डॉ. वसुधा कामत
‘‘पुणे विश्वविद्यालयाच्या एम. ए.चा रिझल्ट लागण्यापूर्वी माझी नेमणूक अहमदनगरच्या कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून झाली. वर्गात गेल्यावर लक्षात आले की वर्ग लहान आहे. केवळ १०-१५ च विद्यार्थी आहेत. ते सारे माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि नोकरी करत असलेले. त्यांना शिकवायचे काय आणि कसे? मग ठरवले, विद्यार्थ्यांना कमी लेखायचे नाही. त्यांना सहकारी मानायचे. विद्यापीठाने नेमलेली पुस्तके आपण वाचून काढायची, पण त्यातला आशय पाठशाळेप्रमाणे व्याख्यान देऊन न शिकवता चर्चा करून गटागटाने समजावून देण्याचा प्रयत्न करायचा. ही पद्धत विद्यार्थ्यांना खूप आवडली, कारण या पद्धतीत त्यांच्या विचाराला पूर्ण वाव होता.’’(गुंजारव, २०१८)
हे उद्धृत आहे भारतीय शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे जनक म्हणून प्रसिद्ध पावलेले डॉ. शरदचंद्र कुलकर्णी यांचे. हयातभर त्यांनी अध्ययन परिणामकारक करण्यासाठी, नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विद्यार्थीकेंद्रित पद्धती निर्माण करून त्याच्या वापरावर भर दिला. या पद्धतीमुळे विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत आनंदाने सहभागी होतो, स्वअध्ययन करताना इतरांच्या विचारांना मान देतो.
हे वर्ष होते १९४९. त्यानंतरची नऊ वर्षे त्यांनी अहमदनगर, मुंबई, कोल्हापूर येथील महाविद्यालयांत अध्यापन केले. या काळात त्यांनी कायद्याची पदवीही मिळविली. आपल्या विद्यापीठांतून तेव्हा कला शाखेतील पदवी अभ्यासामध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र, सांख्यिकी ( Statistics) असे विषय शिकविले जात नसत (तत्त्वज्ञान या विषयांतर्गत मानसशास्त्र हा विषय शिकविला जात असे.) त्यांना शास्त्रीय संशोधन पद्धतीचा सांगोपांग अभ्यास करायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १९५८ साली अमेरिकेतील पर्दू ( purdue) विश्वविद्यालयात प्रवेश मिळविला. तेथे सांख्यिकी विषयांत पीएच.डी पदवीही अडीच वर्षांत मिळविली. मानसशास्त्रात अनेक नवीन विचार शिकायला मिळाले, संशोधन करता आले, इतर नव्याने संशोधन होत असलेल्या मानसशास्त्रीय पद्धतींचा अभ्यास करता आला. त्या वेळी डॉ. बी. एफ. स्कीनर यांची मानसशास्त्रीय पद्धती Operant Conditioning या नावाने ओळखली जात होती. तिचाच पुढे Programmed Instruction या नावाने प्रसार झाला. पीएच.डी प्राप्त झाल्यावर त्यांना ETS ( Educational Testing Services) या संस्थेत संशोधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि Programmed Instruction या तंत्रज्ञानाचे मूल्यमापन करण्याचा प्रकल्प मिळाला. या प्रकल्पाबरोबरच अन्य शिक्षण पद्धतींवर त्यांनी संशोधन सुरू केले. मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि त्यातील मोजमापे ( Measurement) यावर त्यांचा भर होता.
रशियाने अमेरिकेच्या आधी १९५७ मध्ये आपले ‘स्पुटनिक’ अंतराळयान अवकाशात पाठविले. यामुळे अमेरिकनांना खूपच मोठा धक्का बसला होता. (अमेरिकेने आपला एक्सप्लोरर-१ हा उपग्रह १९५८ मध्ये सोडला.) खूप खळबळ माजली. अभ्यासक्रमात बदल केले गेले. अध्यापन पद्धतींचा नव्याने विचार होऊ लागला होता. अभ्यासक्रमातील कोणते बदल योग्य दिशेने होत आहेत व अधिक परिणामकारक आहेत हे तपासण्याचे काम ‘ईटीएस’ करीत होती. डॉ. कुलकर्णींना या प्रकल्पामध्येही काम करण्याची संधी मिळाली. ही खऱ्या अर्थाने पुढील आयुष्यातील या क्षेत्रातील उत्तुंग कार्याची पायाभरणी होती.
