अंजली चिपलकट्टी
इंडोनेशियातल्या सुहार्तो यांचं सरकार उलथवल्यानंतर ज्या कट्टरतावाद्यांनी सत्ता ताब्यात घेतली त्यांनी राजकीय विरोधकांच्या कत्तली तर केल्याच, पण गावागावांत संशयावरून सामान्य माणसांच्याही कत्तली केल्या. त्याबद्दल व्ही. एस. नायपॉलनं एका पुस्तकात लिहिलंय की, एखाद्या गावाची सार्वत्रिक कत्तल करायची असायची तेव्हा तिथे गॅमलॅन- म्हणजे इंडोनेशियन ऑर्केस्ट्रा आणला जायचा आणि ‘काम तमाम’ होईपर्यंत संगीत वाजवलं जायचं. एका वृद्ध साक्षीदाराला याचं कारण विचारल्यावर त्यांनं उलट प्रश्नार्थक चेहेऱ्यानं विचारलं, ‘का म्हणजे? ते (‘काम’) अधिक सुंदर करायला!’

चार्ली चॅप्लिनच्या एका सिनेमात एक भुकेली तरुणी ब्रेड चोरते म्हणून न्यायाचे ठेकेदार (पोलीस) तिला पकडतात; मग चार्ली तो गुन्हा स्वत:च्या अंगावर घेऊन तिला सोडवतो असा एक प्रसंग आहे. फसवणूक/ चोरी करणं हे मूल्य चुकीचं असलं तरी या प्रसंगात त्या दोघांविषयी आपल्याला करुणाच वाटते आणि त्यांच्यावरच अन्याय झाला असं वाटतं. का बरं?

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हिटलरच्या माघारी ज्या अनेक नाझी सैनिक-अधिकाऱ्यांना अटक झाली त्यापैकी एक म्हणजे कार्ल डुनित्स. लाखो ज्यूंची कत्तल झाल्यानंतरही त्याला पश्चात्ताप वाटत नव्हता. ‘नाझी मूल्यं थोरच आहेत आणि माझं मन साफ आहे,’ असं तो खटल्यात शेवटपर्यंत म्हणत राहिला. जर्मन वंश ‘पवित्र-शुद्ध’ ठेवणं आणि हिटलरच्या सत्तेला निष्ठा वाहणं ही नैतिक मूल्यं त्याला मानवी जीवांपेक्षा महत्त्वाची वाटत होती.

हे वाचत असताना आपलं मन काय प्रतिसाद देत होतं हे बरोबर-चूक ठरवणाऱ्या आपल्या नैतिक चौकटीवर अवलंबून असतं. ही नैतिक चौकट कशी ठरते? लगेच येणाऱ्या प्रतिक्रिया आंतरिक (intuitive) नैतिकतेवर अवलंबून असतात, तर काही काळानंतर आलेल्या प्रतिक्रिया या विवेकातून आलेल्या असतात.

वैज्ञानिकांनी जगभरातल्या विविध संस्कृतींचा अभ्यास केल्यानंतर काही नैतिक मूल्यं ‘सार्वत्रिक’ म्हणून पुढे आली. स्वातंत्र्य, न्याय, सुरक्षितता (आनंद), प्रेम, करुणा, निष्ठा, पवित्रता आणि सत्ता (त्याचं अनुपालन). अनेक अभ्यासांतून असंही दिसून आलं आहे की, यापैकी कोणती नैतिक मूल्यं अधिक महत्त्वाची वाटतात यानुसार ढोबळपणे लोकांची दोन गटांत विभागणी होते. अर्थात ही विभागणी काटेकोर नाही, पण यातून काही दुवे मिळतात.

दोन्ही गटातल्या लोकांना प्रेम आणि करुणा ही मूल्यं महत्त्वाची वाटतात, पण इतर मूल्यांबाबत मात्र फरक पडतो. कारण त्यांची मानसिक जडणघडण निराळी असते. एका गटातल्या (‘ल’ गट म्हणू) लोकांना न्याय, स्वातंत्र्य, सुरक्षितता ही मूल्यं जास्त महत्त्वाची वाटतात, तर दुसऱ्या गटातल्या (‘क’ गट म्हणू) लोकांना निष्ठा, पवित्रता आणि सत्ता (अनुपालन) ही मूल्यं जास्त महत्त्वाची वाटतात. (हे दोन गट म्हणजे लेफ्ट आणि राइट नाही बरं का!)

