प्राजक्ता कदम / अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शहरात कायमचा समाज आणि धर्मदुभंग करणारा दहशतवादी हल्ला १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट मालिकेद्वारे झाला. एकामागोमाग १२ स्फोटांनी इथल्या धमन्यांना हादरे दिले. २५७ लोकांचा बळी घेणाऱ्या, ७१३ लोकांना जखमी करणाऱ्या आणि (तीन दशकांपूर्वीच्या)
२७ कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या या व्रणवर्षांची आठवण त्यातल्या पीडितांना अजिबातच नकोय. कुणाचे आप्त या स्फोटांनी हिरावून नेले तर कुणाला कायमचे पंगू बनवले. राहत्या घरातून माणसे बेघर झाली आणि आयुष्यभरासाठी उरणाऱ्या वेदनांची साक्षीदार बनली. तीन दशकांनंतरही पीडितांच्या भळाळत राहिलेल्या जखमांवर टाकलेला दृष्टिक्षेप..

मुंबई शहराला दंगल, दोन गटांतील तणाव या गोष्टींचा स्वातंत्र्योत्तर काळापासून परिचय आहे. पण त्याला धर्माऐवजी आर्थिक असूया आणि त्यातून होणाऱ्या संघर्षांची पार्श्वभूमी होती. ऐंशीच्या दशकात सतत धुमसत राहणाऱ्या ‘खेरवाडी’तील धार्मिक हिंसेचा अध्याय साऱ्या मुंबईभर पसरण्यात १२ मार्च १९९३ या ऐतिहासिक दिवसाला फार महत्त्व. शेअर बाजार, नरसी नाथ स्ट्रीट, शिवसेना भवन, एअर इंडिया इमारत, सेंच्युरी बाजार, माहीम, झवेरी बाजार, सी रॉक हॉटेल, प्लाझा सिनेमा, जुहू सेंटॉर हॉटेल, सहार विमानतळ, विमानतळाजवळील सेंटॉर हॉटेल आदी भागांमध्ये दुपारी दीड ते सव्वातीन या कालावधीत झालेले साखळी बॉम्बस्फोट त्याच्या साक्षीदारांना हादरवूून सोडणारे ठरले. या स्फोटांच्या दहशतीने आणि हानीने सर्वधर्मसमभाव पाळला असला तरी समाजमनात मात्र दोन प्रखर धर्मजाणिवा तयार केल्या- ज्या बदलणे आता अशक्य झाले आहे. वरळीतील सेंच्युरी बाजार परिसरात बसजवळ झालेला स्फोट सर्वात भयंकर होता. त्यात आजूबाजूची वाहने, दुकाने आणि इमारती बेचिराख झाल्या. अनेक घरे पुन्हा वसलीच नाहीत. पंगू झालेले शरीर घेऊन त्यांची फरपट आजही थांबलेली नाही. शेअर बाजार परिसरात त्या वेळी उपस्थित असलेल्यांना तो क्षण दु:स्वप्नांसारखा आजही जाचतो. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशात उसळलेल्या दंगलीच्या झळा मुंबईला आधी बसल्या होत्या. पण दाऊद इब्राहीम आणि त्याच्या हस्तकांनी घडविलेला हा उत्पात शहराला जर्जर करण्यासाठी रचलेला डाव होता. हल्ल्यानंतर शहर सावरले, आणखी दहशतवादी हल्ले थोपविण्यासाठी सज्ज झाले. खटले लढवले गेले, राजकीय फायद्याच्या घोषणा दिल्या गेल्या, चौकशीची चक्रे फिरली. पण तीन दशकांत पीडित सामान्य नागरिकांनी भोगलेल्या वेदनांच्या खुणा काही पुसल्या गेल्या नाहीत.

भीती अजूनही कायम..

