पुढच्या दोन आठवडय़ांत आपण आपला ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करू. नवे पंतप्रधान, नवा सोहोळा.. दिल्लीची परेड बघू. परीटघडीचे पांढरे कपडे आणि जाकीट (खादी सिल्क किंवा तत्सम) घालणाऱ्या आपल्या नेत्यांची भाषणे ऐकू.  छोटय़ा छोटय़ा वसाहती, अपार्टमेन्टस्मधून उत्साही कार्यकत्रे, प्लॉटधारक सोहोळा आयोजित करतील.. राष्ट्रगीत झाल्याबरोबर वेफर्स, समोसा आणि जिलेबीवर ताव मारला जाईल. आपापल्या शर्टावर टाचणी टोचणार नाही याची काळजी घेत छोटे ध्वज लावले जातील. सिग्नलला राष्ट्रध्वज विकत घेताना आम्ही सवयीने थोडीफार घासाघीस करू. आमच्या होंडा, टोयाटो, बी.एम., मर्स किंवा ऑडीच्या पुढच्या काचेवर किंवा बॉनेटपाशी तो एक दिवस फडफडेल. गाडी परदेशी बनावटीची का असेना, ध्वज तर भारतीय असेल. भारतीयांच्या वाढलेल्या क्रयशक्तीची तो चुणूक ठरेल. रेडिओवर ‘मेरा रंग दे बसंती चोला’ लागेल.. आम्ही स्टीअिरगवर ठेका धरू. ‘ऐ मेरे वतन के लोगों..’ मुळे पंडितजींच्या डोळ्यांत पाणी आले, ही गोष्ट आम्ही आमच्या नातवंडांना सांगू.. आणि ते मात्र प्रश्नार्थक चेहऱ्याने ‘‘But why Ajoba? ’’ असा प्रतिप्रश्न करते होतील. साठ-सत्तरच्या दशकात या गाण्यावर, गोष्टीवर आमचे बालपण िशपले गेले. पंडितजी रडले, हे ऐकून आमच्याही जिवात कालवाकालव व्हायची. ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो.. आम्ही देशाचा विचार गोठविला.. भारताचा भार उचलण्यासाठी आमचे खांदे ताठ राहिनासे झाले. ‘India’ मधील ‘inclusive, integrative’ दृष्टिकोन संपला. आम्ही फक्त ‘क’ चा विचार करू लागलो. राष्ट्रीयत्वाची भावना लयाला गेली. मी.. माझी बायको.. दोनएक मुले.. त्यात आई-वडिलांना थारा मिळेना; मग राष्ट्रविचार फार दूरची बात ठरू लागली. सीमेवर सनिक धारातीर्थी पडले तरी आमची धारावाहिके नेहमीप्रमाणे संध्याकाळी सुरूच. एकंदरच आम्ही सार्वत्रिक, स्वदेशी विचारांत अपुरे पडतो आहोत, हे सत्य आहे.
जपान, जर्मनी या राष्ट्रांनी महायुद्धांची झळ चाखली. बेचिराख होऊन पुन्हा उठणे म्हणजे काय, हे अनुभवले. कारगिल धरून आम्हीही चार युद्धे भोगली, मग आमच्या रक्तात राष्ट्राचा विचार का नाही आला, याचे कारण स्पष्ट आहे. आमची युद्धे सीमेवर रेंगाळली.. ती आमच्या घरादारापर्यंत पोहोचली नाहीत. पण हे किती दिवस चालणार? आम्हाला Made In Germany, Made In USA वरअ चे अप्रूप होते; पण आमच्यावर Made In China स्वीकारण्याची वेळ आली. कारण आम्ही Made in India चा आग्रह आणि अभिमान बाळगला नाही. तुम्हीच तुमची किंमत ठेवणार नसाल तर जग तुम्हाला खिजगणतीतही धरणार नाही.
सगळेच काही संपलेले नाही. एखादा बॉम्बस्फोट, नसíगक आपत्ती आली की आपण ‘भारतीय’ होतो..  प्रचंड काम करतो आणि जगाला दाखवून देतो. प्रश्न आहे रोजच्या जीवनातही योग्य तो प्राधान्यक्रम ठरविण्याचा. आधी देश, मग राज्य आणि मग माझे कुटुंब हे मनावर िबबविण्याचा. माझ्या मातृभाषेवर माझे प्रेम आहे, पण मला माझी राष्ट्रभाषा अधिक चांगली बोलता यायला हवी, हे मला खंतावते आहे. राष्ट्रीयत्व रुजवायचे असेल तर आपल्याला प्राथमिक शिक्षणापासूनच सुरुवात करावी लागेल. सामायिक अभ्यासक्रम, राष्ट्रीय मूल्यांची रुजवात करावीच लागेल. राष्ट्रीयत्व ‘ऑप्शन’ला टाकता येत नाही. ते आपल्या श्वासासहित रक्तात हिमोग्लोबीनसारखे भिनायला हवे.
 मग परदेशी पाहुण्यांना आपण खऱ्या अर्थाने अतिथी मानू. त्यांना एअरपोर्टवरूनच गंडविणार नाही. त्यांना मदत करताना, त्यांचे कौतुक करताना आपल्या नजरेतून, स्वरांतून, आविर्भावातून आपले भारतीयत्व प्रकट होईल आणि त्यांनाही ते भावेल. आपण आधी भारतीय आहोत; मग मराठी, गुजराती, केरळी वगरे वगरे. प्रांताची अस्मिता मी मानतो, पण देशाबद्दलचा अभिमान त्याहूनही मोठी गोष्ट आहे. आणि कधी कधी अस्मितेच्या आग्रहाचा अट्टहास अभिमानाचा गळा घोटतो, हे होता कामा नये.
..जपानला राहणाऱ्या माझ्या भाच्याचा- भार्गवचा मेल आला. संध्याकाळचे ऑफिस सुटल्यावर जरा उशिरानेच मेट्रोने तो घरी जातो. एके दिवशी समोरच्या सीटवरचा जपानी सद्गृहस्थ फाटलेले ट्रेनचे सीट कव्हर सुई-दोऱ्याने शिवताना दिसला. त्याला हे काम दिले असावे असा भार्गवचा समज झाला. स्टेशन आल्यावर सुई-दोरा खिशात ठेवून तो गृहस्थ आपली ब्रीफकेस घेऊन निघाला. भार्गवने त्याच्याकडे पृच्छा केल्यावर तो एवढेच म्हणाला, ‘‘मी सोनी कंपनीत इंजिनीअर आहे.  कोणीतरी सीटस् फाडते. त्यामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो. मी रोज घरून सुई-दोरा घेऊन येतो आणि प्रवासाच्या २० मिनिटांत शिलाईचे काम करतो. हे मला कोणी सांगितलेले नाही, पण ते मला माझे राष्ट्रीय कर्तव्य वाटते.’’
…‘‘भारतीय रेल राष्ट्र की तथा जनता की संपत्ती है।’’
या एतद्देशीय वाक्याचा अर्थ मला कोणी समजावून देईल का?