समूहाच्या योग्य चलनवलनासाठी जनतेचं नियंत्रण करणारी सत्ता आवश्यक आहे आणि त्यासाठी जनतेनं सत्तेला निष्ठा वाहिली पाहिजे, अनुपालन केलं पाहिजे; स्वातंत्र्याचा बाऊ न करता समाजातल्या आपापल्या भूमिका ‘पवित्र’ मानून निभावल्या पाहिजेत अशी काहीशी ‘क’ गटाची मानसिकता असते. याउलट प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असून प्रत्येकाला सुरक्षितता, आनंद मिळवायचा समान अधिकार हवा, सत्तेचा हस्तक्षेप फक्त न्याय्य व्यवस्थेसाठी हवा, सत्ता अन्याय करत असेल तर निष्ठेऐवजी तिला प्रश्न विचारले पाहिजेत असं ‘ल’ गट मानतो. परंपरा टिकल्या पाहिजेत, परंपरांमध्ये बदल केले तर समाज अस्थिर होईल अशी भीती ‘क’ गटाला वाटते. तर पारंपरिक व्यवस्था व्यक्तीवर अन्याय करत असतील तर ती बदलली पाहिजे असं ‘ल’ गट मानतो. आपला सुवर्णकाळ मागे निघून गेला आहे आणि तो आपल्याला परत आणायचा आहे या कल्पनेने ‘क’ गट भारावलेले असतात (‘जुनं ते सोनं’). तर ‘ल’ गटाचे लोक आपला सुवर्णकाळ अजून पुढे आहे आणि त्यासाठी आपल्याला काय बदल केले पाहिजेत अशा विवंचनेत असतात.

श्रम विभागणी असेल तर समाज अधिक प्रगती करतो, त्यामुळे उतरंडीची व्यवस्था असावी, कौटुंबिक सलोख्यासाठी स्त्री-पुरुषांच्या भूमिका ठरलेल्या असाव्यात, घरात वडीलधाऱ्या मंडळींचा वचक असावा, समाज एकजिनसी असेल आणि त्यांच्या श्रद्धा एकच असतील तर व्यवस्था टिकतात आणि देश प्रगती करतो. स्वातंत्र्य, समतेपेक्षा त्यागावर भर असावा अशा ‘क’ गटाच्या नैतिक धारणा असतात आणि हे त्यांना प्रामाणिकपणे वाटतं.

दोन्ही गटांत सहानुभूतीला महत्त्व असलं तरी सहानुभूती आपल्याच गटापुरती- ज्यांच्या श्रद्धा एकच आहेत, त्यांच्यासाठीच राखणं हे ‘क’ गटाला महत्त्वाचं वाटतं. तर ‘ल’ गटाला फक्त आपल्याच गटाशी निष्ठा ठेवण्यापलीकडे सर्वाशी सहभाव असणं महत्त्वाचं वाटतं. नैतिक धारणा अशा वेगळ्या घडण्यामागे काय कारणं असावीत याचं काही वैज्ञानिक संशोधन उपलब्ध आहे.

दोन्ही गटातल्या लोकांच्या बुद्धिमत्तेत फार फरक असतो असं नाही, परंतु ‘क’ गटातले लोक भावनांबाबत जास्त संवेदनशील असतात. असं का बरं? याची काही उत्तरं जैविक म्हणजे मेंदूच्या जडणघडणीत दडलेली आहेत. कसं ते पाहू.

आपलं वर्तन/ अनुभव आणि आपली नैतिक मूल्यं यांत अंतर पडलं तर मेंदूला विसंगतीला तोंड द्यावं लागतं. सर्वच माणसांचा तो टाळण्याकडे कल असतो, कारण त्यामुळे मनात दु:ख आणि वेदना तयार होतात, ज्या अंतरंगी (visceral) ) असतात. यालाच नैतिक बोधनात्मक विसंगती (moral cognitive dissonance)  असं म्हणतात. (नाव मोठं लक्षण खोटं!)  समजा, आपण कोणाची तरी फसवणूक केली असेल तर त्यामुळे आलेल्या ‘गिल्ट’ पायी आपण असं का वागलो याची सफाई म्हणून एक गोष्ट रचतो. आपलं वागणं त्या परिस्थितीत कसं बरोबर होतं या स्पष्टीकरणानं (post-hoc) आपलं दु:ख हलकं होतं. (मग न विचारताही आपण ते लोकांना सांगत सुटतो!)

