डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com महाभारतातील अनेक व्यक्तिमत्त्वे मला नेहमीच भुरळ घालतात; त्यापैकीच एक आहे कर्णाचे. दैवाने ज्याच्यावर जन्मापासून अंतापर्यंत उभा दावा केला आणि त्याची कोणतीही चूक नसताना संचिताने ज्याची कायम प्रतारणा केली असे व्यक्तित्त्व म्हणजे कर्ण. पराक्रमाच्या प्रकटीकरणाच्या आदल्या रात्री येऊन जन्मदात्रीने त्याच्या जन्माचे रहस्य उलगडून त्याच्या मनात आयुष्यातला नेमका प्रश्न उभा केला- ‘को ऽ हम्?’ मी नक्की कोण आहे? सूर्यपुत्र की सूतपूत्र? हस्तिनापुराचा जन्मदत्त उत्तराधिकारी की रक्षक सेनाधीश? मी काय करण्यासाठी जन्माला आलो आहे? आज मी जे काही करतो आहे तेच माझे मूळ उद्दिष्ट आहे का? को ऽ हम्? आज हा प्रश्न आणि गोंधळ उपस्थित करण्याचे मुख्य कारण म्हणजे माझा ‘कर्ण’ झालाय. व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला Identify crisis म्हणून संबोधले जाते. चाळिशी - पंचेचाळिशी गाठली की प्रश्न भेडसावू लागतो. करोनाच्या फटकाऱ्यामुळे नोकऱ्या गमावून घरात बसलेल्या अनेकांना तिशी-पस्तिशीतच या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागले. जे या प्रश्नाला थेट भिडले त्यांना पर्याय सापडले. संगीतज्ज्ञ असलेल्या माझ्या काही मित्रांनी खानाखजाना उघडला. आपण कोण आहोत आणि हे काय करतो आहोत, या क्षुद्र प्रश्नांनी त्यांना ग्रासले नाही. पण सारेच इतके धाडसी आणि नवउन्मेषक वृत्तीचे नव्हते. त्यांना या Crisis ला सामोरे जाणे सोपे गेले नाही आणि अनेकांनी प्रयत्नांची कवचकुंडले गमावली. अस्तित्वाचा उद्देश आणि जगण्याचे मर्म हरविले की रोजच्या ‘असण्यात’ला मथितार्थ हरवू लागतो. आपले नेमके प्रायोजन काय? आणि आपण ज्या प्रवासाला निघालो होतो त्याची वाट तर चुकलो नाही नं? पुन्हा एकदा आतूनच स्वत:चा शोध घेण्याची ही वेळ. अठरा अक्षौहणी सैन्य आणि अग्रणी उभे असलेले गुरू आणि गुरुबंधू पाहिल्यावर धनुर्धर अर्जुनाचीही नेमकी अशीच अवस्था झाली होती- मी कोण? काय करतोय? हेच माझे प्राक्तन आहे का? अर्जुनाला पडलेल्या या कोडय़ांची उत्तरे द्यायला त्याला उत्तम सारथी लाभला होता. ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणून त्याने अर्जुनाला उत्तर दिले आणि त्याच्या मनातील Identity Crisis संपविला. आपल्या प्रत्येकाला आपल्याच मनात खोलवर शोध घेऊन त्या ‘सारथ्या’चा साक्षात्कार घडवून आणायला हवा. हा शोध सर्वव्यापी असावा. आपण hesistant hero अर्थात दोलायमान नायक असून चालण्यासारखे नाही. कारण ते नायकत्व दुबळे आणि क्षणभंगुर ठरते. मानवी व्यक्तिमत्त्वाची आंतरिक शकले उडतात आणि मग वेगवेगळ्या द्वंद्वांचा उगम होतो. आत्मविश्वास गमावला की संशयाची भुते मानगुटीवर बसू लागतात. घरातील, ऑफिसमधील इतर सहकारी आपल्याविरुद्ध काही खलबतं तर करत नाहीत ना, हा विचार बळावू लागतो. धाडस लयाला जाते. सूक्ष्मातला ‘मी’ आणि समाजातला ‘मी’ यांचे हे द्वंद्व असते. चिंता चितेप्रमाणे भडकते आणि माणूस आतून भावनिकदृष्टय़ा तुटतो. आता पुन्हा स्वत: सिद्ध करावयाचे तर बा गोष्टी अपुऱ्या पडतात. QR Code, IRIS Mapping, face Imprints तुम्हाला तुमच्या नावाशी जोडतात, पण इथे गरज असते ती तुम्ही पुन्हा तुमच्या अंतरआत्म्याशी कनेक्ट होण्याची. पारा उडालेल्या आरशासारखी ही अवस्था असते. इथे आरसा पुन्हा रीप्रोसेस करायला हवा. अभिमान असावा, पण गर्व नसावा. एखाद्या व्यक्तीचे मीपण गळून पडते म्हणजे काय? एकतर तो हतबल, निराश आणि भकास झाला आहे, स्वत्व हरवले आहे किंवा तो पाण्यात मीठ विरघळावे तद्वत् सर्वसमावेशकत्वाकडे वाटचाल करू लागला आहे. आत्मानंदाचा प्रवास श्रेयस्कर, आत्मविश्वासाचा ऱ्हास नव्हे. .. गाडी रुग्णालयातून घरी निघाल्यावर नेहमीच्या शिरस्त्यानुसार एफएम लावले. ‘‘आईना मुझसे मेरी पहली सी सूरत माँगे मेरे अपने मेरी होने की निशानी माँगे.’’ सूरज सनीमने लिहिलेले ‘डॅडी’मधील तलत अजीजने अजरामर केलेले गाणे माझ्या मनातील Identity Crisis अधोरेखित करते झाले. मी अधिकच निराश झालो. गाणे संपले, एफएमवर सोनूने गायलेली गीतकारी जाहिरात लागली, ‘‘तू बदले तो ही बदले जमाना औरों से पहले खुद को ये समझाना’’ माझ्या चक्रव्यूहाचा भेद झाला होता.