श्रीकांत धोंगडे यांचे ‘कुरतडलेल्या कथा’ हे पुस्तक म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील सत्य घटनांवर आधारित लेखन होय. या क्षेत्रातील काळीज कुरतडणाऱ्या कथा असंच त्याचं वर्णन करावं लागेल. मनोरंजन क्षेत्र वरकरणी खूप झगमगाटी दिसत असलं तरी आतून त्याला एक काळी किनारही आहे. अनेक छोटय़ा-मोठय़ा कलाकारांच्या दर्दभऱ्या कहाण्या त्यात लपल्या आहेत. लेखकाने नेमका हाच धागा पकडून त्या कथेच्या रूपात मांडल्या आहेत. लेखकाने फार जवळून ही दुनिया पाहिली असल्यामुळे तिथलं जग, त्या जगातील नट-नटय़ांचं जगणं, वरवरच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेली त्यांची दु:खं, त्यातून त्यांच्या जीवनाची होणारी फरपट.. अशा अनेक गोष्टी या कथांमधून वाचकांसमोर येतात. गुरुदत्त, अमृता प्रीतम- साहिर-इमरोज यांचं प्रेम, मीनाकुमारीची जीवनकहाणी अशा अनेकांच्या दर्दभऱ्या कथा यात वाचायला मिळतात. नट-नटय़ांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी वाचकांना वाचायला नेहमीच आवडतं. त्यादृष्टीने हे पुस्तक या क्षेत्रातील कलाकारांच्या आयुष्याची ओळख करून देतं. ‘कुरतडलेल्या कथा’- श्रीकांत धोंगडे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पाने- १२५ , किंमत- २०० रुपये. करोनाची कुलूपबंदी ‘कुलूपबंद’ हा आशीष निनगुरकर यांचा कवितासंग्रह म्हणजे करोनाकाळातील माणसाचं जगणं आणि त्याची काव्यातून केलेली यथोचित मांडणी होय. करोनाकाळात कुलूपबंद झालेलं आपलं आयुष्य लेखकाने या कवितांतून मांडलं आहे. करोना म्हणजे जगावर आलेलं एक अवचित अन ् अकल्पित संकट. करोनाने माणसाचं जगणंच बदलून टाकलं. टाळेबंदीच्या काळात आपलीच माणसं आपल्याला नव्याने कळली.. या काळात शहरांत राहणाऱ्या अनेकांना गावाने आसरा दिला. अनेकांची ‘गडय़ा अपुला गाव बरा’ अशी अवस्था या काळात झाली होती. त्याचे वर्णन या कवितांमधून डोकावते. करोनाकाळात करोना- योद्धय़ांनी केलेल्या कामाचा आणि त्या कामाप्रति असलेला आदराचा उल्लेख कवी आवर्जून आपल्या कवितांमधून करतो. कवीने जीवनाचं सारच आपल्या कवितांमधून मांडलं आहे. ‘कुलूपबंद’- आशीष निनगुरकर, सुजन संवाद प्रकाशन, पाने- ८८, किंमत- १७५ रुपये. ६