पाडव्याला काय ओवाळणी देऊ?’
मी सांगितलं, ‘१५-२० किलो चांदीचं काहीतरी द्या. आपला काही मान आहे की नाही?’
त्या दिवशीपासून घरातील बातम्यांचं चॅनेल बंद आहे. दिवाळीसारखा सण आला की आपली परंपरा किती थोर, हे सगळीकडे ऐकायला मिळतं. काही लोकांचं म्हणणं आहे की, ही आपली दिशाभूल आहे. महागाई केवढी वाढली आहे! तेल, डाळी, भाज्या यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी राजकारणी परंपरा आणि संस्कृतीच्या गप्पा मारतात. पण भाव वाढतात, यात त्यांचा काय दोष? ते गरीब बिचारे इतक्या महागाईच्या काळात एवढे मेळावे वगैरे घेऊन आपली करमणूक करतात. त्यावर केवढा तरी खर्च करतात. आपल्याला त्याकरता करमणूक कर भरावा लागत नाही, हे आपलं नशीब म्हणावं लागेल की नाही? आमच्या मागच्या सोसायटीत तर आमदाराने दिवाळीचे दिवे फुकट वाटले आहेत. आता लोक विचारताहेत, ‘यातलं तेल कोण देणार?’ बघा आता.. किती कृतघ्न जनता आहे आपली! दहा रुपयांचे दिवे दिले, त्याची काही किंमतच नाही त्यांना. १०० रुपयांचं तेल कसलं मागताहेत?

माझी तर पक्की खात्री आहे की, महाराष्ट्रातील जनता पक्की विघ्नसंतोषी आहे. आता बघा- बाजार एवढा फुलला आहे.. रंगीबेरंगी आकाशदिवे सगळीकडे लागले आहेत. मांगल्य तर वातावरणात असं ठायी ठायी भरून राहिलंय. आणि इथल्या जनतेला कसला प्रश्न पडला आहे? तर- उपासमारीत भारताचा नंबर खालचा लागला! बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान हे देशही आपल्या पुढे गेलेत म्हणे. अरे, पण कुठले तरी देश मागे राहणार, कुठले पुढे जाणार. शिवाय उपासमारीसाठी सरकारला वेठीस धरण्याचं काय कारण? सरकार तर उपासमारी कमी करण्यासाठी किती पैसे खर्च करतंय. एका नगरसेवकांनी पाडवा मेळावा आयोजित केला आहे आणि तिथे कोणी उपाशी राहू नयेत म्हणून सगळ्यांना वडापाव देणार आहेत. एवढं सगळं फुकट देऊनही आपण जर सरकारला नावं ठेवणार असू, तर हे म्हणजे कोरसमधील सगळ्यांत मागच्या रांगेतील मुलगी चांगली नव्हती म्हणून सिनेमा फ्लॉप झाला अस म्हणण्यासारखं आहे.

मानवी विकास निर्देशांक, उपासमार निर्देशांक, आनंदी राहण्याचा निर्देशांक हे सगळं आपल्या देशासाठी नाहीच हो! आपले लोक मुळातच आशावादी आहेत. आजूबाजूला चाललेल्या खोल भयावह निराशेतही आशेचा दिवा लावणं आपल्या देशातील माणसाला माहिती आहे. अन्यथा वर्षांनुवर्षे तेच चाललेल्या आपल्या देशात दिवाळी हा फक्त नावापुरता सण बनून राहिला असता! महाराष्ट्रीयन माणूस तर उत्सवप्रियही आहे. म्हणूनच तर डगमगतं सरकार, राज्याबाहेर चाललेले प्रकल्प, महागाई, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, गरिबी, भूकबळी, भ्रष्टाचार या सगळ्या प्रश्नांच्या आपण दिवाळीच्या टिकल्या उडवाव्यात तशा टिकल्या उडवतो. आपल्या आतील आशेचा दिवा तेवत राहणं महत्त्वाचं. तो ज्या दिवशी विझेल, त्या दिवशी या सगळ्या प्रश्नांचा नरकासुर आपल्याला भस्मसात करेल, हे नक्की.

वर्तमानपत्रांतील जाहिराती, वेगवेगळी प्रदर्शनं, झेंडू आणि विविधरंगी फुलांनी फुललेली दुकानं, दोन-चार दिवसांचा म्हणून लावलेला वर्षभराचा सेल, ‘इको फ्रेंडली’ म्हणा किंवा बॉम्ब फोडणारी दिवाळी, रव्याचा लाडू की बेसनाचा लाडू, चकली चविष्ट की कडबोळी, नेत्यांनी राजकारण कसं करावं, हे सगळे आपल्या चर्चेचे विषय आहेत. आपण इतके निरागस आहोत म्हणा किंवा अल्पसंतुष्ट; पण विस्मृती आणि अल्पसंतुष्टता ही आपल्याला देणगी आहे. म्हणूनच धडाक्याने ही दिवाळी आपण साजरी करतोय. वर्षांनुवर्षे निराशेचा अंधार बाजूला सारून आशेचा दिवा लावायची ऊर्जा अशा प्रत्येक दिवाळीतून आपल्याला मिळो, हीच शुभकामना.

sarika@exponentialearning.in