‘लोकरंग’मधील (९ डिसेंबर) ‘उंची महत्त्वाची की कलात्मकता?’ हा दत्तात्रय पाडेकर यांचा नर्मदेच्या तीरावर उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यासंबंधीचा लेख वाचला. कला म्हणून शिल्पकलेचा योग्य तो सन्मान राखला जायलाच हवा. तिचा बेहिशेबी धंदा आणि राष्ट्रनेत्यांच्या प्रतिमेचा राजकारणासाठी गैरवापर करणे हे केव्हाही निंद्यच. कारण अलीकडे अनेक नेत्यांचे पुतळे अत्यंत बेढब, बेंगरूळ स्वरूपात उभारले गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कलेची जाण नसलेले गल्लीछाप चिल्लर नेते जेव्हा पाच-पन्नास रुपये गोळा करून एखादा पुतळा बनवण्याचे कंत्राट देतात तेव्हा तो पुतळा किती भयावह होतो, हे काही वर्षांपूर्वी इंदूरला उभारलेला इंदिराजींचा अर्धपुतळा ज्यांनी पाहिला असेल त्यांना विचारून बघा! अखेर बरीच टीका झाल्यावर तो काढून त्या जागी इंदिराजींचा उत्तम पुतळा उभारण्यात आला. शिवाय अशा विकृत पुतळ्यांनी देशाची जी जमीन अकारण व्यापली जाते तिचाही विचार व्हायला पाहिजे. स्पष्ट सांगायचं तर असे निर्जीव पुतळे आजच्या आधुनिक जगात निरुपयोगी, जागा अडवणारेच सिद्ध होत आहेत. उदा. तथाकथित लोकप्रियतेच्या निकषावर निर्माण झालेला माओचा पुतळा तो जाताच फोडून टाकण्यात आला होता. अशा परिस्थितीत नव्या पिढीला राष्ट्रहिताची प्रेरणा देणारे कलात्मक पुतळे- तेही त्या व्यक्तींची महत्ता, कर्तृत्व लक्षात घेऊन बनविण्याची जबाबदारी नव्या दमाच्या तरुण, कल्पक शिल्पकारांवर सोपवली जायला हवी. हे कलेच्या व खर्चाच्या दृष्टीने सर्वस्वी हितावह ठरेल.

– श्रीकृष्ण बेडेकर, इंदूर

नेत्यांना सौंदर्यदृष्टीच नाही!

‘या पुतळ्याच्या जाहिरातीत ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’सह जे पुतळे दर्शवले आहेत, त्या सर्व पुतळ्यांमध्ये  सौंदर्य आणि कलात्मकता प्रामुख्याने आढळते..’ हे जे दत्तात्रय पाडेकरांनी लेखात म्हटले आहे त्याच्याशी आपल्याकडील राजकारण्यांचा काडीमात्र संबंध नाही. त्यांच्याकडे ती सौंदर्यदृष्टीच नाही, तर उच्च दर्जाचे पुतळे कसे उभारले जातील? या लेखातील लेखकाच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

– जगदीश फड