समीर गायकवाड

गावाकडं लग्नाचे ठरावीक टप्पे असतात. उपवर मुलगा, मुलगी असलेल्या घरात लग्नाची चर्चा सुरू होताच तिथली कर्ती मंडळी नातलगात, सोयऱ्याधायऱ्यात, मित्रमंडळीत निरोप देऊ लागतात. योग्य स्थळ मिळावं म्हणून चौकस नजरेनं लक्ष ठेवून राहतात. मध्यस्थाकडून स्थळाचा निरोप आला की आधी जुजबी माहिती दिली घेतली जाते. यातून एकमेकाचा अंदाज काढला जातो. आखाडय़ात कुस्ती सुरू होण्याआधी पलवान एकमेकांचे पट काढून ताकद जोखण्याचा प्रयत्न करतात तसा हा प्रकार असतो. हा टप्पा पार पडला की मग जाणती मंडळी नव्या पाहुण्याचं घर बघायच्या निमित्तानं जाऊन चाखाचोळा घेऊन येतात. घर बरं वाटलं, माणसं चांगली वाटली की मग गाडी पुढे सरकते. वरवधू बघण्याचा दिवस मुक्रर केला जातो. डझनभर मंडळी हे कार्य पार पाडण्यास जातात. तिथं इतर गोष्टींचा अंदाज लावला जातो. स्थळ पसंत पडलं की पुढच्या गोष्टींचा वेध घेतला जातो.  बैठक होते. हा टप्पा महत्त्वाचा असतो. कारण निम्मी लग्नं याच टप्प्यात फिसकटतात. देण्याघेण्याची, मानपानाची, विवाहकार्याची सगळी बोलणी यात पक्की होतात. घासाघीसही होते. मध्यस्थ असणारे भाऊसाहेब, रावसाहेब, अण्णासाहेब दोन्ही बाजूंच्या लोकांचा कल घेत, अंदाज काढतात आणि एका मध्य-मार्गावर बठकीत एकमत होतं. तारीख ठरते. कार्यालय पक्कं होतं. पत्रिका छापून वाटून होतात. दोन्ही घरात सगळीकडे लगीनघाई सुरू होते. साखरपुडा होतो. गडंगनेरांची रांग लागते. पाव्हणेरावळे घरात ठाण मांडून बसतात. दारापुढे मांडव उभा राहतो आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडतो.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

थाटामाटात लग्न लागतं. त्यात रुसवेफुगवेही होतात. कुलवऱ्यांची कलकल वाढत जाते, कुलवरे वरातीत धूम उडवून देतात. म्हातारेकोतारे एका कोपऱ्यात बसून अडकित्त्यात सुपारी कातरत आस्थेवाईक चौकशांचे बारीक दळण दळत बसतात. वरमायांचा तोरा न्याराच असतो. विहिणींच्या तऱ्हा आगळ्याच असतात. पोट्टे सगळ्यांना भंडावून सोडतात. वाजंत्री कहर करतात. अक्षता वाटून होतात आणि भटजीबुवा एकदाचा ‘स्वस्ति श्री गणनायकं..’चा परिचित चालीतला स्वर आळवतात अन् इतक्या दिवसांपासून जीवाची तगमग सुरू असलेल्या नवरा-नवरीचा जीव भांडय़ात पडतो. अंतरपाट बाजूला होताच लाजत हसत ते दोघे एकमेकांना पुष्पहार घालतात. लग्न लागतं. सप्तपदीच्या फेऱ्या होतात. आहेर होतात. रुखवताचा भाव वाढतो. जेवणावळी उरकतात. दिवस कलायला होतो. पाव्हणेरावळे, मित्रमंडळी, शेजारपाजारचे लोक आपापल्या घरी जायला निघतात. दिवस मावळेपर्यंत सगळे पांगतात. मोजके सोयरे उरतात. नव्या नवरीसोबत एक अनुभवी बाई पाठराखीण म्हणून तिच्या सासरी येते. ही पाठराखीण त्या नव्या नवरीला एकटं वाटू नये म्हणून सदान्कदा तिच्याभोवती फेर धरून राहते. तिला धीर देत देत घरातल्या सगळ्या माणसांना जोखण्याचं काम ती करत असते. पोरीची नणंद कशी आहे. जावा काम करतात की नाही, सासू किती कडक आहे, सासरा चांगला आहे की नाही. दीर कामधंदे करतात की नाही. घराची आर्थिक स्थिती कशी आहे. नवरा मुलगा कसा वागतो- तो काही कामधाम करतो की नाही.. अशा अनेक प्रश्नांवर ती आपले मत बनवत असते. त्यावरून निष्कर्ष काढून ‘आपल्या साळूचं सासर लई भारी किंवा लई मोक्कार’ यातला एखादा शेरा ती देणार असते. तसंच सासरी कसं वागायचं, कुणापुढं झुकायचं आणि कुणाला वाकवायचं याचे कानमंत्रही ती देते.

