पंकज घाटे डॉ. रा. शं. वाळिंबे लिखित ‘एकोणिसाव्या शतकांतील महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना - भाग पहिला (१८०० ते १८४५)’ या पुस्तकाच्या साठ वर्षांपूर्वीच्या कष्टप्रद जन्माची गोष्ट.. डॉ. रामचंद्र शंकर वाळिंबे यांचं ‘एकोणिसाव्या शतकांतील महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना - भाग पहिला (१८०० ते १८४५)’ हे पुस्तक नोव्हेंबर १९६२ साली प्रसिद्ध झालं. या पुस्तकाची जन्मकथा स्वभावाने तऱ्हेवाईक असल्यामुळे वाळिंबे यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला मुद्दामहून सांगितली. ज्या खस्ता खाऊन मोठय़ा धाडसानं हे पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाला या महिन्यात (नोव्हेंबर २०२२) साठ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या पुस्तकाच्या पहिल्या भागाची कहाणी! रा. शं. वाळिंबे १९४५ पासून पुस्तकांसाठी लिखाण करीत होते. या पुस्तकाच्या आधी जवळपास ३२०० पृष्ठांचा मजकूर भरेल इतकं लिखाण त्यांच्या हातून झालं होतं. पण या पुस्तकाची कथाच निराळी घडल्यामुळे त्यांनी विशेषत्वानं तिचा उल्लेख सुरुवातीला केला आहे. ‘नाटककार गडकरी’ हे पुस्तक लिहित असताना त्यांना १९ व्या शतकातल्या जुन्या मराठी नाटकांची पुस्तकं जमवण्याचा नाद लागला. यातून त्यांच्याजवळ बहुतेक सर्व महत्त्वाची नाटकं जमली. या सामाजिक नाटकांच्या अभ्यासातून त्यांनी ‘मराठी नाटकांतील सामाजिक समस्या’ या विषयावर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. यातूनच त्यांच्या मनात या साऱ्या प्रश्नाचा अगदी मुळापासून सखोल अभ्यास करावा अशी प्रेरणा निर्माण झाली. आता, अभ्यासाला सुरुवात करायची म्हणजे १८३० ते १८५० या काळातली मराठी पुस्तकं आणि नियतकालिकं अभ्यासणं आवश्यक होतं. ही साधनंही सहजासहजी उपलब्ध होण्याजोगी नव्हती. मिशनरी शिक्षण, आरोग्याच्या जोडीनं धर्मप्रसाराचं काम त्या काळात जोरदार करत होते. त्यांची साधनं अभ्यासत असताना, ‘बॉम्बे गॅझेट’ आणि ‘बॉम्बे कुरियर’ या वर्तमानपत्रांच्या फाइल्स त्यांच्या हाती लागल्या. त्या बारकाईने वाचून एका नव्या अभ्यासाच्या प्रेरणेनं वाळिंबे झपाटून गेले. खुद्द मिशनऱ्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ, ब्रिटिश अधिकारी, व्यापारी आणि फिरस्त्यांनी लिहिलेल्या आठवणी, सरकारी पत्रव्यवहार आणि कागदपत्रे, चरित्र ग्रंथ, गॅझेटियर्स, इत्यादींचा अभ्यास करून टिपणं काढली. याच्या जोडीला, १८५० नंतरची उपलब्ध होणारी जुनी मराठी पुस्तकं आणि नियतकालिकं मागतील ती किंमत देऊन विकत घेण्याचा उपक्रम वाळिंबेंनी सुरू केला. खूप कष्ट आणि भरपूर पैसा खर्च करून हे दुर्घट काम ते कसोशीनं करत होते. तसेच, जी पुस्तकं, मासिकं पैसा खर्च करूनही विकत घेणं अशक्य झालं; अशा पुस्तकांचं वाचन ग्रंथालयांमध्ये जाऊन केलं. शिवाय, ‘नेटिव ओपिनियन’, ‘इंदुप्रकाश’, ‘केसरी’ यांच्या फायली पाहून त्यांचीही टिपणं करून घेतली. अशा रीतीनं अनेक महिन्यांनी भरपूर साधनसामग्री हाताशी आली. या तयारीनंतर काही ठिकाणी व्याख्यानांची तजवीज करून संकल्पित