|| मकरंद देशपांडे
‘ऐरावत’चा सहावा प्रयोग झाला त्या रात्री मी पृथ्वी थिएटरमध्येच झोपलो. काही नाटकांचं यश वा अपयश, आवडणं-न आवडणं कमी-जास्त फरकानं कळत असतं. पण ‘ऐरावत’मुळे माझ्यात लेखक म्हणून विलक्षण चतन्याचं कुंड निर्माण झालं आणि त्या कुंडात मला हनुमानाचं प्रतिबिंब दिसलं.
त्याचं असं झालं की- मला नाटककार म्हणून महाभारतात डोकवावंसं वाटलं. महाभारताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ‘यन्नेहास्ति न कुत्रचित्.’ अर्थात, ज्या विषयावर इथे चर्चा केली गेली नाही, त्या विषयावर जगात अन्यत्र कुठेही चर्चा झालेली नाही.
त्या रात्री पृथ्वी थिएटरच्या सीटवर झोपलेलो असताना अचानक अर्जुनाच्या रथाच्या ध्वजात बसलेले हनुमानजी दिसले आणि मी खाडकन् जागा झालो. टेडी मौर्याला झोपेतून जागं केलं आणि सांगितलं, ‘स्टेजवर जा.’ तो अर्धवट झोपेत स्टेजवर गेला. त्याला म्हणालो, ‘म्हण- ‘अमृत नहीं विष ज्यादा, घोट घोटकर पिए जग सारा.’ टेडीची झोप उडाली. त्याने ती ओळ पंधरा ते वीस वेळा म्हटली आणि मला ध्वजातल्या हनुमानाची मनोवस्था सापडली. कारण नाटक लिहिणं म्हणजे गोष्ट लिहिणं नव्हे, तर निवडलेल्या वातावरणाची आणि त्यातील जिवंत वा मृत पात्रांच्या मनोवस्थेतलं नाटय़ लिहिणं म्हणजे नाटक लिहिणं असं मला वाटतं.
साधारणत: रामप्रहराला हनुमानाचं स्वगत बोलायला सुरुवात केली. ते नाटक लिहिण्याऐवजी मी सरळ बोलतच गेलो. टेडी माझं ऐकून पुन्हा माझ्या मागे म्हणत होता. त्या स्वगतात होतं, की हनुमान वानराचे देववानर कसे झाले आणि श्रीराम हनुमानाला चिरंजीवी करून आपला अवतार संपवून निघून गेले. त्यानंतरच्या युगात हनुमानाला अर्जुनाच्या ध्वजावर बसून सत्य-असत्य, विश्वासघात, राजनीती, घृणा, द्वेष, सदाचार-दुराचारांनी भरलेलं महाभारत पाहावं लागलं. याबद्दल श्रीरामाकडे हनुमान तक्रार करतात. हा उद्रेक, आक्रोश लिहून झाल्यावर रामप्रहरी पृथ्वी थिएटरच्या स्टेजवर एका नवीन नाटकाची सुरुवात झाली होती.. ‘देववानर’ त्याचं नाव. नाटककार हा ऐकलेल्या, वाचलेल्या, जगलेल्या गोष्टी किंवा अनुभवाला असलेली सीमा तोडतो आणि नाटकाचं एक स्वतंत्र विश्व तयार करतो.
महाभारतात नमूद केलेलं आहे की सूर्यास्तानंतर युद्ध थांबायचं. मृत अथवा जखमी, सैनिक, घोडे, हत्तींचा अंतिम विधी किंवा त्यांच्या जखमांवर मलमपट्टी केली जायची. दुसऱ्या दिवसाच्या युद्धनीतीची चर्चा केली जायची. पण मला प्रश्न पडला की, ध्वजातल्या देववानर हनुमानाला हे युद्ध पाहून काय वाटले असेल? सूर्यास्तानंतर ते काय करत असतील? त्यांची काळजी कोण घेत असेल? म्हणजे त्यांच्या खाण्या-पिण्याविषयी!! एक नाटककार म्हणून मी कल्पनेची पवनझेप घेतली.