आता होतं असं की ‘क’ लोकांचा भावनात्मक मेंदू- विशेषत: अमिग्डला जास्त संवेदनशील असतो. थोडय़ा उद्दीपनामुळेही त्यांना जास्त असुरक्षित वाटतं. याचा अर्थ अशा नकारात्मक अनुभवामुळे त्यांना जास्त अंतरंगी (visceral) वेदना होतात. म्हणून असे नकारात्मक अनुभव सहन करण्याची त्यांची क्षमता ‘ल’ गटाच्या  तुलनेत कमी असते. त्यामुळे ‘क’ मेंदू वेळीच सावध होऊन ‘जुगाड’ करतो. अनुभव/ माहिती, स्मृती, काल्पनिक गोष्टी हे एकमेकांत गुंफून त्याची अगदी सुसंगत गोष्ट (coherent narrative) तयार करून आपली नैतिक मूल्यं कशी योग्य आहेत याचे एक ‘ऱ्हेटॉरिक’ स्पष्टीकरण तो तयार करतो. पण यासाठी मेंदूला झगडावं लागतंच. म्हणून मग अनिश्चितता, धोका, संदिग्धता, परंपरेतील बदल टाळण्याकडे ‘क’ लोकांचा कल असतो. ‘क’ लोक जास्त गोष्टीवेल्हाळ असतात ते याचमुळे. (न्याय, स्वातंत्र्य वगैरे मूल्यांवर विश्वास असणारे, पण मूल्यांपेक्षा व्यक्तीवर, गोष्टींवर (नॅरेटीव्ह) जास्त निष्ठा ठेवणारे ‘ल’ की ‘क’?)

याउलट ‘ल’ गटातले लोक विसंगतीच्या खोलात जाऊन काय बदल करता येतील असा तार्किक विचार करतात आणि तुलनेत कोरडे असतात. ‘ल’ लोकांच्या सहवेदनेचा मेंदूचा भाग (सिंग्युलेट कॉर्टेक्स) जास्त प्रगल्भ (ग्रे-मॅटर असलेला) असतो. त्यामुळे यांच्या करुणा, प्रेम या भावना स्वत:च्या गटाच्या पलीकडेही पोचतात. परिणामी ‘क’ लोक त्यांच्या निष्ठेवर शंका घेतात, ते प्रतारणा करतात असा समज तयार होतो. वैश्विक सहभावाआधी स्थानिक निष्ठा देशासाठी महत्त्वाच्या असं मानणारे मध्यममार्गीही असतात.

भीती, किळस, भूक यातून तयार होणाऱ्या शारीरीय वेदना/ दु:खामुळे मेंदू कसे नैतिक शॉर्टकट घेतो आणि सोपी उत्तरं शोधतो याचे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. पैकी एक- न्यायाधीशांनी दिलेल्या ११०० जामिनाविषयक निर्णय काय/ कधी दिले गेले याच्या अभ्यासात असं आढळून आलं की जामीन मिळणं आणि ‘फूड-ब्रेक’ याचा निकटचा संबंध आहे. फूड-ब्रेक नंतर जामीन मंजूर करण्याचं प्रमाण ६०% जास्त होतं! पोटात कावळे ओरडत असताना माणसं जास्त आखडू बनतात असं लक्षात आलं. खुल्या मनानं विचार करायला फ्रॅंकोला जास्त ऊर्जा लागते जी अन्नातून मिळते इतका साधा (?) मामला आहे.

किळस किंवा तिटकारा वाटणं या भावनेचा पावित्र्य/ शुद्धता या नैतिक मूल्याशी फार जवळचा संबंध आहे. खराब झालेले अन्न, कचरा, घाण वास, धोका असणारे प्राणी उंदीर, साप, सरडे, झुरळ यांच्यापासून लांब राहावं म्हणून मेंदूत किळस ही भावना उत्क्रांत होत गेली. तीच भावना एखाद्या जीवाचं मरण, रक्त बघून उद्दीपित होते म्हणूनच माणूस हिंसेपासून लांब राहतो. हिंसा अनैतिक वाटते. तर असं किळस = अनैतिक असं समीकरण तयार झालं. पण त्याचे काही परिणाम बरे नाहीत. काळ्या कातडीचे लोक अस्वच्छ ‘वाटतात’ आणि म्हणून अपवित्र वाटणं, समलिंगी संबंधांची किळस वाटते म्हणून ते अनैतिक वाटणं, एखाद्या समूहाला उद्देशून जर कोणी नेता ‘समाजाला लागलेली कीड’, ‘नासका आंबा’, ‘विषारी साप’ असे शब्द वापरतो तेव्हा त्यांच्यापासून धोका आहे असं वाटणं ही नैतिक ‘भूल’ आहे!