लग्न झाल्यावर पुढचे विधी सुरू होतात. देवदर्शनाची वारी होते. कुलदैवताला नमस्कार होतो. कुलदेवतेला चोळीबांगडी होते. नवं जोडपं दिसल त्या देवाच्या पायी मस्तक टेकवतं. पुढच्या आयुष्यासाठी मागणं मागितलं जातं. कातावून गेलेल्या नवरानवरीची थोडी भीड चेपलेली असते आणि स्पर्शखेळासोबतच नेत्रपल्लवीही सुरू झालेली असते. आता जागरण- गोंधळ झालं की, मीलनाची ती घडी काही घटिकांच्या अंतरावर आहे याची त्यांना जाणीव झालेली असते. दोघेही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. जागरणाचा दिवस कलतो. दारातल्या मांडवात माणसांची वर्दळ वाढते. अंधारासोबतच वाघ्या- मुरळीही येतात. बेलभंडारा उधळला जातो. भंडाऱ्याचा भडका उडतो, खोबऱ्याचे कुटके उडतात. संबळ वाजू लागते. ढोलकी कडाडतात. दुमडी ताल धरते. हातातली घुंगरं थिरकावत मुरळी ठेक्यात गाऊ लागते. ‘‘माझ्या मल्हारी रायाचा लगीनसोहळा गाजतो, नवरी झाली बाणाई, दारी चौघडा वाजतो..’’ यजमानाकडची पोरंठोरं मुरळीला नाचण्याचा आग्रह करू लागतात. नवखी मुरळी लाजू लागते. तिचं लाजणं रंगत जातं आणि गोंधळ फिका वाटू लागतो. मग वाघ्या पुढं सरसावतो. पाय थकलेले असले तरी ठेका धरू लागतो.

हळदीत न्हाऊन निघालेला, प्रौढत्वाकडे झुकू लागलेला वाघ्या ताल धरू लागताच मुरळीला नकळत हुरूप येतो आणि खऱ्या अर्थानं जागरण गोंधळ सुरू होतो. प्रत्येक नव्या नवरानवरीचं पहिलं जागरण गोंधळ म्हणजे एक सुरस कथाच असते. रात्रभर नवरानवरी पळी पळी तेलाची धार लावून बसतात. लोकं येत जात असतात. इकडे मांडवात जेवणावळी सुरूच असतात. भकाकणाऱ्या लाईटच्या फोकसभोवती चिलटांचा धुडगूस सुरू असतो. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचे लाऊडस्पीकरचे कर्णे नंतर गात्र शिथिल झाल्यागत भोंग्याचा आवाज गेल्यागत गळाटतात. हौशेनवशे जागरणात सामील होतात. पानाची कळी खुडत चुना लेपला जातो. अडकित्त्यात अलगद सुपारी कातरत कातरत तिच्या चिरफाळ्या उडत राहतात. पानविडे रंगत जातात, त्याच्या पिचकारे कारंजे हवेतून त्याचा गंध पसरवत राहतात. नुकत्याच माहेरी आलेल्या लेकुरवाळ्या पोरीबाळींची चिमणी-पाखरं दिवसभर हुंदडून रात्री उशिरापर्यंत जागं राहून अलगद                                      आईच्या मांडीवर गाढ झोपी गेलेली असतात. आजूबाजूच्या म्हाताऱ्याकोताऱ्या बायका डोक्यावरचा पदर सावरत हनुवटीला हात लावून बसत, नवरीचा अंदाज घेत तिचा प्रपंच कसा नांदणार याचा अंदाज बांधत राहतात. एखादी भोचक बाई त्यात संधी सांधून शेरेबाजी करत असते. नवरीच्या कलवऱ्यांचा उत्साह काही केल्या मावळलेला नसतो, पण एकसारखं बसून तिच्या पाठीची कमान मोडलेली असते. तेल घालून कंटाळलेल्या त्या जोडप्याला वाघ्या मुरळीच्या चहापानाच्या निमित्ताने ब्रेक मिळतो तेव्हा त्यांच्यात अत्यंत आकर्षक अन् वेधक नेत्रपल्लवी होते. तिच्या हिरव्याकंच बांगडय़ा किनकिनतात. मांडी घालून बसलेल्या पायांना रग लागलेली असते. नकळत तिच्या पायाची करंगळी मातीत रुतते. कारण त्याने हळुवार हात फिरवत फिरवत तिच्या मांडीवर हाताचं ओझं टाकलेलं असतं.

