लेखक, कवी, संगीतकार, किंबहुना कुठल्याही सर्जनशील निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला विचारला जाणारा सर्वसामान्य प्रश्न असतो, ‘तुम्हाला सुचतं कसं?’ खरं म्हणजे या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणं खूपच अवघड आहे. प्रत्येक निर्मितीक्षम माणसाची ‘सुचण्याची’ प्रक्रिया वेगवेगळी असते. श्रीनिवास खळेंना बसच्या किंवा लोकलच्या प्रवासात पहिल्याच फटक्यात अप्रतिम चाली सुचल्याचं आपण ऐकलं आहे. याच्या बरोब्बर उलटं- स्वतचं समाधान होईपर्यंत एकाच गाण्याच्या खळेकाकांनी दहा-दहा चाली केल्याचंदेखील ऐकलं आहे. याचाच अर्थ प्रतिभावान कलाकारांनाही ‘सुचण्या’प्रमाणेच ‘न सुचण्याचा’ अडथळाही आल्याशिवाय राहत नाही.

सुरुवाती सुरुवातीला मी मला हव्या त्या कवितांना ‘स्वान्त सुखाय’ चाली लावायचो तेव्हा सटासट चाली सुचताहेत याचा अहंकार होता. हाच अहंकार पहिलंवहिलं नाटक करत असताना त्यातल्या गाण्यांना खूप प्रयत्न करूनही चाली सुचत नाहीयेत, हे लक्षात आल्यावर पिकल्या पानासारखा गळून पडला! तासन् तास पेटीसमोर बसूनदेखील ‘आपल्याला काहीच सुचत नाहीये’ याची जाणीव झाल्यावर मला दरदरून घाम फुटत असे. ऑप्शनला टाकलेले सगळे प्रश्न परीक्षेत आले तर जी भीतीची शिरशिरी मणक्यातून जाते, तशीच काहीशी अवस्था नेमून दिलेल्या कामाची वेळ संपत आली आहे, आणि अजून मनात काहीही शिजलेलं नाही, हे उमजल्यावर नसती झाली तरच नवल. गणितात निदान फॉम्र्युले तरी पाठ करता येतात; पण कल्पना सुचण्यासाठी कोणतंही समीकरण नाही.. उत्तर नाही. ‘सुचणं’ कोणी शिकवत नाही.. शिकवूही शकत नाही.

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

काही कला नुसता विषय शिकून येत नाहीत. त्या उपजतच असाव्या लागतात. छंद, वृत्त, यमक इत्यादी व्याकरणाचे प्रकार आत्मसात करणाऱ्या व्यक्तीलाही उत्तम कवी होता येईल असं मुळीच नाही. तसंच गायनात किंवा वादनात पारंगत होऊनही संगीत दिग्दर्शन करता येईलच असंही नाही. पण यात एक मेख आहे. कारण नुसतंच उपजत ज्ञान असूनही भागत नाही. एखाद्याला कलेची दैवी देणगी लाभली असली तरी उत्तम निर्मितीक्षमता यायला सखोल अभ्यासाची जोडही असावी लागते. आजपर्यंत जगभरातल्या लोकांनी केलेलं काम वाचणं, ऐकणं आणि सतत डोळे आणि कान उघडे ठेवून आजूबाजूला घडणारं सारं काही आत्मसात करत राहणं, हेच सच्च्या सर्जनशील कलाकाराचं लक्षण आहे. मनाची आणि मेंदूची कवाडं उघडी ठेवली तर कलाकाराची निर्मितीप्रक्रिया सतत चालू राहते, या मताचा मी आहे.

एकदा गझलसम्राट मेहदी हसन खाँसाहेब पेशावरचा कार्यक्रम संपवून दुसऱ्या गावाकडे निघाले होते. जेवण्यासाठी त्यांची गाडी एका विश्रामगृहापाशी थांबली. जेवण गरम होण्यास अवधी आहे हे कळलं, आणि खाँसाहेबांनी फावल्या वेळात पुढच्या कार्यक्रमात गायच्या गाण्यांची तालीम करायचं ठरवलं. त्यांनी आपल्या साथीदाराला गाडीतून स्वरमंडळ आणायला सांगितलं. पेशावरच्या कार्यक्रमात सगळ्यात शेवटी भूप रागातली गझल सादर केल्यामुळे स्वरमंडळ ‘सा रे ग प ध सा’ या भूप रागाच्या सुरांमध्ये वाजणं अपेक्षित होतं. पण तारा छेडल्यावर शुद्ध धवत थोडा कोमल वाजत आहे हे खाँसाहेबांच्या लक्षात आलं. गाडीच्या हादऱ्यांमुळे धवत उतरला होता. वास्तविक पाहता त्यांना तो कोमल धवत पटकन् सुरात लावता आला असता. पण ते काही काळ कोमल धवतासकट स्वरमंडळ छेडत राहिले. विलक्षण प्रतिभा असलेल्या आणि सतत नवनिर्मिती करण्याच्या मागे असलेल्या या कलाकाराला स्वरमंडळातून येणारा हा नवीन नाद दर्दभरा, विहंगम वाटला. त्यांनी याच स्वरसमूहात नवीन गझलची चाल रचली. ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले..’ ही चाल झाल्यानंतर मेहदी हसनसाहेबांना आणि त्यांच्या साथीदारांना जेवणाची लज्जत काही औरच लागली असेल, हे नक्की! भूप रागात शुद्ध ऐवजी कोमल धवत वापरला तर त्या स्वरसमूहाला ‘भूपेश्वरी’ असं संबोधलं जातं. अजीज नाझाची ‘चढता सूरज धीरे धीरे’ ही कव्वाली, किंवा हृदयनाथ मंगेशकरांचं ‘मालवून टाक दीप’ ही गाणी भूपेश्वरी रागावर आधारित आहेत.

