आबा पहिल्या पिढीचे राजकारणी. एकापेक्षा एक तगड्या राजकारण्यांनी भरलेल्या सांगली जिल्ह्यातले. आसपास जयंतराव पाटील, पतंगराव कदम, विलासकाका उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण वगैरेंच्या गर्दीत आबा आपलं स्थान राखून होते. यांतील कोणी साखरसम्राट. कोणी शिक्षणसम्राट. कोणी दोन्हींचे सम्राट. असं सम्राटपण नसलेले तिकडचे दोघेच. एक पृथ्वीराज चव्हाण आणि दुसरे आबा. राजकारणाच्या रोगट वातावरणात राहूनही आबा कायम निरोगीच राहिले…

एकदा दुपारी आर. आर. आबा पाटील यांचा फोन आला. तेव्हा ते गृहमंत्री होते. ऑफिसमध्ये आहात का विचारत होते. म्हटलं, ‘‘आहे, आताच पोहोचलोय…’’ आबा म्हणाले, ‘‘एक तासाभरात येतो.’’ मला कळेना नक्की काय काम आहे, कशाला येतायेत. आबा चांगले वाचक होते. पुस्तकाचे आणि दैनिकाचे तर होतेच होते. वेळच्या वेळी प्रतिक्रिया देत. आणि त्यावेळी त्याआधीच्या आठवड्याभरात वगैरे असं काही लिहिलेलंही नव्हतं आबा किंवा राष्ट्रवादीविषयी. तरीही ते येतो म्हणाले त्याचं कारण काही कळेना. आमच्या ‘राष्ट्रवादी’च्या रिपोर्टरला विचारलं. त्यालाही माहीत नव्हतं. म्हटलं, ‘येतायत तर येऊ दे’. आता गृहमंत्री येणार म्हणजे त्याच्या आधी सगळे भालदार-चोपदार आले. तपासणी वगैरेही झाली. थोड्या वेळानं ते आले. नेहमीची पांढरी सफारी आणि पायात चपला. तोंडात बार भरलेला आणि चेहऱ्यावर त्यांचं नेहमीचं मिश्कीलसं हसू.

आल्यावर हवापाण्याच्या गप्पांची सलामी झाली. माझ्या डोक्यात ‘हे का आलेत?’ या प्रश्नाचा भोवरा अधिकच वेगाने फिरायला लागलेला. ते कसं विचारावं या प्रश्नाची जुळवाजुळव मी करत होतो. पण आबांनीच विषय काढला. आबांच्या बोलण्यात खास कोल्हापुरी ढंग असायचा. बोलताना मान आडवी हलवत मऊपणानं बोलायचे ते… ‘‘एक वेगळाच विषये बरका…’’, असं म्हणत आबांनी थेट त्या वेगळ्या विषयाला हात घातला.

‘‘ही ‘लिबर’ भानगड नक्की काय असते…’’ आबांचा प्रश्न.

ही २०२१च्या कितीतरी आधीची गोष्ट. त्यामुळे तेव्हा ‘लंडन इंटरबँक ऑफर रेट’ ऊर्फ ‘लिबर’ हयात होता. लंडन-स्थित बँका एकमेकांना तारणाशिवाय किती व्याजदरानं पैसा पुरवतात त्याचा दर म्हणजे ‘लिबर’. त्याचा आधार मग जागतिक पातळीवरही घेतला जाऊ लागला. परिणामी ‘लिबर’ हा बँकांमधल्या देवघेवीचा जागतिक दर बनला… असं काय काय जुजबी सांगितलं मी त्यांना. या अनुषंगानं थोड्याफार गप्पा झाल्या. ‘‘या सगळ्यात लंडनमधल्याच बँकांनाच इतकं महत्त्व का द्यायचं…’’ असं काही त्यांनी विचारलं. मला वाटलं, एखाद्या गुन्ह्यासंदर्भात त्यांना ही माहिती हवीये की काय. पण तसं काही नव्हतं. त्यांना फक्त जाणून घ्यायचं होतं. मला पहिल्यांदा हे खरंच वाटेना, पण ते खरं होतं. या विषयावर गप्पा झाल्या आणि आबा गेलेही.