तर अशी किळस वाटणं या नकारात्मक भावनेमुळे जे दु:ख तयार होतं त्यामुळे माणसं अधिक संकुचित कशी होतात याबाबत एक प्रयोग बोलका आहे. या प्रयोगात सहभागींना कचऱ्याच्या/ मेलेल्या माशांचा वास येणाऱ्या खोलीत बसवून त्यांच्याशी समलिंगी संबंध, परधर्मीय लोकांबरोबर संबंध, परदेशी-स्थलांतरित यांच्याबाबत चर्चा केली. एरवी याबाबत आक्षेप नसणाऱ्या लोकांनी हे अनैतिक आहे असा निर्वाळा दिला! घाण वास सहन करताना जी वेदना होते त्यामुळं नैतिक संकुचितपणा वाढतो. आपल्या नैतिक मूल्यांत न बसणारं काही काम केल्यावर अंघोळ करावी वाटणं, हात धुवावे असं वाटणं यामागे स्वत:बद्दल वाटणाऱ्या तिटकाऱ्यातून सुटका करून घेणे हे मानसिक कारण आहे. नदीत अंघोळ करून पाप धुण्याचा आणि पावित्र्याचा संबंध आता लक्षात आला असेल.

म्हणूनच ‘क’ गटातले लोक कदाचित पावित्र्य/ शुद्धता अशा मूल्यांना जास्त महत्त्व देत असावेत असं मेंदूविज्ञान सांगतं.

‘आमचीच नैतिक मूल्यं अधिक योग्य’ असं म्हणत एकमेकांना दूर लोटणाऱ्या या दोन गटांमधली फूट रोखण्यासाठी दोघांनाही स्वत:ची नैतिक मूल्यं उपयोगाला येत नाहीत! यालाच जोशुआ ग्रीन हा संशोधक ‘ट्रॅजेडी ऑफ कॉमनसेन्स मोरॅलिटी’ असं म्हणतो. भारतीय संदर्भात बोलायचं झालं तर धर्म/ जातींमुळे चिरफळलेल्या शिक्षित समाजात ही अजून एक फूट रुंदावताना दिसतेय.

बरं मग आता पुढं? नेहमीप्रमाणेच- मेंदू लवचीक असतात- बदलता येतात. एकेकाळी काळ्या लोकांविषयी गोऱ्यांना वाटणारी किळस ही आंतरिक संवेदना आता बदललीच ना.

स्वत:पासून सुरुवात करू. आपण कुठल्या एकाच गटात बसू असं नाही, पण ते शोधायचं असेल तर एक सोपी चाचणी (चाचपणी) करून पाहा- तुम्हाला न आवडणाऱ्या एखाद्या माणसाबद्दल/ नेत्याबद्दल त्याचं काय आवडतं/ त्यानं काय चांगलं केलंय याविषयी एक निबंध लिहायचा! किंवा आवडणाऱ्या नेत्याबद्दल त्याचं काय आवडलं नाही हेच लिहायचं. (असा प्रयोग अमेरिकेच्या निवडणूक काळात केला होता. तेव्हा ‘ल’ गटातल्या ३५% लोकांनी हे आव्हान घेतलं पण ‘क’ गटातल्या जवळजवळ सर्वानी हे आव्हान टाळलं.)

तुम्हाला न पटणाऱ्या एखाद्या नैतिक मूल्याबाबत कोणी विचार करायला सांगितला तर तुम्ही ठामपणे आपली नैतिक मूल्यं योग्य कशी आहेत हे सांगत राहता की, समोरच्याचं ऐकून घेऊन आक्रमक न होता त्यावर मनापासून विचार करता?

विज्ञान असं सांगतं की  १) प्रेम, न्याय, स्वातंत्र्य (स्व-अस्तित्व), करुणा, सुरक्षितता (आनंद) या मूल्यांमागच्या ऊर्मी (पहिला ड्राफ्ट) माणसात नैसर्गिक असतात. त्यासाठी बिनधास्त आपल्या इंटय़ुशनवर भरोसा ठेवा. त्यासाठी विसंगतीचा सामना करावा लागत नाही. २) निष्ठा, पावित्र्य, सत्ता (अनुपालन) ही मूल्यं आंतरिक असली तरी संस्कारित आहेत. त्यानुसार वर्तन करायची वेळ आली तर आपण- ते अशी फूट पडून सामाजिक समस्थिती (ँेी२३ं२्र२)  तुटत नाही ना, याचा विवेकानं विचार करा, इंटय़ुशनवर विसंबून राहू नका.

anjalichip@gmail.com