भारत सरकारने १९६१ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) स्थापना केली होती. आपल्या देशाला योग्य ठरू शकतील अशा शिक्षण प्रणालींची निर्मिती, शिक्षकांना प्रशिक्षण, तसेच शिक्षणातील समस्या शोधून त्यांचे निराकरण ही या संस्थेची उद्दिष्टे होती. १९६२ मध्ये भारतात परतल्यावर त्यांना एनसीईआरटीमध्ये मानस मापनशास्त्राचा ( Psychometry) विभागप्रमुख म्हणून आमंत्रित करण्यात आले.
१९६४-६६ मध्ये कोठारी शिक्षण आयोगाच्या कार्यातही आयोगाचे कार्यवाह जे. पी. नाईक यांच्याबरोबर त्यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. १९६६ साली कोठारी आयोगाच्या अहवालामुळे शिक्षण अध्यापनकेंद्रित नसावे, तर अध्ययनकेंद्रित असावे हा विचार अतिशय समर्थपणे पुढे आला.
१९६५ मध्ये त्यांनी शिक्षकांचे, शिक्षक प्रशिक्षणाचे कृतिसत्र आयोजित केले. त्यात एकूण शिकविण्याच्या पद्धतींवर चर्चा झाली. त्यात असे ठरले की दुर्बोध, कंटाळवाणी भाषणे देण्याचे काहीही कारण नाही. विद्यार्थ्यांना समजेल आणि प्रत्यक्ष अनुभव घेता येतील याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. शिक्षकाने ठरवून दिलेल्या पाठांतरापेक्षा मुलांनी आवडीने केलेले स्वयंअध्ययन अधिक प्रभावी असते. हे सर्व नवीन विचारप्रवाह शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. कुलकर्णी कृतीसत्रांचा अध्यापन पद्धती म्हणून वापर करीत. ही नवी विचारसरणी देशभर पोहोचविण्यासाठी डॉ. कुलकर्णींनी समविचारी प्राध्यापकांबरोबर १९६५मध्ये Indian Association for Programmed Learning ( IAPL) ही संस्था स्थापन केली. डॉ. कुलकर्णींनी भारतभर कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले आणि ते सर्व शिलेदार आजही या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे जनक अशी सार्थ उपाधी मिळाली.
राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था आणि…
१९६० च्या दशकात बँका शहरांमध्ये आपल्या शाखांचे जाळे विणीत होत्या. १९६८ मध्ये इंदिराजींच्या शासनकाळात बँकांचा लाभ ग्रामीण जीवनाला कसा करून देता येईल यावर विचार चालू होता. डॉ. विश्वनाथ पाणंदीकर (पंतप्रधानांचे सल्लागार) यांनी त्यांचा अहवाल सादर केला होता. श्रीमती इंदिरा गांधींनी १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. हे नवीन धोरण बँकांना समजावून देण्यासाठी NIBM ची स्थापना केली गेली. हे नवीन धोरण बँकांना समजावून देण्यासाठी NIBM ची स्थापना केली गेली. हे नवीन धोरण बँकांना समजावून देण्यासाठी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था ( NIBM) ची स्थापना केली गेली. ग्रामीण भागात हजारो बँका उघडायच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांना ग्रामीण पातळीवर बँका कशा चालवायच्या हे शिकवायचे हा मोठा उपक्रम होता. त्यासाठी डॉ. पाणंदीकर आणि त्या वेळचे NIBM चे संचालक डॉ. मेहता यांनी डॉ. कुलकर्णींना अहवाल तयार करण्याची विनंती केली. बँकांच्या अधिकाऱ्यांना भेटून, प्रत्यक्ष ट्रेनिंगचे काम पाहून, कर्मचारी, अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी अहवाल तयार केला. त्यावर कार्यवाही करण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनीच घ्यावी असा आग्रह डॉ. पाणंदीकर आणि डॉ. मेहता यांनी धरला. मग १९७१ मध्ये NCERT मधून ते मुंबईस्थित NIBM मध्ये संस्थापक सदस्य म्हणून रुजू झाले. तिथे त्यांच्या कामांचे तीन विभाग होते- बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांची उद्दिष्टांनुसार निवड, बँकेतील कामे विशेषत: ग्रामीण भागातील कामे करण्याची आवड निर्माण करण्यावर भर आणि कर्मचारी आणि अधिकारी संघटनांच्या नेत्यांबरोबर संबंधांत वाढ. या तीनही कामांसाठी त्यांनी विशेष पद्धती शोधून काढल्या, त्यांचा वापर करून परिणामकारकता सिद्ध केली.
