डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com परवा रात्री नऊच्या सुमारास आमचे नातू त्यांच्या आई-वडिलांसह ‘आबू’ला भेटण्यासाठी अवतरले. आल्या आल्याच त्यांनी ‘यूटय़ूब’चा ताबा घेतला आणि मग ‘ससा रे ससा, कोणास ठाऊक कसा’, ‘चल रे भोपळ्या..’, ‘फाइव्ह लिट्ल मंकीज्’ अशी एकापाठोपाठ एक दृक्-श्राव्य फर्माईश सुरू झाली. पुढचा एक तास एकापाठोपाठ लागणाऱ्या त्या बालगीतांनी आमच्या घरात आनंदाचे उधाण आले. ‘चल रे भोपळ्या’मधली भोपळ्याला टुणुकटुणुक चालवणाऱ्या तुडतुडीत म्हातारीने आमचे बालविश्व समृद्ध केले. आजही मोठा गरगरीत भोपळा घेताना याला दरवाजा कोठून करता येईल, या विचारात मी अडकतो. कासवाने ‘स्लो अॅण्ड स्टेडी विन्स द रेस’ सांगून सत्त्वशील, पण सातत्यपूर्ण आचरणाचा संदेश दिला. ‘फाइव्ह लिट्ल मंकीज्’ आमच्या वेळेला नव्हते; पण आमच्या काळातील माकडे ‘दोन बोक्यांनी आणला हो आणला’ या गाण्यातून लोण्याच्या गोळ्याचे डिस्ट्रिब्युशन राइट्स धूर्तपणे वापरून थर्ड पार्टी अॅसेसरची कामगिरी करावयाचे. ‘कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा’ या वाक्याने घराबाहेर पडून शाळा, सर्कस, सिनेमा अशा गमतींची तोंडओळख झाली. आज ‘फाइव्ह लिटिल फिंगर्स’मुळे मुलं कळत-नकळत आकडे मोजायला आणि त्यांचा क्रम लावायला शिकली आहेत. ‘रेन रेन गो अवे’ आणि ‘ये रे ये रे पावसा’ ही वस्तुत: दोन्ही संस्कृती आणि भौगोलिक परिस्थितींच्या प्रतिबिंबाची परस्परविरोधी रूपे; पण पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ओढावलेल्या चेहऱ्यांनी आमचीही अवस्था ‘रेन रेन गो अवे’ अशी केली. आजही ‘नाच रे मोरा’ लागलं की पुलं आठवतात आणि राष्ट्रीय पक्ष्याला केलेली ती आंतरराष्ट्रीय, अक्षयी आळवणी अमेरिकेत जन्माला आलेल्या एतद्देशीय एनआरआय नातवंडालाही खिळवून देणाऱ्या चिमण्या आज अस्तंगत झाल्या आहेत. जे आहे ते वाटून घ्यायचं, ही शालीनता सरली आहे आणि ‘पिग्गी ऑन दि रेल्वेट्रॅक’मधून धडधडत येणाऱ्या इंजिन ड्रायव्हरची ‘आय डोन्ट केअर’ ही उद्दामता बालपणातला अॅग्रेसिव्हनेस वाढवते आहे. शतके उलटली, पिढय़ा बदलल्या तरी ही अक्षय्य गाणी विरली नाहीत. ती ताजीतवानी, तरतरीत राहिली याचे श्रेय सोपे शब्द, सार्थ सूर, समर्पित स्वर आणि त्यात दडलेला भाव यांना आहे. कळत-नकळत गुंगवून टाकण्याची आणि संस्कार करण्याची त्यांची शक्ती अफाट आहे. शिक्षण कसे द्यायचे याचा हा वस्तुपाठ आहे. जे आपण हसत-खेळत स्वीकारतो आणि पूर्णपणे आत्मसात करतो ते खरे शिक्षण. शिक्षणाने आपल्याला भिववू किंवा भेडसावू नये, तर नवे ज्ञान आपल्यात भिनवावे. ते आपल्याला हवेहवेसे वाटावे असे आपले शैक्षणिक धोरण असावे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज माध्यमांचा सुकाळ आहे. कसे द्यायचे याचे पर्याय आहेत; काय द्यावयाचे याचा दुष्काळ पडू नये. आमच्या बालपणी म्हातारी भोपळ्यात बसून मुंबईहून पुण्याला काही दिवसांत जायची. आज आमच्या नातवंडांच्या म्हाताऱ्या एक्स्प्रेस वेवरून अडीच तासांत पोहोचतात. पुढच्या तीन दशकांत त्यांची मुलेबाळे हायपर लूपने पंधरा मिनिटांत पोहोचू लागतील. तंत्रज्ञान बदलतेय, तत्त्वं अक्षय्यी राहावीत, एवढीच काय ती अपेक्षा.