प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

सत्यजित राय हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून आपल्या परिचयाचे आहेतच; पण ते उत्तम चित्रकारही होते. त्यांचे आजोबा ‘संदेश’ या नावाचं लहान मुलांचं मासिक चालवायचे. त्यांच्यानंतर सत्यजित यांचे वडील संपादक झाले. एक प्रकारे हे राय यांच्या कुटुंबाचं मासिक होतं. कारण त्यात त्यांच्या कितीतरी नातेवाईकांचे लेख, गोष्टी, कविता वगैरे असायच्या. स्वत: सत्यजित राय यांनी बऱ्याच उशिरा हे मासिक पुन्हा चालवायला घेतलं. त्यात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कविता, गोष्टींची भाषांतरं छापली. स्वत:ही गोष्टी लिहिल्या.  कविता किंवा गोष्टींसाठी भरपूर चित्रं काढली. राय यांची खासियत म्हणजे स्वत: लिहिलेल्या प्रत्येक कविता किंवा गोष्टीसाठी ते स्वत:च चित्र काढायचे. त्यांचा चित्रकलेचा हात इतका जबरदस्त होता, की ते भारतीय, युरोपियन, चिनी वगैरे कोणत्याही शैलीत चित्र काढायचे. एकदा त्यांनी एक कथा लिहिली. त्यात परग्रहावरून आलेला एक प्राणी आणि त्याच्यामुळे उडालेला पृथ्वीवरचा गोंधळ वगैरे वर्णन आहे. त्यासाठी त्यांनी संपूर्ण चित्रपटाची पटकथा लिहिली. काही कारणांनी ते प्रकरण हॉलीवूडपर्यंत जाऊन परत आलं. त्यानंतर आलेल्या स्पिलबर्गच्या ‘ई. टी.’ या चित्रपटातील परग्रहवासी व्यक्तिरेखा ही राय यांच्या पटकथेतील परग्रहावरच्या प्राण्याच्या चित्राशी हुबेहूब मिळतीजुळती होती.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

राय यांच्या चित्रपटांसाठी जी दृश्यं लिहिली जायची, त्यासाठी व्यक्तिरेखा, त्यांचे कपडे, कॅमेरा अँगल, पात्रांची उभे राहण्याची लकब वगैरेचं ते संपूर्ण रेखाटन करायचे. अशा हजारो पानांच्या स्टोरीबोर्डमध्ये सहज म्हणून ते काही अर्कचित्रंही काढायचे. कथांसाठी लागणारी विनोदी चित्रं तर ते काढायचेच, पण अर्कचित्र ही अवघड कलाही ते अधूनमधून हाताळायचे असं दिसतं. त्याचाच पुरावा म्हणून सोबत दिलीपकुमार आणि नर्गिस यांची त्यांनी काढलेली अर्कचित्रं पाहता येतील.

उत्तम चित्रकला हा सत्य राजू लक्ष्मीनारायण या मुलाचा विशेष गुण होता. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने तेलुगू लेखकांच्या गोष्टींसाठी चित्रं काढायला सुरुवात केली. पुढे त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं तरी चित्रांची ओढ कायम होती. ‘आंध्र पत्रिके’मध्ये राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी अनेक र्वष काम केलं आणि त्यासाठी त्यांनी नाव घेतलं.. ‘बापू’!

बापू हे नाव तेलुगू पत्रकारीता, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रामध्ये फार आदराने घेतलं जातं. हा आदर त्यांना चित्रकलेनं दिला. चित्रकलेचे सर्व प्रकार बापू यांनी अत्यंत समर्थपणे हाताळले आणि त्याचबरोबर एक अत्यंत यशस्वी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्यांनी नाव कमावलं. बापू यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरंच मोठं काम केलं आहे. माधुरी दीक्षित, मिथुन चक्रवर्ती, संजीवकुमार, विनोद मेहरा, पद्मिनी कोल्हापुरे, अनिल कपूर इत्यादींबरोबर त्यांनी अनेक चित्रपट केले. ‘वो सात दिन’, ‘मोहब्बतें’ आदी अनेक चित्रपट त्यांनी लिहिले आणि दिग्दर्शितही केले.