आबांशी चांगला परिचय होता, पण राजकारण्यांशी जशा निवांत गप्पा होतात, गॉसिपिंग होतं तसं काही आबांशी व्हायचं नाही. त्यांचा स्वभाव तसा नव्हता. आबा पहिल्या पिढीचे राजकारणी. एकापेक्षा एक तगड्या राजकारण्यांनी भरलेल्या सांगली जिल्ह्यातले. आसपास जयंतराव पाटील, पतंगराव कदम, विलासकाका उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण वगैरेंच्या गर्दीत आबा आपलं स्थान राखून होते. हे सगळे सम्राट. कोणी साखरसम्राट. कोणी शिक्षणसम्राट. कोणी दोन्हींचे सम्राट. असं सम्राटपण नसलेले तिकडचे दोघेच. एक पृथ्वीराज चव्हाण आणि दुसरे आबा. मुळात या अशा जिल्ह्यात राजकारणात स्थान निर्माण करणं हेच आव्हान. त्यात ते राखणं हे म्हणजे अशक्यच म्हणायचं. आबांनी हे असं अशक्य करून दाखवलेलं. आणि त्यातही आश्चर्य म्हणजे त्यांच्या मागे एकही साखर कारखाना, सहकारी बँक, गेलाबाजार डेअरीसुद्धा नसताना. आबा जिल्हा परिषदेवर निवडून आले तेव्हाही आपल्या एका खोलीच्या घरात राहायचे. परिस्थिती इतकी हलाखीची होती की बऱ्याचदा शाळेच्या किंवा जिल्हा परिषद कार्यालयाच्या पडवीतच त्यांना रात्र काढावी लागायची. नुसतं तेव्हढंच नाही. गृहमंत्री होते तेव्हाही त्यांचा भाऊ पोलीस दलात अन्य इतरांसारखाच नोकरी करत होता. कोणाला माहीतही नव्हतं की हा राज्याच्या गृहमंत्र्याचा भाऊ आहे ते. महाराष्ट्रासारख्या राज्याचं गृहमंत्रीपद दहा वर्षं सांभाळलेलं. उपमुख्यमंत्री राहिलेले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही. आणि हे सगळं मागे काही नसताना.

आबा खरोखरच साधे. आतून-बाहेरून. पण राजकारणात भरजरी शालू इतकंच कोलकात्याची पांढरी-शुभ्र, स्टार्च केलेली, छान निऱ्या काढलेली ‘साधी’ कॉटन साडी हेदेखील एक स्टेटमेंट असतं. आता आबांचा स्वभाव लक्षात घेता ‘असं स्टेटमेंट आपण करू या’ असं काही ठरवून त्यांनी केलेलं नसणार, हे नक्कीच. पण साधेपणा हा आपला ‘यूएसपी’ होतोय हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी त्याला कधी अंतर दिलं नाही. ‘ऑनरेकॉर्ड’ आणि ‘ऑफरेकॉर्ड’ असा काही फरक नव्हता आबांच्या वागण्यात. वास्तविक त्यांच्या पक्षाचे बाकीचे सगळेच नेते कोणत्या ना कोणत्या आरोपांचे बळी. आबांवर मात्र कधी असे कसले शिंतोडे उडाले नाहीत. एकदा त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही म्हणजे भांगेतली तुळसच की!’’ तर त्याच्यावर त्यांचं उत्तर मासलेवाईक होतं. आबा म्हणाले, ‘‘ही सगळी तुमची (माध्यमांची) गरज. तुम्ही आमच्या सगळ्यांवरच आरोप केले तर ते तितके चिकटणार नाहीत ना, उलट ते करणाऱ्याविषयीच- म्हणजे तुमच्याविषयीच-संशय घेतला जाईल. म्हणून मग तुम्ही एखाद्-दुसऱ्याला सोडता. त्याच्यावर कसलेच आरोप करत नाही. हे असं गणित असतं… म्हणून आमच्यातल्या इतरांवर आरोप करताना तुम्ही माझ्यावर काही बोलत नाही…’’