चौकस बुद्धी आणि चौकस कान हे क्रांतिकारी निर्मितीप्रक्रियेचे महत्त्वाचे घटक आहेत. अमेरिकेतल्या मेम्फिस शहरात घडलेली १९५१ सालची गोष्ट. ‘रॉकेट एटीएट’ या गाण्याचं ध्वनिमुद्रण चालू असताना विली किझार्ट या गिटारवादकाच्या अ‍ॅम्प्लीफायरमधून विचित्र आवाज येऊ लागला. मिसिसिपी ते मेम्फिस या प्रवासात गाडीच्या टपावरून पडल्यामुळे अ‍ॅम्प्लीफायर खराब झाल्याकारणानं त्यामधून गिटारचा फाटका ध्वनी येत असल्याची मीमांसा झाली. या ध्वनिमुद्रिकेचा निर्माता सॅम फिलिप्सला हा विचित्र, वेगळा ध्वनी भावला. त्याने गाण्यात तो तसाच वापरला आणि गिटारच्या या फाटक्यातुटक्या ध्वनीने रॉक संगीतात क्रांती केली. हा ‘डिस्टॉर्टेड’ साऊंड किंवा शब्दश: विद्रूपीकरण झालेला ध्वनी तरुण श्रोत्यांनी एवढा डोक्यावर घेतला, की पुढे पुढे गिटारिस्ट मंडळी आपल्या गिटारच्या स्पीकर्सना ब्लेड मारून किंवा त्याच्या कोनमधे पेन्सिली आणि स्क्रू-ड्रायव्हर्स खुपसून गिटारमधून फाटका आवाज काढायचा आटापिटा करायचे.

१९५० च्या उत्तरार्धात लिओ फेंडर या गिटार बनवणाऱ्या इसमाने इलेक्ट्रिक गिटारला एक यंत्र जोडून त्यातून हा विद्रूप आवाज येण्याची कायमची सोय केली आणि अनेक स्पीकर्सचे जीव वाचवले! लिओने सुरू केलेल्या फेंडर कंपनीची गिटार्स आणि ‘डिस्टॉर्शन’, ‘फझ’, ‘ओव्हरड्राइव्ह’ यांसारखी गिटारच्या आवाजावर प्रक्रिया करणारी उपकरणं आजही तेव्हाइतकीच प्रसिद्ध आहेत. ‘स्मोक ऑन द वॉटर’ हे डीप पर्पलचं गाणं, ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ हे इगल्सचं गाणं, ‘रॉक ऑन’ या चित्रपटातली शंकर-एहसान-लॉय यांनी स्वरबद्ध केलेली गाणी, किंवा ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हे अवधूत गुप्तेचं गाणं- या सर्व गाण्यांमध्ये डिस्टॉर्शन गिटारचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपघातानं शोध लागलेल्या गिटारच्या या फाटक्या ध्वनीची नशा पिढय़ान् पिढय़ा संगीतकारांना आणि श्रोत्यांना भुलवते आहे. विली किझार्टने मनाची कवाडं बंद करून त्याचा मोडलेला अ‍ॅम्प्लीफायर दुरूस्त करायला दिला असता तर निर्वविाद रॉक संगीताचं खूप मोठं नुकसान झालं असतं.

अनुभवाने ‘सुचण्याचा’देखील सराव होतो, हे नक्की. कारण अनुभवाइतका चांगला शिक्षक दुसरा कोणी नाही- असं म्हणतातच की! गेल्या काही वर्षांमध्ये ‘सुचण्या’ची एक वेगळीच प्रक्रिया माझ्या मनामध्ये घडू लागली आहे. एखादी नवीन कथा ऐकली किंवा गाण्याचे बोल वाचले की माझ्या डोक्यात चक्रं सुरू होतात. कधी प्रवासात किंवा झोपायच्या प्रयत्नात असताना एखादा स्वरसमूह किंवा ताल किंवा विशिष्ट वाद्याचा विचार विजेसारखा मनात चमकून जातो. हाच तो ‘सुचण्याचा’ क्षण! तो नेमका क्षण घट्ट पकडून ठेवायचा मी आटोकाट प्रयत्न करतो. पण मुठीतून वाळू निसटून जावी तसा तो क्षणही निसटून जातो. धून मी रेकॉर्ड करून ठेवू शकतो.. करतोही. पण दुर्दैवाने ‘त्या’ क्षणाची अनुभूती नाही रेकॉर्ड करून ठेवता येत. मात्र, एखाद्या चित्रपटाचं किंवा नाटकाचं संगीत करून काम पूर्ण झालं की माझ्या मनात कमालीची पोकळी निर्माण होते. आंतर्बाह्य़ रितं झाल्याचा भास होतो. माझं सर्वस्व मी या कलाकृतीला दिलं आहे, आणि यापुढे नवीन आणि वेगळं मला काहीही सुचणार नाहीये, या कल्पनेनं काळजाचं अक्षरश: पाणी पाणी होतं. एका अनामिक भीतीने मन ग्रासलं जातं. त्या क्षणी सरस्वती माझ्याकडे बघून मंद हसत असली पाहिजे असं मला वाटतं. कारण नवी कथा किंवा गाण्याचे बोल ऐकले, की तिच्याच कृपेनं डोक्यातली चक्रे पुन्हा सुरू होतात..

राहुल रानडे rahul@rahulranade.com

(समाप्त)