चहापानाच्या विश्रांतीनंतर सर्वाची नजर चुकवत ती चोरून त्याच्याकडे पाहत असते. खरं तर तिला वाटत असतं की, आपल्याकडे कुणाचंच लक्ष नसावं, पण तिचे आडाखे चुकीचे असतात. सगळ्यांच्या चोरटय़ा नजरा तिच्यावरच तर रोखलेल्या असतात. हळूच ती त्याला चिमटा काढते. त्याचं ते अवघडलेपण उपस्थित पुरुषांच्या नजरेतून सुटत नाही. आपल्या संसाराच्या लोणच्यात कैरीगत मुरलेल्या बायकोच्या कोपराला ढुसण्या देत जुने झालेले नवरे विचारतात, ‘‘तू बी अशीच होतीस ना!’’ त्या प्रश्नानं त्या सादळलेल्या बिस्किटाच्या बायकोचे गाल लाजून आरक्त होतात! जुनाट तरकटी, जुनाट  खोडांना मात्र या सर्वात कशात स्वारस्य नसतं. ते मात्र वाघ्याला ‘दमानं घे रं बाबा, नेमानं होऊ दे’ अशी आर्जवं करत राहतात. मधूनच तरणी पोरं उठून नाचून आपली हौस भागवून घेतात. ही नाची पोरं थकत नाहीत, पण दमलेला वाघ्या आभाळातल्या चान्न्या बघून वेळवख्ताचा अंदाज बांधतो.

दरम्यान, मध्यरात्र उलटून साखरझोपेचा गारवा सुरू झालेला असतो. निम्म्या लोकांचे डोळे पेंगू लागले की नवरानवरी डोळे भरून एकमेकांना पाहतात. नेमका हा क्षण टिपून झाला की वाघ्या मुरळी जागरणाच्या अखेरच्या टप्प्यात येतात. खंडेरायाचा येळकोट पुकारत भलामोठा साखळदंड एका फटक्यात तोडला जातो. त्यातल्याच कडीची पूजा होते. फोकस बंद होतात, गॅसबत्तीचे मेंटल फिके होतात. लाईटचे निम्मे गोळे बंद होतात. थकलेले वाघ्या मुरळी बसकण मारतात. पुन्हा एकदा चहा होतो. बिदागी देऊन होते. इतक्यात कोणीतरी आगाऊ शहाणा येऊन ‘‘अमक्या तमक्याच्या लग्नात आलेली मुरळी ही नव्हं का? का तर बाईची कंबार लई हललीच न्हाई,’’ असं विरजण घालून जातो. तर आपल्या घरातल्या लग्नाची तारीख पक्की केलेला एखादा वधुपिता पुढे येत पार्टी कुण्या गावची, बिदागी किती, याची जुजबी चौकशी करतो अन् पटल्यास सुपारी देतो.

जागरण सरतं. घरातले दिवे मालवले जातात. दिवसभर ताणलेली माणसं पोटात पाय खुपसून आल्हाद झोपी जातात. रस्त्याच्या फुफुटय़ात अंगाची मुटकुळी करून पडलेली कुत्री घरासमोरच्या मांडवात येऊन इतस्तत: पडलेल्या वस्तूंना बऱ्याच वेळ हुंगत राहतात. त्यांची थोडी खसफस होते. अखेर तोही आवाज बंद होतो. गाव झोपेच्या अधीन होतं. वेगवेगळ्या खोल्यांत निजलेले नवरानवरी इतक्या वेळ झाकलेले डोळे हळूच उघडतात आणि आपल्याकडे कुणाचे लक्ष तर नाही ना याची खात्री करून घेतात. तो उशी वरती सरकवत थेट दाराच्या उंबऱ्यापाशी सरकत जातो अन् प्रचंड खटपट करून शेजारच्या खोलीत झोपलेल्या ‘तिचा’ चेहरा नजरेला पडतो का याचा अंदाज घेऊ लागतो. ‘त्याच्या’ आवाजाचा ती कानोसाच घेत असते. त्याच्याशी नजरानजर होताच हळदरंगात रुळलेल्या तिच्या गालावर जीवघेणी खळी पडते अन् आसमंतात निखळ प्रेमाचे धुमारे फुटतात. त्यांचं जागरण खुललेलं पाहून निळ्याकाळ्या आभाळातल्या चांदण्या लाजून चूर होऊन जातात..

sameerbapu@gmail.com