आबा असं भलतंच, पण तर्कसंगत बोलायचे. ‘लोकसत्ता’मधला सहकारी देवेंद्र गावंडे याच्या नक्षलवादावरच्या पुस्तकाचं प्रकाशन आबांच्या हस्ते झालं. पुण्यात. त्यासाठी म्हणून ते आले होते. गृहमंत्री या नात्यानं त्यांनी मुद्दाम मागून घेतलेलं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद. ते नकोसं असतं कोणालाही. आबांचा अपवाद. तिथे कार्यक्रमानंतर गप्पा मारताना म्हणाले ‘‘… नक्षलवाद हा काही विदर्भ, छत्तीसगडच्या जंगलांमध्ये जन्माला येत नाही… त्याचं मूळ आहे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर. लोकांची कामं आमची सरकारी माणसं वेळच्या वेळी करत गेली तर नक्षलवाद वाढणारच नाही.’’ एका मंत्र्यांनं… आणि त्यातही गृहमंत्र्यांनं… हे असं स्वच्छ बोलणं फारच होतं. तरी बरं आबांच्या वेळी ‘अर्बन नक्षल’ जन्माला यायचे होते… आजच्या काळात आबा असते तर तेच अर्बन नक्षल गणले गेले असते. असो. आसपासच्या घटनांकडे साध्या माणसाच्या नजरेतनं पाहणारा एक माणूस आबांमध्ये कायम जागा असायचा. झगझगीत, श्रीमंती जगात आबा खरोखरच बुजायचे. आपण इथले नाही, असं त्यांना प्रामाणिकपणे वाटायचं. ‘‘जोडे एअरकंडिशन दुकानात आणि भाजी उघड्या रस्त्यावर हे असं कसं?’’ असा एकदा त्यांचा प्रश्न होता. अर्थव्यवस्थेबाबत त्यांना असे मूलभूत प्रश्न पडायचे. त्यांना सामान्य माणसाचा कळवळा असायचा. पण त्यातनं ते कधीकधी अडचणीतही यायचे. एकदा विधानसभेत अशीच सामान्य माणसाची कड घेऊन त्यांनी सरकारी वैद्याक सेवेवर तुफान हल्ला केला. नंतर लक्षात आलं तो ‘सामान्य माणूस’ हा कट होता आणि एका अभ्रष्ट सरकारी वैद्याकीय अधिकाऱ्याला त्याच्या भ्रष्ट सहकारी आणि कंपन्यांनी ठरवून अडकवण्याचा बनाव रचला. सामान्य माणसाच्या व्यथा पाहून आबा विरघळतात हे माहीत असल्यानं त्यांच्यापुढे ही कहाणी सादर केली गेली. ‘‘या अशा प्रसंगांतून खूप शिकलो.’’ आबा नंतर म्हणाले.