मांडणीचा आराखडा मनाशी तयार केला. आता तयारी पूर्ण होत आली. वाळिंबेंनी प्रत्यक्ष लिखाणाची सुरुवात १९६१ च्या एप्रिल महिन्यात केली. त्या महिन्याच्या शेवटाला चार प्रकरणं लिहूनही झाली. सुरुवातीलाच इतका वेग घेतलेली लिखाणाची गाडी पुढच्या महिन्यांत चांगलीच मंदावली. हे काम सुरू होऊनही आता तीन वर्ष उलटून गेली होती. इतक्यात घात झाला! १२ जुलै १९६१च्या पानशेतच्या धरणफुटीनं पुण्यात पुराचा जो लोंढा घुसला त्यानं होत्याचं नव्हतं केलं! वाळिंबेंच्या सतत तीन वर्ष चाललेल्या सगळय़ा प्रयत्नांवर पाणी पडलं. त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यावर किमान पंधरा फूट पाणी होतं. वाळिंबे त्यावेळी मुंबईला होते. त्या पुरानं गावात चार-पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं. १३ तारखेला वाळिंबे जेव्हा घर उघडून आत आले तेव्हा त्यांना तिथलं दृश्य पाहून ब्रह्मांड आठवलं. आता यातून आपण उठूच शकणार नाही हीच त्यांच्या मनाची पहिली प्रतिक्रिया झाली. घरात रचून ठेवलेली सगळी पुस्तकं कोसळून जमिनीवर पडली होती. त्यांच्यावर वीतभर चिखल साचला होता. पुस्तकासाठी म्हणून तयार केलेल्या टिपणांच्या सुमारे ३० वह्य ड्रॉवरमध्ये होत्या. तो सगळा ड्रॉवर पाण्यानं आणि मऊ चिखलानं काठोकाठ भरलेला होता. ही सगळी भीषण स्थिती, पुस्तकांचा झालेला लगदा पाहून त्यांचा नाद सोडणं भाग आहे या विचारानं वािळबे खचून गेले.पण जिवापाड जतन केलेल्या त्या पुस्तकांचा मोह सुटेना. धीर करून त्यांनी कामाला सुरुवात केली. पूर्णपणे वाया गेलेली पुस्तकं पोत्यात भरून निष्ठुरपणे टाकून दिली. उरलेली पुस्तकं, भिजलेल्या वह्य एका नातेवाईकांच्या घरी वाळत घातल्या. पुन्हा तीन महिन्यांनी या सगळय़ाची उलथापालथ करताना त्यांचा जीव मेटाकुटीला आला. भिजलेल्या वह्य आता वाळल्या. मात्र, अनेक वह्यंमधलं शाईनं केलेलं लिखाण अदृश्य झालं. पानं अगदी कोरी करकरीत झाली होती. वाचता येण्याजोगा मजकूर अगदी थोडाच शिल्लक राहिला. टिपणांच्या वह्य अशा रीतीनं वायाच गेल्या. ज्या काही उरल्या, त्यातला मजकूर लावून वाचणं कठीण होऊन बसलं. पुस्तकांची तीच दशा! ती वाळली; मात्र शिलाई उसवून पानं सुटली. पानंच्या पानं गहाळ झाली. अनेकांची मुखपृष्ठं, सूची बेपत्ता झाल्या. शिल्लक पुस्तकांच्या बाईंडिंगसाठी खर्च करून त्यांची डागडुजी करून घेतली. नोव्हेंबरमध्ये सरकारनं हजार रुपयांची मदत केली. तिचा याकामी उपयोग झाला. वाळिंबेंचा ग्रंथसंग्रह वाया गेल्याचं कळल्यावर रुईया कॉलेजच्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी कोणालाही पत्ता लागू न देता एका महिन्यात पुस्तकांसाठी सातशे रुपये जमवून दिले. वािळबे या अभिनव गुरुदक्षिणेमुळे भारावून गेले. अशी मदत होऊनही अत्यंत आवश्यक पुस्तकं पुन्हा जमा करणं अशक्य होतं. शिवाय, दोन वर्ष खपून तयार केलेली टिपणं पुन्हा तयार करावी लागणार होती. ती पुन्हा तयार करण्यासाठी वाळिंबेंनी एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत ठाण मांडून बसायचा निर्धार केला. तल्लख स्मरणशक्तीच्या जोरावर पुस्तकांची नावं आठवून, ती