सचिन सरमळकर (पीडित)
तीस वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही छातीत धडकी भरवतो. त्या वाईट आठवणींनी दरवर्षी १२ मार्च भीतीदायक ठरतो. शेअर बाजार परिसरात पाऊल ठेवले तरी छातीत दुखू लागते. पुन्हा बॉम्बस्फोट होईल असे वाटत राहते. त्या दिवसाने आयुष्यभर दु:स्वप्नांचा सहवास दिला. शेअर बाजारात आमचा काही पिढय़ांचा ‘पब्लिक इश्यू’ विकायचा व्यवसाय होता. नव्वदीच्या दशकात मी त्यात नुकताच प्रवेश केला होता. या बॉम्बस्फोटाच्या दिवसाने माझे सारे जगणे बदलून गेले. इच्छा असूनही पुन्हा वडिलोपार्जित व्यवसायाकडे वळता येत नाहीए. कारण मनातील भीती इतक्या वर्षांत कमी झालेली नाही. या परिसराचे नाव घेतले तरी तो दिवस लख्ख आठवतो. मुख्य प्रवेशद्वाराजवळ मी बसलो होतो. साधारणत: दीड वाजण्याच्या दरम्यान कानठळय़ा बसवणारा आवाज झाला. डोक्यांवर काचांचा पाऊस पडतो आहे, एवढेच फक्त जाणवत होते. पुढील दहा मिनिटांची कोलाहलस्थिती सहन करता येण्यासारखी नव्हती. लोक सैरावैरा पळत होते. काही रस्त्यांवर निपचित पडून होते. त्या भीषण परिस्थितीत १० मिनिटे काय चालले आहे याची कल्पनाच कुणाला येत नव्हती. त्या परिस्थितीत मी जवळच्या चहाच्या टपरीजवळ आसरा घेतला. काही जणांनी मला रुग्णालयात नेले. डॉक्टर जखम स्वच्छ करीत असताना आपल्याला लागले आहे याची जाणीव झाली. तोपर्यंत सर्व शरीर आणि भवतालही सुन्न झाल्यासारखे वाटत होते. डोक्यात खूप काचा घुसल्या होत्या. पुढे बरीच वर्षे त्या काचांच्या वेदना होत होत्या. डोक्याची जखम बरी झाली. पण मनाची जखम अजून तशीच उरली आहे. त्या दिवसाच्या काळय़ा आठवणीतून बाहेर पडण्याचा, वडिलोपार्जित व्यवसायाकडे वळण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र स्फोटाच्या आठवणी काही जाता जात नाहीत. या वेदना घेऊनच पोटासाठी नंतर अनेक नोकऱ्या केल्या. आता पर्यटन (टुरिस्ट) उद्योगात मी काम करतो. पण शेअर बाजाराचे नुसते नाव जरी ऐकू आले, तरी त्यासह १९९३ च्या स्फोटांत अडकलेले क्षण पुन्हा नजरेसमोर जिवंत होतात.

आर्त हाकांनी पंधरा दिवस झोप उडाली..
चंद्रन अर्जुन (स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी)
मी १९९३ मध्ये महापालिकेच्या लेबर कँपमधील दवाखान्यात कामाला होतो. सेंच्युरी बाजार येथे जेवण्यासाठी गेलो त्यावेळी उडपी हॉटेलजवळून कानठळय़ा बसवणारा आवाज आला. सुरुवातीला दोन-तीन इमारती पडल्या असे वाटले. लोक पळत होते म्हणून मीही घाबरून पळू लागलो. पण नेमके काय झाले, ते पाहूया म्हणून सेंच्युरी बाजार येथे गेलो. हा स्फोट एवढा भयानक होता की, त्यावेळी नव्याने बनवण्यात आलेल्या रस्त्यावर एका विहिरीएवढा खड्डा पडला होता. गाडय़ांमध्ये आग लागली होती. दुकानांमध्ये बसलेली माणसे होरपळून निघाली होती. तिथले पिंपळाचे झाडही जळत होते. घटनेची माहिती देण्यासाठी मी जवळच्या अग्निशमन दलाच्या स्टेशनच्या दिशेने धावलो. पण तेथील कर्मचारी शेअर बाजार येथे झालेल्या स्फोटांमध्ये बचावकार्य करण्यासाठी गेले होते. अशा परिस्थितीत जखमींचे ओरडणे ऐकले आणि मग आम्ही स्वत:च जखमी आणि मृतांना उचलून वरळीतील पोद्दार व परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. केईएममध्ये तर मृतदेह ठेवण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळे जवळच्या मैदानात मृतदेह ठेवले होते. ही दृश्ये पाहून पुढचे १५ दिवस मला झोपच येत नव्हती. वृत्तपत्रांमधले माझे छायाचित्र पाहून पोलिसांनीही दोन वेळा मला चौकशीसाठी बोलावले होते. आजही तो दिवस आठवला, तर स्फोटात जखमी झालेल्यांच्या आर्त हाता ऐकू येतात.

