माणिक वर्मा

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी (१६ मे) निमित्त राजहंस प्रकाशनातर्फे शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती : माणिक वर्मा आणि परिवार’हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात खुद्द माणिकताईंनी आपल्या संगीत कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी..

घरातल्या सर्वांचा पाठिंबा आणि आधार असल्यामुळे माझे गाण्यांचे कार्यक्रम सतत चालू होते. भरपूर तऱ्हेच्या गाण्यांच्या रेकॉर्ड निघत होत्या- भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, शास्त्रीय संगीत वगैरे वगैरे. मराठीतली पहिली गझल रेकॉर्ड करण्याची संधी मला मिळाली. ‘सांग कशी गं’ आणि ‘त्या चित्त चोरट्याला.’ कविवर्य राजा बढे यांच्या भावपूर्ण शब्दांना मधुकर गोळवलकर यांनी पंजाबी ठेक्यावरची किती अनुरूप चाल दिली आहे? ‘देव पावला’ या चित्रपटासाठी प्रथमच मी पु. ल. देशपांडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायले. ‘कबीराचे विणतो शेले’सारख्या भक्तिगीताबरोबर, ‘कुणी म्हणेल वेडा तुला’ असं एक गमतीशीर गाणं, ‘तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं’ असं खट्याळ गाणंही मला गायला मिळालं. ‘हसले मनी चांदणे’ अशी अनेक सुंदर भावगीतं, ‘मानाचं पान’ या चित्रपटात वसंतराव देशपांडे यांच्यासोबतचं द्वंद्व गीत अशी कितीतरी गाणी मी पुलंसाठी गायले. त्याशिवाय रेडिओवरच्या ‘बिल्हण’ या सांगीतिकेमध्ये आणि इतरही अनेक कार्यक्रमांत त्यांनी मला गायला बोलावलं.

‘हसले मनी चांदणे’चा आत्ता मी उल्लेख केला तेव्हा त्या रेकॉर्डची एक गंमत मला आठवली. कोलंबिया कंपनीने काढलेल्या या रेकॉर्डच्या कव्हरवर अशी माहिती छापली आहे, ‘हसले मनी चांदणे. गायिका, सौ. माणिक वर्मा, बीए.’ आज ही माहिती पाहताना मजा वाटते. पण त्या काळातल्या माझ्या इतर अनेक रेकॉर्डवरही ‘सौ. माणिक वर्मा, बीए.’ असं छापलं जायचं. म्हणजे माझ्या डिग्रीचं महत्त्व केवळ माईला होतं असं नाही, तर म्युझिक कंपन्यांनाही ‘गायिका पदवीधर आहे,’ हे लोकांना कळावं असं वाटायचं. असो.

ज्यांनी माझ्या गाण्यावर नेहमीच विश्वास ठेवला आणि अनेक उत्तम चाली माझ्याकडून गाऊन घेतल्या, असे एक प्रतिभावान संगीतकार म्हणजे सुधीर फडके. ‘गळ्याची शपथ’ किंवा ‘तुझी रे उलटी सारी तऱ्हा’, ‘बहरला पारिजात दारी’, ‘पहाट झाली उद्यानातून’सारखी भावगीतं, ‘घननिळा लडिवाळा’सारखं गोड चित्रपटगीत आणि ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटासाठी ‘जाळीमंदी पिकली करवंद’सारखी बहारदार लावणीही त्यांनी मला गायला दिली. ‘गीतरामायण’ या ग. दि. माडगूळकर लिखित आकाशवाणीच्या सांगीतिकेतील सीतेची माझी गाणी ‘निरोप कसला माझा घेता’, ‘तोडिता फुले ही’ अतिशय लोकप्रिय झाली.

मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की आयुष्यात मला खूप चांगले गुरू भेटले. संगीत शास्त्रीय, उपशास्त्रीय असो किंवा ललित अंगाचं… त्यासाठी ज्ञानी जाणकार गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आतापर्यंत मी जी नावं घेतली, त्याशिवाय बाळ माटे यांची भक्तिगीतं, ‘सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण’, ‘विजय पताका श्रीरामाची’ आणि ‘अमृताहुनी गोड’सारख्या भजनांनी तर मला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. वसंत पवार, गजानन वाटवे, राम फाटक, दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, गोविंद पोवळे, प्रभाकर जोग, निळकंठ अभ्यंकर अशा अनेक नामवंत प्रथितयश संगीतकारांनी अतिशय मेहनत करून गाण्याचा वेगवेगळा रंग, भाव आणि बाज माझ्याकडून गाऊन घेतला.

पण कलाकार कलेच्या संदर्भात कायम नावीन्याचा भुकेला असतो. मीही त्या गोष्टीला अपवाद नाही. डोक्यात कायम एक प्रश्न सतावत असतो, ‘अजून नवीन काय शिकता येईल?’

मला अनेकदा श्रोते विचारायचे, ‘तुम्ही नाट्यसंगीत का म्हणत नाही?’ मी लोकांना सांगायला गेले नाही. पण माझ्या मनातलं उत्तर असं होतं, की ‘असं कुठलंही गाणं ‘म्हण’ म्हणून गाता येतं का? त्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि मी अजून नाट्यसंगीताचा अभ्यास केलेला नाही.’

नाट्यसंगीत गाण्याबद्दल विचारणा होऊ लागली. लोकांचा आग्रह वाढत चालला. काही दर्दी व्यक्तींनी मला असंही विचारलं की, ‘‘तुझा आवाज बालगंधर्वांच्या जातीचा आहे, तर तू त्यांची गाणी का म्हणत नाहीस?’’ उभा महाराष्ट्र ज्यांच्या गाण्यावर, लोभस व्यक्तिमत्त्वावर आणि नाटकांवर प्रेम करीत होता, त्या बालगंधर्वांची मीही एक भक्त होते. त्यांना रंगमंचावर पाहणे, त्यांच्या अभिनयाचा आणि गाण्यांचा आनंद घेणे, हा माझ्यासाठी खास अनुभव असायचा. त्या काळात महाराष्ट्रावर बालगंधर्वांच्या गाण्यांचा खूप मोठा पगडा होता, त्यामुळे त्यांची गाणी म्हणणं म्हणजे शिवधनुष्य उचलायला हात घालणं, पण आव्हान जितकं मोठं, तितकंच मोठं बळ मनात निर्माण होतं आणि स्वत:ला सिद्ध करावंसं वाटतं.

मी ठरवलं, बालगंधर्वांना भेटायचं आणि त्यांच्याकडून त्यांची गाणी शिकून घ्यायची. मी नानांना (नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांना भेटायला गेले. एव्हाना ते खूप थकले होते. पण त्यांनी मला ओळखलं, हसून प्रेमानं स्वागत केलं आणि एक गाणं म्हणायला सांगितलं. मी ‘अमृताहुनी गोड’ हे गाणं म्हटलं, त्याचं त्यांनी खूप कौतुक केलं. मग धीर करून मी त्यांना विचारलं, ‘‘मला तुमची गाणी गायची आहेत. तुम्ही माझी गाणी बसवाल का?’’ ते म्हणाले, ‘‘हो, जरूर बसवतो.’’ माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. चेहरा आनंदानं फुलला. तोच ते पुढे म्हणाले, ‘‘पण तू माझ्या ‘कान्होपात्रा’ या नाटकात काम करावंसं अशी माझी इच्छा आहे.’’ माझ्यासाठी हा प्रस्ताव किंवा ही अट अगदीच अनपेक्षित होती. क्षणभर मला काय बोलावं ते कळेना. शेवटी मी खरं ते सांगितलं की, ‘‘मला अॅक्टिंगची भीती वाटते. मला जमणार नाही.’’ नाना उत्साहानं म्हणाले, ‘‘गाणं जमतंय ना? तसंच अॅक्टिंग जमेल. मी शिकवतो तुला.’’ मी सांगण्याचा प्रयत्न केला की, ‘‘अभिनय माझ्या रक्तातच नाही. तर मी तो कसा करणार?’’ पण ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले. ‘‘तू माझ्या नाटकात काम केलंस, तरच मी तुला नाट्यसंगीत शिकवतो. अन्यथा नाही.’’ बालगंधर्वांचा नकार घेऊन मी त्यांच्याकडून निघाले. अपेक्षाभंगाचं दु:ख होतं, उदास वाटत होतं, पण मी निराश झाले नव्हते. मला दिशा दिसली होती. गुरूचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळालं नाही तरी त्यांची अप्रत्यक्ष शिकवणी मी सोडणार नव्हते. महाभारतातली एकलव्याची कथा आठवत मी घरी आले.