यासोबतच त्यांची पेंटिंगची प्रदर्शनंही सुरू होती. पुस्तकांसाठी रेखाटनं करणं, व्यंगचित्रं काढणं, अर्कचित्रं काढणं याचबरोबर पौराणिक विषयांवरची मोठमोठी चित्रं काढणं, पेंटिंग करणं हाही त्यांचा अत्यंत आवडता छंद होता. लंडन, अमेरिकेपर्यंत त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरली. चित्रपटासाठी स्वत:चे स्टोरीबोर्ड स्वत: तयार करणं ही त्यांची खासियत. त्यामुळे महत्त्वाच्या फ्रेम्स ते रेखाटून ठेवत. यातून कॅमेरा अँगल ठरवायला त्यांना सोपा पडत असे. मासिकांमधून हास्यचित्रं हा प्रकारही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर हाताळला. सोबतच्या त्यांच्या चित्रात एक अशीच गंमत आहे. समोर बसलेला तरुण फारच बेफिकिरीने बसलेला आहे. इतका, की आपले पाय समोरच्या माणसाच्या पायावर त्याने बिनधास्तपणे ठेवले आहेत. त्यामुळे वैतागलेला हा इकडचा इसम म्हणतोय, ‘‘हा तुझा पहिलाच इंटरव्ह्य़ू दिसतोय!’’

एकूणच- ‘चित्रकार आणि व्यंगचित्रकार असल्यामुळे मला चित्रपट माध्यम लवकर कळलं,’ असं ते म्हणतात.

मल्याळममधील एक अत्यंत महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शक म्हणजे जी. अरविंदन. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या चित्रपटांतून प्रामुख्याने सामाजिक भाष्य पाहायला मिळतं. सुरुवातीच्या काळात वनस्पतिशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर काय करायचं हे त्यांनाही कळत नव्हतं. केरळच्या रबर बोर्डमध्ये ते काही काळ नोकरी करत होते. परंतु चित्रकला, व्यंगचित्रकला, कॉमिक्स वगैरेमध्ये त्यांना प्रचंड रुची होती. एक दिवस ते ‘मातृभूमी’ या साप्ताहिकाच्या संपादकांना भेटले आणि त्यांनी आपण काढलेली काही कार्टून्स त्यांना दाखवली. ती पाहिल्यावर संपादकांनी एक वेगळाच विषय त्यांच्यासमोर मांडला. ते म्हणाले की, ‘फुटकळ व्यंगचित्रं काढण्यापेक्षा तुम्ही एखादी मोठी गोष्ट का लिहीत नाही? मासिकाच्या पानातलं एक पूर्ण पान तुम्ही घ्या. व्यंगचित्रातून सांगता येईल अशी गोष्ट सांगा. ही गोष्ट पुढे चालू राहील आणि त्यातील पात्रंही तीच राहतील.’ अरविंदन यांनी या कल्पनेला तत्काळ दुजोरा दिला आणि मल्याळम वृत्तपत्रसृष्टीतला एक चमत्कार सुरू झाला.

‘छोटे लोक, मोठे जग’ अशा आशयाचं नाव असलेल्या या मालिकेला सुरुवात झाली. त्यात रामू नावाचा एक बेरोजगार युवक हे मुख्य पात्र. त्याच्या आजूबाजूला अनेक पात्रं आणि काही प्रसंग. प्रत्येक आठवडय़ाला वेगळं काहीतरी. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास बारा र्वष अरविंदन हे मल्याळममधलं ‘ग्राफिक नॉव्हेल’ चितारत होते. यातूनच त्यांना एक दिवस चित्रपटसृष्टीकडे जाण्याची वाट सापडली आणि ते त्या सृष्टीत जाऊन मोठं काम करू शकले. अरविंदनसुद्धा स्वत:चा स्टोरीबोर्ड स्वत: करायचे. कॅमेरा अँगल आणि विविध पात्रं यांची स्केचेस अगोदरच करून ठेवायचे. चित्रपट पाहत असताना त्यातली काही कॅरेक्टर्स ही त्यांच्या या कॉमिक्समधून चालत थेट चित्रपटांमध्ये आली आहेत की काय असं वाटावं इतक्या या दोन्ही गोष्टी एकमेकांत मिसळून गेल्या होत्या.