अजूनही मन सुन्न होते..
जगदीश राऊत (स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी)
आता सेंच्युरी बाजार येथे पारसी बेकरी आहे, त्याच जागेवर पूर्वी प्रसिद्ध भारत हॉटेल होते. त्या हॉटेलमध्ये मी मित्रांसोबत चहा घेण्यासाठी गेलो. त्यावेळी कान बधिर करणारा आवाज झाला. सुरुवातीला काय झाले, कळालेच नाही. पण हॉटेलच्या मागच्या बाजूला गेलो. त्यावेळी रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला आणि सर्वत्र मृतदेह विखुरले होते. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, बसचालकाचा मृतदेह रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या नेहरूनगरमध्ये फेकला गेला होता. आम्ही सर्व मित्रांनी जखमींना परळ येथील केईएम रुग्णालयात न्यायला सुरुवात केली. गाडय़ा थांबवून अनेकांना रुग्णालयात नेले. त्यातील बऱ्याच जणांचा नेण्याआधीच मृत्यू झाला. माझ्या मित्राची बहीणही बसची वाट पाहत थांब्यावर उभी होती. ती घरी परतलीच नाही म्हणून आम्ही अनेक ठिकाणी शोध घेतला. पण दुर्दैवाने तिचा मृतदेह सापडला. मृतदेहाचे खच, जागोजागी रक्त आणि विखुरलेले अवयव पाहून पुढील काही दिवस जेवण्याची इच्छा झाली नाही. सर्व मृतांचे चेहरे डोळय़ासमोर येत होते. निरपराध नागरिकांना मारणारे ३० वर्षे झाली, तरी मोकाट आहेत. यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. दरवर्षी १२ मार्चला ते आठवते आणि मन सुन्न होते.

त्या दिवशी.. आणि नंतर..
१२ मार्च १९९३. याच दिवशी मुंबई १२ बॉम्बस्फोटांनी हादरली. दुपारी १.३० वाजता शेअर बाजाराच्या २८ मजली इमारतीत पहिला स्फोट झाला. त्यानंतर पुढच्या दोन तासांत मुंबईतील नागरिकांच्या आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या घटनांची मालिकाच सुरू झाली. कुणी पहिल्यांदाच या स्फोटांच्या ठिकाणी कामासाठी किंवा फेरफटक्यासाठी आला होता, तर कुणी नेहमीच्या कार्यालयीन कामांत मग्न होता. स्फोटांनंतर त्या सगळय़ांचे आयुष्य या स्फोटांनी दाखविलेल्या भीषणतेने व्यापले. बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स पाकिस्तानातील कराचीतून आणण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले. कारवाया झाल्या. खटल्यातील काही दोषींना शिक्षाही झाल्या. पण १२ मार्च १९९३ पूर्वीच्या शहरातील सुरक्षिततेच्या भावनेला कायमचा तडा गेला.

