सुजाता राणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रक्तगुलाब- काश्मिरी पंडितांची ससेहोलपट’ या आशीष कौल लिखित हिंदी कादंबरीचा (शब्दांकन : रमा राजेंद्र) मराठी अनुवाद छाया राजे यांनी केला आहे. शीर्षकच कादंबरीतील आशय व्यक्त करते. ‘ही कथा समर्पित आहे आतंक आणि दहशत सोसल्यानंतरही शांतता आणि माणुसकी यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला..’ या अर्पणपत्रिकेतून लेखकाचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. ही कादंबरी निर्वासित काश्मिरी पंडितांच्या वेदनेकडे सांप्रदायिक विद्वेषाचे साधन म्हणून न पाहता परिपक्वपणे, सहानुभवाने पाहण्याचा अनुभव वाचकांना देते. निवृत्त लष्करी अधिकारी जनरल जे. जे. सिंग यांनी लिहिलेले प्रास्ताविक- ‘This is an exemplary story that reaffirms my faith in the secular fabric of India…’ या त्यांच्या निरीक्षणाचा प्रत्यय कादंबरी वाचताना येतो. ‘वास्तविक पाहता न हरता सन्मानाने जगण्यासाठी क्षणोक्षणी झुंज देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही कथा आहे..’ हे लेखक आशीष कौल यांनी कादंबरीचे केलेले वर्णन कादंबरी वाचून पूर्ण होते तेव्हा निश्चितच सार्थ ठरते.

कादंबरी एकूण पाच प्रकरणांत विभागलेली आहे. पहिल्या प्रकरणात हिंदू-मुस्लिमांमध्ये भेद ओळखता येत असला तरी संस्कृती मात्र काश्मीर खोऱ्याची दिसत होती.. असा १९८९ मधील अनंतनाग आणि परिसरातील जनव्यवहार आपल्यासमोर येतो. कादंबरीतील प्रमुख पात्र अभिमन्यू, त्याचे वडील अभय प्रताप, आई आरती, अभिमन्यूचा जिवाभावाचा मित्र मुख्त्यार यांच्या अनुषंगाने काश्मीरमधला बदलता माहोल, नवरेह (काश्मिरी नववर्ष), कहवा, तेलव्योर इ. काश्मिरी पदार्थ इथपासून ते ४ जानेवारी १९९० पर्यंत हिंदूंना काश्मीर सोडून जायला सांगण्यासाठी हिंदूंच्या कत्तली, घरांची जाळपोळ, स्त्रियांवरील बलात्कार, बंदुकीच्या बळावर केली जाणारी झुंडशाही आदी अस्वस्थ करणारा कथाभाग या प्रकरणात येतो.

हेही वाचा >>> दलित पँथरचा ‘अधोरेखित’ इतिहास

‘ते अठ्ठेचाळीस तास’ या दुसऱ्या प्रकरणात दहशत, रानटीपणा, अविश्वासाचा प्रत्यय देणाऱ्या घटनांची मालिका अभिमन्यू आणि कुटुंबाच्या अनुषंगाने लेखकाने वास्तववादी पद्धतीने मांडली आहे. एका रात्रीत आपलं राहतं घर सोडून निर्वासित झाल्यामुळे शरणार्थी कॅम्पपर्यंत झालेला या कुटुंबाचा प्रवास यात येतो. कॅम्पमधील दुरवस्था, सरकारी यंत्रणेचा गलथान, असंवेदनशील कारभार, तिथले हाल आपल्या मुलाला भोगायला लागू नयेत म्हणून अभिमन्यूची पुढील शिक्षणासाठी पानिपतमध्ये त्याच्या आई-वडिलांनी केलेली रवानगी हा भाग या प्रकरणात येतो. अभिमन्यूची महाविद्यालयीन जीवनातील मैत्री, प्रेम या पार्श्वभूमीवर त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर झालेल्या चर्चामधून दिल्लीतील १९८४ मधील हिंदू-शीख दंगली, खलिस्तानचा प्रश्न इ. मुद्दय़ांचा ऊहापोह करणाऱ्या घटना-प्रसंगांची मालिका तिसऱ्या ‘हिरवाईचा खरा अर्थ’ या प्रकरणामध्ये येते. खलिस्तान चळवळीचा संदर्भ लक्षात घेऊन १९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या शीख आणि हिंदू यांच्यातील दंगलींच्या विदारक आठवणी हरजोत, जसप्रीत या पात्रांच्या भूतकाळातून उभ्या केल्या आहेत. काश्मीरसोबत पंजाब या सीमावर्ती राज्यामध्ये पाकिस्तानपुरस्कृत अस्थैर्याचे सतत केले जाणारे प्रयत्न लेखकाने कथानकात आणल्याने कादंबरीच्या आशयाचा पट व्यापक करण्यात लेखक यशस्वी होतो.