माईकडे बालगंधर्वांच्या सर्व रेकॉर्ड होत्या. त्या मी काढल्या आणि नाट्यसंगीताची माझी साधना सुरू झाली. पुढचे कितीतरी दिवस आणि महिने मला एकच ध्यास. मला बालगंधर्वांची गायकी गाता आली पाहिजे. रेकॉर्डवरची त्यांची गाणी मी परत परत ऐकायचे. ऐकताना त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वर, प्रत्येक जागा आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करायचे. त्यांच्या गाण्यातली वैशिष्ट्ये जाणून घेऊन, ती माझ्या गाण्यात उतरतायत की नाही, हे परत परत तपासून पाहायचे. पु. ल. देशपांडे यांनीही मला उत्तेजन दिलं.

बालगंधर्व स्त्रीच्या भूमिकेत ही गाणी रंगमंचावर सादर करायचे, त्यामुळे त्यांच्या गाण्यांत लडिवाळपणा असायचा, गमकेच्या अंगानं तान घेताना त्यातही गोडवा असायचा, पुरुषी आक्रमकता नसायची. बालगंधर्वांची गायकी गळ्यात बसविताना मला एका गोष्टीचं पक्कं भान सांभाळावं लागलं- ती गोष्ट म्हणजे, मला त्यांच्या गाण्याची नक्कल करायची नाहीये. त्यांचा आदर्श समोर ठेवून माझं स्वतंत्र स्थान निर्माण करायचं आहे.

ही सर्व व्यवधानं सांभाळण्यासाठी मी त्यांच्या रेकॉर्ड इतक्यांदा ऐकल्या की शेवटी माई म्हणाली, ‘‘अगं माणिक, या रेकॉर्ड काळ्याच्या पांढऱ्या झाल्या. पुरे आता ते ऐकणं.’’ मी अर्थातच तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि माझ्या मनाचं पुरेसं समाधान झालं तेव्हाच रेकॉर्ड बाजूला ठेवल्या.

आता गरज होती ती ही गाणी पेटीवर बसवून घेण्याची. मग नारायणरावांना पेटीवर साथ करणारे केशवराव कांबळे यांना मी भेटले. ते गात नसत. पण नारायणरावांना साथ करताना त्यांचा प्रत्येक स्वर कांबळे यांच्या बोटांतून पेटीवर उमटत असे. त्यांनी ‘नाथ हा माझा’ हे पहिलं गाणं पेटीवर बसवून दिलं.

एचएमव्हीनं माझी बालगंधर्वांच्या गाण्याची ही पहिली रेकॉर्ड काढली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हरिभाऊ देशपांडे यांनी माझ्याकडून अजून काही गाणी बसवून घेतली आणि बालगंधर्वांच्या गाण्यांच्या माझ्या पुढच्याही अनेक रेकॉर्ड एचएमव्ही कंपनीनं काढल्या. एव्हाना बालगंधर्व हयात नव्हते. ‘गंधर्वसंगीताचा बहुमोल ठेवा माणिक वर्मांनी जपला.’ या रसिकांनी एका वाक्यात दिलेल्या शाबासकीनं मी भरून पावले.