अरुण पुराणिक

नितीन साळुंखे लिखित ‘मनोविकास प्रकाशन’चं ‘अज्ञात मुंबई’ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पुस्तकाबद्दलचं पहिलं कुतूहल चाळवलं गेलं ते शीर्षकामुळे. मुंबई शहरावर आजवर एवढं लिहिलं गेलंय, त्यात साळुंखेंना ‘अज्ञात’ काय वाटलं असावं आणि त्यांना ते इतरांना का सांगावंसं वाटलं असावं, या जिज्ञासेपोटी हे पुस्तक मी वाचायला घेतलं; आणि जस जसं वाचत गेलो तस तसं मुंबईची मला नव्यानं ओळख होऊ लागली.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

कोणत्याही ठिकाणाला असतो तसा मुंबईलाही स्वत:चा असा इतिहास आहे. शहराचा इतिहास म्हणजे तिथले रस्ते, तिथले पूल, तिथल्या वास्तू आणि वस्त्या यांच्या जडणघडणीचा प्रवास असतो. या अर्थाने मुंबईतल्या या प्रत्येक गोष्टीला मोठा इतिहास आहे. या गोष्टी सतत आपल्या नजरेसमोर असतात. त्या रस्त्यांवरून आपण अनेकदा जात-येत असतो. त्यातील कित्येक वास्तूंत आपण अनेकदा कामानिमित्त गेलेलो असतो; पण त्यांचा इतिहास आपल्याला माहीत नसतो. नितीन साळुंखे आपल्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकातून तोच इतिहास आपल्याला सांगू पाहतात.

दादरचा टिळक ब्रिज मुंबईतल्या आणि मुंबईबाहेरच्या कुणालाही टाळता येत नाही. त्या पुलाचा इतिहास म्हणजे तो पूल का बांधावा लागला, तो बांधताना काय काय अडचणी आल्या इथपासून ते त्याचं नामकरण करताना काय काय चर्चा झाल्या या गोष्टी साळुंखे फार उत्तम प्रकारे आणि संदर्भासहित उलगडून दाखवतात. हे पुस्तक वाचल्यानंतर दादरच्या टिळक पुलावरून जाणाऱ्या प्रत्येकाला त्या पुलाची नवीन ओळख होईल यात शंका नाही. अशाच अनेक वास्तू आणि वस्त्यांचा इतिहास साळुंखे यांनी आपल्या पुस्तकातून उलगडून दाखवला आहे.

साळुंखे यांनी मनोगतात म्हटलंय त्याप्रमाणे हा मुंबई शहराचा इतिहास नाही. त्यांची मुंबई शहराची व्याप्ती कुलाब्यापासून पश्चिम किनारपट्टीवर माहिम, तर पूर्व बाजूला सायन एवढय़ा भूभागावर वस(व)लेली मुख्य मुंबई एवढीच आहे. किंबहुना आजही मुख्य मुंबई एवढीच आहे. त्यात उपनगरांचा समावेश नाही. दक्षिणोत्तर पसरलेल्या या भूपट्टीवरील काही ठिकाणांचा हा इतिहास आहे, हेही साळुंखे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलंय. पुन्हा हे पुस्तक लिहून हातावेगळं करेपर्यंत जी माहिती त्यांच्यासमोर आली, तेवढीच त्यांनी या पुस्तकात घेतली आहे. तसं केलं नसतं तर हे पुस्तक समोर आलंच नसतं हेही साळुंखे त्यांच्या मनोगतात स्पष्ट करतात. हे त्यांनी सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कुठे  तरी थांबणं आवश्यक असतं.

या मुंबईकडे अनेक अंगांनी पाहता येतं. अनेक कोनांतून हे शहर वेगवेगळं दिसतं. त्याचा एक अनोखा पैलू साळुंखे यांच्या या पुस्तकात दिसतो. मुंबईवर अनेकांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. पुढेही लिहिली जातील. त्यातील प्रत्येक पुस्तक मुंबई शहराचं वेगवेगळं रूप उलगडून दाखवतं आणि दाखवेल. नितीन साळुंखे यांचं ‘अज्ञात मुंबई’ही त्याला अपवाद नाही.  नावाप्रमाणेच अज्ञात असलेली मुंबई ते आपल्या समोर आणतं.