शोधून नव्यानं टिपणं काढायला सुरुवात झाली. शोधलेल्या पुस्तकांतून आवश्यक मजकूर जलद गतीनं जमा होऊ लागला. त्यातच त्यांची प्रकृतीही कुरकुरू लागली होती. याबाबत, ‘आपण जिवाच्या करारानं बैठक मारून हे काम निकरानं पूर्ण केलं. सामना अटीतटीचा झाला,’ अशी टिप्पणी वाळिंबेंनी केली आहे. विषय पूर्वी डोक्यात पूर्ण मुरलेला असला तरी तो नव्यानं वहीत उतरवणं भागच होतं. मानसिक सामर्थ्यांच्या जोरावर त्यांनी शारीरिक दुबळेपणावर मात करत सतत सहा महिने परिश्रम करून टिपणं पूर्ण केली. हे काम पूर्ण झाल्यावर मे महिना ते सप्टेंबर दरम्यान पुस्तकाचं लिखाण वाळिंबेंनी पूर्ण करत आणलं. नोव्हेंबर १९६२ साली पुस्तक प्रकाशित झालं. छपाईचं काम चालू असतानाही पुढच्या विषयांची टिपणं करणं चालू असल्यामुळे त्यांचा उपयोग या पुस्तकाच्या परिशिष्टात करावा लागला. पुस्तकाच्या आणि काही प्रकरणांच्या शेवटची ती नमुनेदार परिशिष्टं जुन्या पिढीतल्या अभ्यासकानं काढलेल्या टिपणांचा नमुना म्हणून पाहण्याजोगी आहेत!एकोणिसाव्या शतकातल्या सामाजिक घडामोडींच्या महत्त्वाच्या पर्वाची हकिकत देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून वाळिंबे यांनी हा ग्रंथ साकार केला. याचं स्वरूप संशोधनात्मक तसंच विवेचनात्मक असल्यामुळे अनेक मूळ आधार-संदर्भाचा उल्लेख जागोजागी केला आहे. ज्या विधानांविषयी वाचकांच्या मनात शंका उत्पन्न होईल असं वाटलं, तिथे त्यांनी मुळातलं अवतरण दिलं. विवाद्य विधानांच्या तसंच, प्रत्येक महत्त्वाच्या विधानाला तपशीलवार आधार देण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. ‘नामूलं लिख्यते किञ्चित्’ ही प्रतिज्ञा करून लिखाण करताना पाश्चात्त्य लेखक कोणती पथ्यं पाळत असतात त्यांची यादीच वाळिंबे यांनी या कहाणीच्या शेवटाला दिली आहे. ही पाळूनच त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. संशोधनात्मक लेखनात जी पथ्यं पाळली पाहिजेत त्यात जाणूनबुजून हलगर्जीपणा केलेला असतो. माहिती किंवा अवतरणाचा योग्य निर्देश न करणं, ऋण मान्य करण्याचं चातुर्यानं टाळणं हा मराठी लेखनात नेहमी दिसून येणारा दोष आहे, असं त्यांनी नमूद केलंय. छपाईच्या कामाला सुरुवात झाल्यानंतरही वेळोवेळी जी माहिती मिळत गेली त्याचाही वापर परिशिष्टांमध्ये करून घेतल्यामुळे पुढच्या अभ्यासकांची मोठी सोय झाली. केवळ लेखक-अभ्यासकांनीच नव्हे तर प्रकाशकांनीही लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, सुरुवातीची तपशीलवार अनुक्रमणिका, शेवटी दिलेली आधारभूत ग्रंथांची यादी आणि विस्तृत सूची देऊन (एकूण ३३ पाने) हा ग्रंथ प्रकाशित झाला. साठ वर्षांपूर्वी एका मराठी सारस्वतानं प्राप्त परिस्थितीमुळे आलेली निराशा टाकून मोठय़ा धीरानं हे पुस्तक छापलं आणि त्याची जी कहाणी सांगितली त्याला तोड नाही. Standing on the shoulders of giants अशी एक फ्रेज आहे. जुन्या दिग्गजांच्या खांद्यावर चढून पुढचं, खूप लांबवरचं दिसतं असं म्हणतात. एकोणिसाव्या शतकाच्या संदर्भात रा. शं. वाळिंबे यांच्या या पुस्तकाच्या बाबतीतही हे लागू पडतं! pankajghate89@gmail.com