सोबत त्यांचं स्वत:चं अर्कचित्र आणि त्यांच्या एका सिनेमातील पात्रांची रेखाटनं..

‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ इत्यादी हिंदी चित्रपटांमुळे सर्वाना परिचित असलेले बासू चॅटर्जी हे एक उत्तम राजकीय व्यंगचित्रकार होते हे सांगूनही खरे वाटणार नाही. वडील रेल्वेत. बालपण मथुरेला. लहानपणी ‘हिंदुस्थान टाइम्स’मधील व्यंगचित्रं ते खूप वेळ पाहत बसायचे. चित्रकला विषय इतका आवडीचा होता, की मॅट्रिकला मुद्दाम चित्रकला हा विषय त्यांनी घेतला. नंतर आग्य्राहून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यावर नोकरी शोधण्यासाठी ते मुंबईत आले आणि मिलिटरी स्कूलमध्ये नोकरीही मिळाली.

डावी विचारसरणी, राजकारणाची आवड आणि चित्रकलेचा छंद यामुळे एके दिवशी त्यांनी एक व्यंगचित्र काढलं आणि ते सहज म्हणून करंजिया यांच्या ‘करंट’ साप्ताहिकाकडे पाठवून दिलं. आश्चर्य म्हणजे ते प्रसिद्धही झालं. १९४९ सालची ही गोष्ट. त्यामुळे ते पुढे उत्साहाने अधिकाधिक व्यंगचित्रं काढू लागले आणि ती नियमितपणे प्रसिद्धही  होऊ लागली. या काळात बासू चॅटर्जी हे शंकर, लक्ष्मण, ठाकरे, कुट्टी यांच्या व्यंगचित्रांचा अभ्यास करायचे.

जवळपास १९ र्वष ते ‘करंट’, ‘ब्लिट्झ’ इत्यादी नियतकालिकांमध्ये राजकीय व्यंगचित्रं काढत होते. पुढे त्यांनी क्षेत्र बदललं. ब्रशऐवजी हातात पेन आणि कॅमेरा आला. सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन सुरू झालं. पण या व्यंगचित्रकलेचा त्यांना चित्रपट माध्यमामध्ये खूप उपयोग झाला. एखादा विनोदी किंवा हलकाफुलका प्रसंग लिहायचा असेल तर विनोदबुद्धी आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती यामुळे त्यांना ते खूप सोपं जायचं. ‘रजनी’ (मुख्य भूमिका- प्रिया तेंडुलकर) ही दूरदर्शनवरची मालिका करताना त्यांना हा मध्यमवर्गीय दृष्टिकोन आणि राजकीय व्यंगचित्रांमधून येणारी व्यवस्थेबद्दलची समज हे खूप उपयोगी पडलं. सोबतचं हे त्यांचं व्यंगचित्र कदाचित आजही लागू पडेल. निवडणूक हरलेल्यांना एखादं राज्यपालपद  किंवा अध्यक्षपद वगैरे दिलं जातं, या गृहितकावर आधारित हे व्यंगचित्र आहे. इच्छुकांच्या या मेळाव्यात एखादा चपराशीही आपली वर्णी लागेल का, हे आजमावतोय.

असे हे आगळेवेगळे, यशस्वी आणि वेगळा दृष्टिकोन देणारे चार प्रांतांतील चार भाषांतून काम करणारे चित्रपट दिग्दर्शक- ज्यांच्या  करिअरला व्यंगचित्रकलेचा स्पर्श झालेला आहे.