या पुस्तकात एकूण वीस प्रकरणं आहेत आणि यातील प्रत्येक प्रकरण दीर्घ अभ्यासानंतर लिहिलेलं आहे हे त्या त्या प्रकरणाच्या शेवटी दिलेल्या संदर्भावरून लक्षात येतं. साळुंखे यांचं एक वेगळेपण म्हणजे, या पुस्तकात दिलेल्या अनेक प्रकरणांच्या अभ्यासासाठी ते त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत. तिथल्या लोकांशी त्यांनी चर्चा केलेली आहे. इतिहास घडला तो काळ आणि आताचा काळ यात भले काहीशे वर्षांचं अंतर असेल, पण घडलेल्या इतिहासाचे काही पुरावे त्या ठिकाणी मिळतात, हे तिथे गेल्यावरच समजतं. साळुंखे यांनी ती मेहनत केलेली आहे. हे एके ठिकाणी बसून लिहिलेलं पुस्तक नाही, हे मी नक्कीच सांगू शकतो. कारण त्यांच्या लेखनप्रवासाचा मीही एक साक्षीदार आहे.

मुंबईतल्या माहिममध्ये आपली राजधानी स्थापणारा िबब राजावर पहिली दोन प्रकरणं आहेत. आपण िबब राजाबद्दल ऐकून असतो; परंतु याच नावाचे दोन राजे होते आणि दोघांनीही माहिमवर राज्य केलं होतं, ही अज्ञात माहिती या पुस्तकात नव्यानेच मिळते. पुन्हा या दोघांचा राज्य करण्याचा कालावधी साळुंखे यांनी तपशीलवार मांडून दाखवला आहे.

पुस्तकातील पहिल्या दोन प्रकरणांतच पुस्तकाच्या वेगळेपणाची चुणूक मिळत जाते आणि ती पुस्तकाच्या शेवटपर्यंत तशीच राहते. आपल्या रोजच्या पाहण्यातली अनेक ठिकाणं या पुस्तकातून नव्यानं भेटतात. म्हणूनच या पुस्तकात दिलेल्या कथा वाचताना आपण त्यात गुंतून जातो.

रोजच्याच पाहण्यातल्या ठिकाणांचं साळुंखेंनी उलगडून दाखवलेलं वेगळेपण वाचताना, आपण ते वाचता वाचताच मनाने त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो व ते वेगळेपण पाहू लागतो. उदाहरण म्हणून ‘माहिमच्या कॉजवेवर लावलेला टोल’ हा विषय घेऊ. माहिम कॉजवेवर अनेकांनी लिहिलं असेल, पण त्यावर कधीकाळी, सर्व अटी धाब्यावर बसवून म्युनिसिपालिटीने टोल लावला होता आणि तो लावण्यासाठी कोणती डोकॅलिटी लावली होती, ही माहिती अगदी मुंबईच्या अभ्यासकालाही नवीन असेल. मग सामान्यांची तर बातच सोडा. ‘माजगाव’चं नाव कसं पडलं असावं, याचं साळुंखेंनी सोदाहरण मांडलेलं गृहीतक तर अचंबित करणारं आहे. अशा अनेक गोष्टी या पुस्तकात वाचाचला मिळतात.

पुस्तकाला जागतिक सिनेमाचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक अशोक राणे यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेत ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकाबद्दल जे म्हटलंय, त्यात जराही अतिशयोक्ती नाही, हे मी हे पुस्तक वाचल्यानंतर खात्रीने सांगू शकतो.

‘अज्ञात मुंबई’,- नितीन साळुंखे, मनोविकास प्रकाशन, पाने- २९६, किंमत- ४७५ रुपये.