कर्मचारी निवडीसाठी परिणामकारक चाचण्या त्यांनी तयार केल्या. अनेक बँकांनी आपल्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला या पद्धतीचा वापर करून निवड तसेच प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. केवळ बँकाच नाहीत तर LIC आयुर्विमा मंडळ, शासनाचा आयकर विभाग यांसारख्या इतर राष्ट्रीय संस्थांनीही NIBM कडे त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या निवड पद्धतीसाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी मागणी केली. त्यामुळे NIBM चा व्याप वाढला आणि केवळ या दोन कामांसाठीच नवी संस्था उभारण्याची गरज भासू लागली. त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्याने अशी वेगळी संस्था १९८४ मध्ये सुरू केली आणि तिचे नाव Institute of Banking Personnel Selection ( IBPS) असे ठेवले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान
१९६२ सालीच NCERT मध्ये त्यांच्या programmed learning मधील राष्ट्रव्यापी प्रकल्प पाहून त्यांना बर्लिनमधून परिषदेला आमंत्रित केले होते. १९६६ पासून युनेस्कोच्या बँकॉकमधील विभागीय कार्यालयाकडून त्यांना कार्यशाळा घेण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. श्रीलंका, मलेशिया, थायलंड, फिलिपाइन्स दक्षिण कोरिया आणि अशा अनेक देशांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या कार्यशाळा त्यांनी आयोजित केल्या, अनेक शिक्षक प्रशिक्षक तयार केले. त्यासाठी लागणारे स्वयंअध्ययन साहित्यही कृतीपुस्तिकेच्या स्वरूपात तयार केले. त्याला जोड म्हणून स्लाइड प्रोजेक्टर आणि ओव्हरहेड प्रोजेक्टरही वापरला. हा शिक्षण संच भारतात आणि अनेक देशांत अल्पावधीत लोकप्रिय झाला. युनेस्कोने त्यांना शैक्षणिक तंत्रविज्ञानावर पुस्तक लिहायची विनंती केली आणि त्यासाठी पॅरिसला बोलावले. तेथून युनेस्कोने त्यांना नायजेरियातील शिक्षण पद्धती कशा बदलता येतील याचे निरीक्षण करून अहवाल देण्यासाठी तिथे जाण्याची विनंती केली. तिथे अनेकविध प्रश्न होते. तशाही परिस्थितीत त्यांनी अहवाल तयार केला.
बँकॉकच्या कार्यालयाने १९६८-६९ मध्ये त्यांना लोकसंख्या शिक्षण या विषयावर त्यांच्या पद्धतीचे स्वयं आणि गट-अध्ययन साहित्य तयार करण्यासाठी बोलाविले. त्यात खरा हेतू होता तो संतती प्रतिबंधक उपाय कसे वापरायचे ते महिलांना सोप्या शब्दांत स्पष्ट करून देण्याचा. त्यांनी चित्रांच्या सहाय्याने तो विषय समजेल, असे साहित्य निर्माण केले. गटचर्चांद्वारे हा प्रयोग यशस्वी झाला.
बांगलादेशमधील NIBM
१९७१ मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली. तिथे ग्रामीण बँकांचे जाळे आवश्यक होते. त्यांच्या सरकारने मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. बँक अधिकाऱ्यांची निवड आणि प्रशिक्षण हा प्रश्न त्यांनाही पडला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने NIBM सारखी संस्था बांगलादेशमध्येही काढावी असे ठरले. या कामासाठी NIBM तर्फे डॉ. कुलकर्णींची निवड झाली. १९७६ मध्ये ते ढाक्याला रवाना झाले. तिथे सर्वांच्या सहकार्याने BIBM ची यशस्वी स्थापना झाली. त्यानंतर १९७८ मध्ये ते मुंबईला परतले.
१९८६ मध्ये ते NIBM मधून निवृत्त झाले आणि IBPS मध्ये सल्लागार म्हणून येण्याचे आमंत्रण संचालकांनी दिले. त्या वेळी आयुर्विमा मंडळासाठी अधिकारी निवड करताना आणि प्रशिक्षण देतानाही मानसशास्त्रात झालेल्या नवीन संशोधनाची मदत त्यांनी घेतली. त्यात केवळ बुद्ध्यांक ( Intelligent Quotient – IQ) अधिक असून अधिकारी व्यक्ती यशस्वी ठरत नाही तर भावनांक ( Emotional Quotient – EQ) कमी असल्यास औद्याोगिक संबंधात तणाव निर्माण होतो. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईत LIC चे व्यवस्थापकीय विकास केंद्र होते. तेथे त्यांनी अनेक कृतीसत्रे आयोजित केली, त्यातही नवीन तयार केलेलं स्वयंअध्ययन साहित्य वापरले. LIC प्रमाणेच अनेक मोठ्या उद्याोगांमध्येही अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरते असे त्या उद्याोगांबरोबर केलेल्या प्रयोगांतून दिसून आले. तेथेही त्यांनी भावनिक गुणांक शोधायची पद्धत शोधून काढली आणि तिचा वापर कसा करायचा हेही दाखवून दिले.