धर्मराजाने त्यांच्या खाण्यापिण्याची आणि आरामाची खास व्यवस्था केली होती. खास सेवक त्यांच्या सेवेस ठेवले होते. ते सेवक होते बातुनी सेवक, संगीत सेवक, शस्त्रागार सेवक. पण सूर्योदय ते सूर्यास्त चाललेल्या अनीतीच्या युद्धाने क्रोधित होऊन देववानर हनुमानजी धर्मराजाची खास सेवा नाकारतात आणि एका जांभळाची मागणी करतात. मात्र, युद्धासाठी सर्व झाडं कापावी लागल्याने जांभूळ मिळत नाही; पण जांभळाचा रस मिळतो. हनुमानजी ध्वजात बसायला नकार देतात. हनुमानाचा राग शांत करण्यासाठी संगीत सेवक शांत रसातले स्वर छेडत जांभूळ रस प्यायला भाग पाडतात. हनुमानाला शांत झोप लागते आणि त्यांना स्वप्न पडतं. ते स्वप्नात मनुला भेटतात. सृष्टीची आणि मानवाची उत्पत्ती यावर ते चर्चा करतात. जेव्हा ते झोपेतून जागे होतात तेव्हा युद्ध संपलेलं असतं. अठरा दिवस चाललेल्या युद्धात महाभयंकर हानी झालेली असते. कुरुक्षेत्राचं चित्र भीषण असतं. एका मृत सनिकाची आई आणि एक धोबी हनुमानाला कुरुक्षेत्रात देववानर असूनही महाभारत घडू दिल्याबद्दल जबाबदार ठरवतात.
हनुमानाला खूप दु:ख होतं. तो धर्मराज युधिष्ठिराने आपल्या सेवेस ठेवलेल्या सर्व सेवकांना हाका मारतो, पण एकही सेवक येत नाही. येतात ते श्रीकृष्ण. आणि दु:खी हनुमानाला ते सांगतात, की ते सारे सेवक मीच होतो. तुला रसपान करून झोपवणारा संगीत सेवक मीच होतो. कारण तुला हे युद्ध पाहवलं नसतं. आणि युद्ध अटळ होतं. माझ्या रामावतारात तू माझी खूप सेवा केलीस. आता या युगात तुझी सेवा करणं मला भाग होतं. तुझी काळजी घेणं गरजेचं होतं. हनुमानाच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नाहीत. श्रीकृष्ण जांभूळ त्याच्यासमोर ठेवतात. श्रीकृष्णाचा प्रसाद म्हणून हनुमान जांभूळ खातात आणि श्रीकृष्णाला आपल्या चिरंजीवीत्वाचं प्रयोजन विचारतात. त्याला उत्तर देत श्रीकृष्ण म्हणतात, ‘येणाऱ्या कठीण, हिंसक भविष्यात तुझ्यामुळे सेवाभाव, निष्ठा, जीवनावरील विश्वास कायम राहील. तुझ्यामुळे लोकांत जगण्याची शक्ती असेल. कोपऱ्या-कोपऱ्यावर तू उभा राहशील. झाडाखाली, मलाच्या दगडावर स्थानापन्न होशील.’
आज हनुमानाची मंदिरं गल्लीगल्लीत, गावागावांत आहेत. युद्धं आजही संपलेली नाहीत. हिंसा, अनीती, कुटिलता, विश्वासघात यांची प्रचीती दिवसाच्या कुठल्याही तासा-मिनिटाला येतेच आहे. जगण्यासाठी बळ हवं आहे. हवेतलं प्रदूषण श्वासात पोहोचलंय. पवनपुत्र हनुमानाच्या चालीसात म्हटलंय, ‘सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा.’ रावणाच्या अशोकवाटिकेत सीतेला भेटायला सूक्ष्म रूप आणि रावणाची लंका जाळायला विराट रूप. दोन्ही तुझीच रूपं. आता जग तारायला चालीसारूपी तू आहेस.
नाटक लिहून (बोलून) झाल्यावर हनुमान (देववानर) करणार कोण? हनुमानाची शारीरिक विशालता, हृदयानं हळवा, खरेपणा आणि हनुमानाचा राग दाखवणारा नट कोण? सुधीर पांडय़ेनी माझ्याबरोबर ‘कस्तुरी’ आणि ‘बाजे ढोल’मध्ये काम केलं होतं. पण देववानरासाठी वेगळी हिंमत हवी होती. शेपटी लावून स्टेजवर फिरणं आणि प्रेक्षकांच्या मनात असलेला हनुमान साकारणं आणि नाटककाराला अपेक्षित हनुमानपण दाखवणं आणि त्यासाठी असलेल्या अनुभवामुळे आलेली मर्यादा तोडणं हे सगळं एक आव्हानच होतं. सुधीरभाईंनी हे आव्हान पेलण्यासाठी लागणारी मेहनत घेतली. मोठी स्वगतं बोलणं, शेपटी लावून बसणं, त्यात न अडखळता चालणं आणि संवाद बोलणं खूप वेळा करून पाहिलं. कसलीही लाज बाळगली नाही. मी त्यांना म्हटलं की, श्रीरामाकडे आपली तक्रार, आपला राग मांडताना पोट फुगवून ते वाजवा म्हणजे पोटातला राग बाहेर काढताय असं वाटेल. त्यांनी मला उलट विचारलं नाही, की अरे, हे बालिश वाटेल. पण मला तेच हवं होतं. हनुमानाचा राग प्रेमापोटीच तर होता आपल्या प्रभूकडे!!