‘वोतलबुज’ या चौथ्या प्रकरणात अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते मुस्लीम लीग, खिलाफत चळवळ हा स्वातंत्र्यपूर्व भारतातील मुस्लीम समाजाच्या राजकीय संघटनांचा इतिहास येतो. काश्मीरमधील मुस्लीम राजवटीच्या काळापासून ते सिमला अ‍ॅक्टपर्यंत ऐतिहासिक आढावा वाचकांसमोर मांडण्यासाठी अभय प्रतापांच्या लेखांचा संदर्भ लेखकाने जाणीवपूर्वक योजला आहे. अभय प्रताप हे एका वर्तमानपत्राचे संपादक व काश्मीरमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. अभ्यासू, व्यासंगी, संतुलितपणे विचार करण्याची क्षमता असणारे. त्यांचे इतरांशी होणारे संवाद, वर्तमानपत्रात त्यांनी लिहिलेले लेख, संपादकीय यांतून त्यांचे काश्मीर व तिथल्या परिस्थितीबद्दलचे ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, संस्कृतिक इत्यादी अंगांनी मांडलेले अभ्यासपूर्ण विचार महत्त्वाचे ठरतात. नि:पक्षपातीपणे सरकारी धोरणांबद्दल आपली भूमिका मांडणाऱ्या, जीवन-मरणाच्या प्रसंगीही आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहणाऱ्या अभय प्रताप यांचे अभिमन्यूच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. या प्रकरणात मूळ मुस्लीम धर्मानुसार जिहादचा खरा अर्थ अभय प्रताप व अभिमन्यू यांच्या संवादातून उलगडला आहे. अभय प्रताप व अभिमन्यू यांच्यातले संवाद हे कृष्ण-अर्जुन यांच्यातील संवादाप्रमाणे असल्याचे रूपक लेखकाने कादंबरीत प्रभावीपणे वापरले आहे. एका जटिल, संवेदनशील राजकीय-सामाजिक प्रश्नाच्या अनुषंगाने येणारे महत्त्वाचे विषय त्यामुळे वाचकांना सहज समजू शकतील. शस्त्रांच्या बळावर चुकीच्या विचारसरणीने क्रूरपणे केलेले निरपराध जनतेचे शोषण, हत्याकांड आणि विस्थापन कधीही समर्थनीय ठरू शकत नाही. कथानकात आणलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्वासितांच्या प्रश्नांचा विचारही कादंबरीच्या मूळ आशयाला पूरक ठरताना दिसतो. 

हेही वाचा >>> दखल : शेतीविषयक उपयुक्त माहिती

समस्याग्रस्त परिस्थिती केंद्रस्थानी असणाऱ्या या कादंबरीला आदर्शवादाकडे झुकलेला नायक बहाल करून लेखकाने अर्पणपत्रिकेतील शांतता आणि माणुसकी या मूल्यांवर विश्वास दर्शवला आहे. अभिमन्यूचा ‘शंखनाद’ या अखेरच्या प्रकरणात झालेला कॅम्पमधील निर्वासित जनतेच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास आणि अभिमन्यूचे नेतृत्व यशस्वी होते की नाही, ते मुळातूनच वाचायला हवे.

एका रात्रीत आपलं सुखवस्तू राहतं घर सोडून निर्वासित झाल्यामुळे शरणार्थी बनलेल्या काश्मिरी पंडितांची कॅम्पमधील दर्दनाक कहाणी लेखक आशीष कौल यांनी कुठेही बटबटीत होऊ दिलेली नाही. त्यामुळे एका गंभीर विषयावरची ही जिवंत हाडामांसाच्या माणसांची कथा वाचकांना भावते. छाया राजे यांनी केलेल्या अनुवादात ओघवती भाषाशैली असल्यामुळे मूळ कादंबरीचा वाचनानुभव आपण घेऊ शकतो. उद्ध्वस्त झालेल्या गुलाबाच्या फुलाचे मुखपृष्ठ समर्पक आहे.

‘रक्तगुलाब : काश्मिरी पंडितांची ससेहोलपट’- आशीष कौल, अनुवाद- छाया राजे, राजहंस प्रकाशन, पाने- २९६, किंमत- ३३० रुपये. sujatarane31may@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review raktagulab by author ashisha koul zws
First published on: 25-09-2022 at 01:03 IST