त्यांचे मानसमापनशास्त्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य पाहता भारतातील १०० अग्रगण्य मानसशास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते. वयाच्या पासष्टीत ते त्यांच्या मूळ गावी कोळोशीला गेले. तिथे १०-१२ कार्यकर्त्यांसोबत ‘नारायण आश्रम संस्थे’ची स्थापना केली. तिचे दुसरे नाव Society or Rural Reconstruction and Education असे आहे. नारायण हे त्यांच्या आजोबांचे नाव, पण वेदामध्ये नारायण म्हणजे जन देवता ( Supreme Being) म्हणून उल्लेखिलेले आहे म्हणून हे नाव नक्की केले. या आश्रमात कुणी साधू संन्यासी नव्हते. येथे चार महत्त्वाच्या क्षेत्रात कार्य करण्याचे ठरले- जलसंधारण, शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण.
जलसंधारणाचे कार्य तसे खूप खोलवरच्या दु:खाचे. कोळोशी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या आईला बांबूच्या साह्याने विहिरीत उतरून पाणी भरावे लागे. तसेच त्यांच्या बहिणीच्या जन्माच्या वेळी आईला कोळोशीला न राहता कणकवली इथे दुसऱ्यांकडे जाऊन राहावे लागले होते. त्यामुळे त्यांनी पाझर तलावाचा प्रश्न प्रथम हाती घेतला आणि तडीला नेला. पाझर तलावामुळे नोव्हेंबरमध्येच सुकणाऱ्या विहिरींना आणि ओढ्यांना जूनपर्यंत पाऊस येईपर्यंत पाणी येऊ लागले. त्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच जलस्वराज्य या प्रकल्पासाठी त्यांनी जिवाचे रान केले, अनेक महिला कार्यकर्त्या तयार केल्या. गावागावात पाणी पोहोचविले. जलसंधारणासाठी त्यांनी अनेक प्रकारचे बंधारे घालण्यास प्रोत्साहन दिले, नारायण आश्रमाच्या जमिनीतही अनेक बंधारे, शेततळी, खोदतळी बांधली गेली. शासनाची जलसंधारणातील उपक्रम दाखविणारी कृतीसत्रेही नारायण आश्रमात होऊ लागली कारण इथे ३०-३५ विविध प्रकारचे बंधारे पाहता येत होते.
आरोग्य क्षेत्रासाठीही तेथील डॉक्टर्सना जोडून घेऊन जनआरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले. लायन्स क्लब सांताक्रूझ, मुंबई यांच्या सहकार्याने अशा शिबिरांचे आयोजन केले. दर वर्षी १०० हून अधिक शस्त्रक्रिया होत. महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेल्या अर्थसहाय्याचा सुयोग्य वापर केला. दर महिन्याला डॉक्टरांसाठी शिबिरे घेतली.
शिक्षण क्षेत्रात अंगणवाडी ताईंसाठी निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. शालेय शिक्षकांसाठी कृतीसत्रे, पथदर्शी प्रकल्प, प्रकल्पांना भेटी असे अनेक उपक्रम शालेय शिक्षकांसाठी वर्षभर सतत होत असत. त्यात अनेक शिक्षक आनंदाने सामील होत, आपल्या शाळेत त्या शिक्षणाचा उपयोग करीत. महिला सबलीकरण हे क्षेत्र तसे अधिक आव्हानात्मक; पण त्यांच्या पुढाकाराने महिलांचे स्वयंसहाय्य गट तयार झाले.
डॉ. कुलकर्णी यांनी त्यांचे डोळे त्यांना साथ देत होते तोपर्यंत नारायण आश्रमात राहून आपले योगदान दिले. पण दोन्ही डोळ्यांनी असहकार पुकारल्यावर ते पुण्याला राहू लागले. तेथेही त्यांनी वृद्धाश्रमाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास प्रत्यक्ष तेथे राहून केला, अनुभवला.
आयुष्यभरातील या सर्व व्यग्र कार्यक्रमातून त्यांनी विपुल लेखन केले. ते मुळातच तत्त्वचिंतक (फिलॉसॉफर) असल्यामुळे सम्यक विचार हा पाया होता. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, तरुण-तरुणींना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजप्रबोधन, सामाजिक पुनर्रचना करण्यासाठी त्यांना बळ मिळावे ही सदिच्छा!
kamatvasudhav@gmail.com