आबा हे वसंतदादा पाटलांचं ‘फाइंड’. त्यांची जिल्हा परिषदेतली तडफदार कामगिरी पाहून वसंतदादांनी त्यांना हेरलं आणि ‘विधानसभेच्या तयारीला लागा’ असं सांगितलं. पण दुर्दैवानं वसंतदादा काही आबांना तिकीट देऊ शकले नाहीत. वसंतदादांचेच ते उतरंडीचे दिवस होते. राज्यपाल करून त्यांना काँग्रेसनं वानप्रस्थाश्रमाच्या वाटेला लावलेलं. एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या हाती त्यांनी आबांचा हात सोपवला. पुढे पवारांनी त्यांना मोठं केलं. काँग्रेस सोडून पवारांनी राष्ट्रवादी काढली तेव्हा आबा पवारांबरोबर राहिले. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यावर पहिल्याच फेरीत पवारांनी त्यांना मंत्रीपद दिलं. असं म्हणतात की, त्यावेळी अर्थमंत्रीपद की ग्रामविकास असा चॉईस पवारांनी आबांना दिलेला. आबांनी ग्रामविकासमंत्रीपद घेतलं आणि सांगलीतलेच त्यांचे शेजारी जयंतराव पाटील अर्थमंत्री झाले. आबांना त्यावर विचारलं कधी तर ते चॉईसविषयी काही बोलायचे नाहीत; पण ग्रामविकास खातंच मला कसं हवं होतं ते मात्र आवर्जून सांगायचे. त्याआधी पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले तेव्हा आबांनी केवळ समजून घेण्यासाठी म्हणून सारा महाराष्ट्र फिरून काढलेला. आपलं राज्य आहे तरी कसं हे त्यांना पाहायचं होतं. आणि नंतर पुढच्या खेपेला जेव्हा त्यांना ग्रामविकासमंत्रीपद मिळालं तेव्हा त्यांना त्या भटकंतीचा खरा फायदा झाला. ‘गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ ही आबांची देणगी. महाराष्ट्राच्या अनेक योजना पुढे केंद्रीय पातळीवर उचलल्या गेल्या. उदाहरणार्थ, एकेकाळची रोहयो नंतर मनरेगा झाली. आबांचं हे ग्रामस्वराज्य अभियानही राष्ट्रीय पातळीवर गेलं. गाडगेबाबा हा या मातीतला सच्चा संत. खरं म्हणजे सध्या संतपण हे ‘पद्मा’सारखं झालंय. ते न मिळालेले खरे वाटतात. गाडगेबाबा हे असे ‘खरे’ होते. संतपणाची दुकानदारी त्यांची कधी झाली नाही. आबांना त्यांच्याविषयी खरोखर आत्मीयता होती. त्या बाबत त्यांचं नातं शरद पवारांशी होतं. त्यांनी कधी गंडेदोरे बांधले नाहीत की कोणा बाबाबापूच्या पायावर डोकं ठेवायला ते गेले नाहीत. शरदरावांविषयी खासगीतही उमाळ्याने बोलायचे. ‘‘महाराष्ट्राला त्यांची किंमत नाही,’’ असं त्यांना मनापासून वाटायचं. एकदा गृहमंत्री असताना एका बड्या बाबाबापूची ‘फाइल’ त्यांच्यासमोर आली. काही महिलांनी तक्रार केली होती, तो प्रकार सांगतानाही आबांच्या चेहऱ्यावरचा अस्वस्थपणा लपत नव्हता. आधीच ‘हिंदू दहशतवाद’ असं काही बोलल्यामुळे आबा बदनाम झालेले. ती बाब त्यांना आत खोलवर लागलेली. आपल्या प्रामाणिकपणाबद्दल केवळ धार्मिक कारणानं संशय घेतला जातोय, हे आबांना पटत नव्हतं.

‘‘महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी आहे असं तुम्हाला वाटतं?’’ या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी टाळलेलं. आबांना आणखी एक गोष्ट जखम करून गेलेली. ती कधीच भरून आली नाही. ती खोल जखम म्हणजे २६/११ चा हल्ला. हा हल्ला, त्यानंतर त्यांचा राजीनामा वगैरे सगळं झाल्यानंतर आबा भेटले की हा विषय निघायचा. त्या हल्ल्यातलं त्यांचं ‘‘बडे बडे शहरों में…’’ या वाक्यांनं त्यांचा बळी घेतला. आबांना आपला बळी गेला याचं दु:ख नव्हतं; तर जे आपण बोललेलोच नाही ते वाक्य आपल्या कपाळावर कोरलं गेलं, याची त्यांना सल होती. एका वृत्तवाहिनीनं आबा असं बोलल्याचं पहिल्यांदा सांगितलं आणि नंतर सगळ्यांनी तीच लाइन घेतली. आबांना त्यावर विचारलं तर म्हणायचे, ‘‘मी असं बोलल्याचा एक तरी पुरावा द्या…’’ तो खरोखरच नव्हता. आपण ‘हिंदू दहशतवाद’ प्रकाराचा छडा लावल्यानं त्या विचारांशी जवळच्या माध्यमांनी हे वाक्य आपल्या तोंडी घातलं, असं काहीसं आबा सूचित करायचे. त्यात तथ्य नाही असं मानणं अवघड होतं. गृहमंत्री आबा आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख या दोघांनाही त्यावेळी पायउतार व्हावं लागलं. आबांचं पुनर्वसन झालं. पण उपमुख्यमंत्रीपद काही परत मिळालं नाही.