आईला शेवटचे पाहूही शकलो नाही..
तुषार प्रीती देशमुख (पीडितेचे नातेवाईक)
सेंच्युरी बाजार येथे झालेल्या स्फोटात मी माझी आई गमावली. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. माझी आई प्रीती देशमुख त्यावेळी महालक्ष्मीवरून दादरला येत होती. ८५ क्रमांकाची बेस्टची बस तिने पकडली होती. सेंच्युरी बाजार येथे त्या बसच्या पुढे असलेल्या टॅक्सीत बॉम्बस्फोट झाला. त्यात तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी आईचा मृतदेह घरी आणला त्यावेळी मला तिला शेवटचे पाहताही आले नाही. कारण तिच्या शरीराचे तुकडे झाले होते. ते तुकडे एकत्र करून एका कापडात बांधून आणण्यात आले होते. त्या दिवसाच्या आधीचे आणि त्यानंतरचे जगणे यात एका स्फोटाने भीषण बदल करून ठेवला होता. गेली तीस वर्षे मी आईचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या साऱ्या कुटुंबाला या दु:खाचा विसर होऊ शकत नाही. इतक्या वर्षांनीदेखील स्फोट घडविणारा मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम याला अटक झालेली नाही. बॉम्बस्फोट घडवणारे जसे गुन्हेगार आहेत, तसे त्यांना मदत करणारेही तितकेच गुन्हेगार आहेत. १९९२ दंगलीप्रकरणी संजय दत्तला अटक झाली. त्याने त्यावेळी या सर्व कटाची माहिती दिली असती तर अनेक निरपराध नागरिकांचे प्राण वाचले असते. त्याच्यावर चित्रपटसृष्टीचे कोटय़वधी रुपये लागले असल्यामुळे त्याला शिक्षेत सूट देण्यासाठी अनेक जण पुढे आले. तसेच याकुब मेमनच्या फाशीच्या शिक्षेसाठी देशातील २७० प्रतिष्ठित व्यक्तींनी स्वाक्षरी केलेले पत्र राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवले गेले. त्यामुळे या सर्वाविरोधात पीडितांना मोहीम राबवावी लागली, ही दु:खद बाब आहे.

शरीरातल्या काचा खोलवर..

कीर्ती अजमेरा (पीडित)
शेअर बाजाराजवळील स्फोटामध्ये माझ्या शरीरात असंख्य काचा घुसल्या. पुढली सहा वर्षे गंभीर शस्त्रक्रियांना मला सामोरे जावे लागले. गेल्या ३० वर्षांमध्ये ४० हून अधिक शस्त्रक्रियांनी माझे शरीर पोखरले. तरी अद्याप शरीरातून संपूर्ण काचा काढण्यात अडचणी आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी आता वय वाढलेले असल्याने आणखी शस्त्रक्रिया करू नका असा सल्ला दिला. काचांच्या वेदना शरीरावर वागवतच पुढले आयुष्य काढावे लागणार आहे. त्या दिवशी मी कामानिमित्ताने शेअर बाजारात गेलो होतो. दुपारी सगळे काही शिरस्त्याप्रमाणे सुरू असताना स्फोट झाला. क्षणार्धात सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला दिसला. संपूर्ण मार्गात मृतदेह विखुरलेले दिसत होते. लोक जिवाच्या आकांताने पळत होते. मिळेल तिथे आसरा घेत होते. मदतीसाठी, मित्रांसाठी आक्रोश करीत होते. त्या सगळय़ा अंगावर येणाऱ्या दृश्यांमध्ये मी जिवंत असल्याची जाणीव झाली. पण शरीराच्या सर्व भागातून रक्त वाहत असल्याचेही वेदनेतून कळत होते. पोलिसांनी मला रुग्णालयात नेले. उजव्या बाजूचा चेहरा काचा घुसल्याने पूर्णपणे बिघडला होता. भूल दिल्याशिवाय या काचा काढाव्या लागणार, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर आधीच असह्य झालेल्या वेदनांचे काय, असा प्रश्न मनात आला. परंतु त्या वेदना सहन केल्या तर निदान चेहरा चांगला राहील या उमेदीने भूल न देताच केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेला सामोरा गेलो. त्यानंतरही शरीरात घुसलेल्या काचा काढण्यासाठी आयुष्यभर शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असे वाटलेही नव्हते. शस्त्रक्रियांची सवय झाली आहे आणि काचा शरीरात घेऊनच जगायचे आहे हेही मनाशी पक्के करून जगत आहे. एवढी वर्षे प्रयत्न करूनही सरकारकडून अद्याप भरपाई मिळाली नाही. घरातील दागिने या शस्त्रक्रियांवर खर्च झाले. पण शरीर आणि मन दोन्ही अजूनही अस्वस्थच राहिलेले आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulcer years remember in the city of mumbai terrorist attack through a series of bombings amy
First published on: 11-03-2023 at 12:00 IST