,सुधीरभाईंचा शेपटी लावून केलेला हनुमान पाहून नसिरुद्दीन शाह सर अचंबित झाले होते. दुबेजींना ‘देववानर’ हे नाटक एवढं आवडलं होतं, की जो जो रंगकर्मी त्या काळात त्यांना भेटला असेल, त्या प्रत्येकाला ते ‘देववानर’बद्दल सांगायचे. मला अगदी कलकत्याहूनही फोन आला होता ‘देववानर’च्या प्रयोगासाठी. कारण दुबेजी कलकत्याला जाऊन आले होते. त्यांना नाटकाचं लिखाण खूपच आवडलं होतं आणि सुधीरभाईंनी सादर केलेला हनुमान! मी श्रीकृष्ण आणि सगळे सेवक साकारले होते.
नट म्हणून दिग्गज सुधीरभाईंबरोबर तालमी करताना खूप मजा यायची. सेवक थोडेसे खोडकरही होते. नाटकाची शैली लोकनाटय़ा-सारखी मुक्त असल्याने मी सेवक म्हणून हनुमानाची काळजी घेताना त्यांना खूप त्रासही द्यायचो. दुबेजी मला म्हणाले होते की, खरं प्रेम असेल तर भक्त देवालासुद्धा चांगलं-वाईट बोलू शकतात. माझं प्रेम तर हनुमानावरही होतं आणि सुधीरभाईंवरही.
मी बरेचसे Theatrical Effects वापरले. जसा अर्जुनाचा रथ! लेवल्स लावून रथ तयार केला. मागे त्याला पांढऱ्या Satin चा गोलाकार सायक्लो लावला आणि मागनं लाइट फिरवत त्याच्यासमोरून बाण नेले. त्याचे प्रतिबिंब मागून रथावर पडले आणि sound effect नी रथ वेगात पुढे चाललाय असा आभास निर्माण केला. हनुमानासाठी स्वादिष्ट भोजन पाठवण्यात येतं. ते स्वर्गातून आलंय हे सूचित करण्यासाठी लाइट जिथे अडकवले जातात तिथून एक पडदा खाली सोडला होता आणि सेवक तो पडदा हातात घेतो तेव्हा तो एखाद्या घसरगुंडीसारखा दिसतो आणि मग वरून लहान-मोठे लाडू पाठवले जातात. ते मी (सेवक) उडवायचो आणि थेट हनुमानाच्या हातात जायचे. मला लोकनाटय़ाची गंमत आणि Theatricality- दोन्ही ठेवायचं होतं.
एकदा एका प्रयोगात गंमतच झाली. खरं तर accident च म्हणायला हवा. लहान लाडू आधी पाठवले जायचे म्हणून मी न बघता ते उडवायचो. पण त्या दिवशी बॅकस्टेजवाला नवीन होता. त्यानं मोठा लाडू- साधारण व्हॉलीबॉलएवढा- आधी सोडला. तो माझ्या डोक्यावर आदळला. मी डोकं धरून स्टेजला चक्कर मारून पडलो. प्रेक्षक खूप हसले. पण आमचा संगीतवृंद घाबरला. कारण लाडू खरंच जोरात डोक्यावर आदळला होता. मी दहा अंक मोजले, डोळे उघडले आणि खुणेने सांगितलं की, मी ठीक आहे. गाणं सुरू झालं.
सुहास जोशी हे खरं तर व्यवसायाने accident. पण हौशी संगीतप्रेमी. त्यांना मी ‘देववानर’चं गाणं स्वरबद्ध करायला आणि गायलाही सांगितलं. दुसऱ्या बेलनंतर ते गायचे आणि प्रयोग सुरू होईस्तोवर छान वातावरण निर्माण व्हायचं. सुहासची बायको सुनिता त्याला म्हणाली की, मकरंद आणि अंश थिएटर ग्रुपमुळे तू आता नाटकात गुंतलास. खरं तर त्याची सुरुवात पृथ्वी फेस्टिव्हलच्या शेवटच्या रात्री पार्टीमध्ये सुहासने गायलेल्या गाण्यामुळे झाली होती. मला ते गाणं खूप आवडलं होतं. म्हणून मी त्याला सांगितलं की, तू असं काहीतरी गाणं म्हण माझ्या नवीन नाटकात. आणि ते नाटकातल गाणं होतं..
‘नाही सत नाही.. लाल भूमिका रंग नाही
नाही सत नाही..
गोधुलि पर गौ लौट के घर आये
पर आंगन नही’
जय हनुमान! जय सुधीरभाई!
जय नाटक! जय पृथ्वी!
mvd248@gmail.com