‘लोकरंग’ (१ जानेवारी) मधील ‘नव्या वाटांच्या शोधात नाटककार’ हा कमलाकर नाडकर्णी यांचा लेख वाचला. किर्लोस्कर, खाडिलकर यांच्या जमान्यात ऊर्जितावस्थेत असलेला, परंतु हळूहळू झोपी जाऊ लागलेला मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा आणण्याचे सारे श्रेय सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांच्याकडे जाते, हे नि:संशय! त्यांच्या अनेक उत्तमोत्तम नाटकांनी मृतवत झालेल्या मराठी संगीत रंगभूमीला नवसंजीवनी दिली खरी; परंतु पुढील काळात ही परंपरा अन्य नाटककारांना टिकवून ठेवता आली नाही. हे सारासार मराठी नाटय़सृष्टीतील अपयश असून दर्दी संगीत नाटय़प्रेमींचे दुर्दैवच नव्हे का! आताच्या काळात संगीत नाटकांचे प्रमाण पार आटलेले दिसते. भविष्यात मराठी नाटय़प्रेमी संगीत नाटकांना कायमचे मुकणार यात तिळमात्र शंका नाही. तसेच ‘संगीत नाटक’ म्हणजे काय? असे प्रश्न आपणास भावी पिढय़ा विचारल्याशिवाय राहणार नाहीत, हेच खरे! - बेंजामिन केदारकर, विरार तर पर्यावरण व जीवनमान सुधारेल ‘लोकरंग’(जानेवारी)‘हलहलके शपथांवरती निमित्तांचा गंज चढतो’ या मंदार भारदे यांच्या लेखातून नवीन वर्षांचे संकल्प व त्यातील आरंभशूरता यावर विनोदी शैलीत भाष्य होते. वजन कमी करणे, सकाळी फिरण्यास जाणे, नवीन काही शिकणे, व्यसन सोडणे यांसारखे अनेक संकल्प मोठय़ा जिद्दीने व उत्साहाने केले जातात. नंतर काही दिवसात उत्साह मावळतो व जीवन पूर्वपदावर येते. सद्य:स्थितीत काही संकल्प केले तर पर्यावरण व आपले जीवनमान सुधारेल. त्यात एक तरी झाड लावणे व वाढवणे, पाणी वीज इंधनबचत, संकटात सापडलेल्या व्यक्तीला यथाशक्ती मदत यांसारख्या गोष्टी झाल्या तर काही प्रमाणात सुधारणा होईल. हे संकल्प मात्र सोडून देण्यासारखे नाहीत. - प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक. lokrang@expressindia.com