आबांची अनेक विषयांवर मतं पटायची का? नसेल कदाचित. पण ती मांडण्याचा आबांचा साधेपणा भावायचा. त्यांच्यावरची टीका आपोआप सौम्य व्हायची. अपवाद फक्त एक. त्यांचा डान्स बारबंदीचा निर्णय. तो त्यांनी घेतल्यावर त्यांच्यावर सडकून टीका केली. मी युरोपीय, पाश्चात्त्य नजरेतनं शहरांकडे पाहात होतो. मोठ्या शहरांत ज्याला हवं ते मनोरंजन, नाइट लाइफ असायला हवं असं माझं मत. आणि बंदी घातली कशावर की उलट चोरट्या व्यवहारांना ऊत येतो, भ्रष्टाचाराची संधी वाढते आणि त्यातल्या रकमा फुगत जातात; तेव्हा नियमन करा, पण बंदी नको अशी माझी भूमिका होती. आणि आहेही. त्याच दृष्टिकोनातनं मी आबांच्या निर्णयावर टीका करायचो. आबांचा निर्णय खूप भाबडा आहे, असं वाटायचं आणि त्या निर्णयाला समर्थन मिळताना पाहून टीकेचा जोर आणखी वाढायचा, हे असं सुरू होतं. मग एकदा आबांचा फोन आला. ‘भेटू या’ म्हणाले. ती भेट चित्रपटातल्या प्रसंगासारखी आजही मनात ‘दिसते’ मला. विषय अर्थातच डान्स बारबंदीचा…

आबा त्यांच्या आयुष्याची गोष्ट सांगत गेले. सुरुवातीचं समृद्ध बालपण. पण भावकीतनं वाटण्या झाल्यावर आलेली हलाखी, दारिद्र्य, उपेक्षा असं सगळं सांगता सांगता आबांनी थेट विचारलं, ‘‘कोणाचा संसार व्यसनानं विस्कटल्याचं कधी पाहिलंय का तुम्ही?’’ या प्रश्नानं मी जरा विचारात पडलो. थातूरमातूर उदाहरणं दिली. तर आबा म्हणाले ‘‘… ती तशी लांबचीच की… पण कधी तुमच्या कोणा पाव्हण्याच्या घरचे रस्त्यावर आल्याचं अनुभवलंय का…?’’ मी म्हटलं, ‘‘नाही.’’ आबा म्हणाले, ‘‘मी ते अनुभवलंय. माझ्या आईच्या संसाराची माती झाली वडिलांच्या व्यसनानं. रस्त्यावर आलो. मेलेल्या बापाचे कपडे आल्टर करून घातलेत मी कॉलेजला जाताना… मयताचे कपडे जाळतात आमच्यात. मला ते घालावे लागले इतकं दारिद्र्य हुतं आमचं. कॉलेजपर्यंत साधी स्लिपरही लागली नव्हती पायाला… डान्स बारमधल्या बायांच्या नादाला लागलेले बाप्ये पाहिले की हे सगळं आठवतं…’’ आबांच्या त्या धबधब्यासमोर ‘‘प्रत्येक दारू पिणाऱ्याच्या संसाराचा ‘एकच प्याला’ नाही होत…’’ हा युक्तिवाद जिभेवर आला. पण मी गप्प बसलो. आबांचा सात्त्विक संताप खरा होता. त्यांच्या भावना सच्च्या होत्या. जाणवलं, त्या दुखावण्याचा अधिकार नाही आपल्याला.

पुढे २०१४ च्या निवडणुकांच्या आसपास आबांच्या आजाराची बातमी आली. पहिल्यांदा खरं वाटेना. पण वाईट बातम्या कधीच खोट्या ठरत नाहीत. तीही खोटी नाही ठरली. शेवटी शेवटी आबांना भेटावंसं वाटायचं, पण टाळलं. कोणी त्यांचे दवाखान्यातले फोटो वगैरे पाठवायचे. बघवायचे नाहीत ते. आणि पुढच्याच वर्षी आबा गेले. राजकारणाच्या रोगट वातावरणात राहूनही निरोगी राहिलेला एक दुर्मीळ राजकारणी असा बघता बघता दिसेनासा झाला!