माझा एक ओळखीचा समीक्षक- मित्र मला भेटतो तेव्हा त्याच्या तोंडी पाच मिनिटांमध्ये पाचदा ‘पोस्ट-मॉडर्न’ आणि दहादा ‘जागतिकीकरण’ हे शब्द येतात. (सध्या त्याच्या जोडीला ‘निश्चलनीकरण’ ऊर्फ साध्या मराठीत ‘डीमोनेटायजेशन’ हाही शब्द असतो.) आणि हे त्याचे खास परवलीचे शब्द ऐकले की मला उगाचच आपणही गंभीर चेहऱ्याने चर्चा करायला हवी की काय असं वाटतं. पण अनेकदा पुष्कळ समीक्षकांची पोस्ट-मॉडर्न आणि जागतिकीकरण या जड शब्दांवर भिस्त असते.  एकतर त्या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत, हे खूपदा मराठीत विसरलं जातं. आणि जागतिकीकरण ऊर्फ ग्लोबलायझेशन ही नुसती अभ्यासायची गोष्ट नसून आपल्या सर्वाच्या जगण्याचं अंग झालेली गोष्ट आहे हेही विसरलं जातं.

आणि कवी! मराठीमध्ये जागतिकीकरणामुळे नव्या कवींची आणि कवितांची एक लाटच आली आहे! हे कवी शहरापासून दहा-वीस मैलाच्या अंतरावर असलेल्या निमशहरी खेडय़ात राहतात. (खेरीज त्यांचा- उदाहरणार्थ वारज्यात- वन बीएचके फ्लॅट असतोच.) त्यांच्या हातातल्या सॅमसंग एज सेव्हनवर ते स्टेजवर सेल्फी घेतात, त्याच फोनवर त्यांना फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पुढच्या गारगोटी, नाही तर बडनेऱ्याच्या कविसंमेलनाची निमंत्रणं मिळतात. यात वावगं काही नाही आणि वाईटही काही नाही. विचित्र हे आहे, की जागतिकीकरणाचे हे सारे फायदे (इंटरनेट, सेंटर-पेरीफेरी भेद मिटणं, खेळता पैसा) उपभोगताना त्यांच्या कविता मात्र केवळ काळ्या मातीच्या नॉस्टॅल्जिक कहाण्या सांगण्यात रमतात. त्या कवितांमध्ये येणारे वडाचे पार, शाकारलेली घरं, पेरलेली बियाणी, इ. गोष्टी टाळ्या घेत असल्या, तरी टाळ्या घेणारे आणि देणारे यांच्या डोळ्यांपुढे चकचकीत शहरी घरांची स्वप्नं असतात. आणि त्यांना फेसबुक/ व्हॉट्सअ‍ॅपचा पारच गप्पांसाठी सोयीचा असतो. विनायक येवलेनं त्याच्या ‘बम्र्युडा चड्डी घालून शीर्षांसन करणारा कवी’ या सॉलिड शीर्षकाच्या कवितेत अशा प्रवृत्तीवरच नेमकं बोटं ठेवलंय. विनायक येवलेची नजर ‘स्लीपवेलच्या नरम गादीवर बोलीभाषेचा शब्दकोश घेऊन उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या कविता’ लिहिणाऱ्या भंपक कवींकडे फार थेटपणे पोहोचत जाते. अर्थात, त्याच्या कवितेतही तो ‘रूरल रोमॅण्टिसिझम्’ आहेच. पण तो मला तरी फार सच्चा वाटतो. तो तात्त्विक पातळीवर पटेल- न पटेल; पण जागतिकीकरणाचा मराठी साहित्यावरचा नेमका परिणाम त्याच्या कवितेत दिसतो. ‘‘अंकल मला नवा डरेस घेतलाय.. आन् की नाई मव्हा बड्डे हाय. तुमी या मज्या बड्डेला’’ असं म्हणणारी चिमुरडी जागतिकीकरणामुळे मराठी बोलीभाषा इंग्रजीला कशी वळवून आपलंसं करते हे सहज त्या कवितेत दाखवते. ती ग्रामीण भागातली पाच वर्षांची मुलगी कवीला ‘अंकल’ संबोधते. ‘मव्हा बड्डे’ म्हणताना ती बर्थडेला बोलीभाषेतलाच शब्द बनवते आणि ‘डरेस’च्या मागणीत माझ्या त्या समीक्षक-मित्राला जागतिकीकरणाचा चंगळवाद तर नक्कीच दिसेल!

पण जागतिकीकरण हे ईहवाद, चंगळवाद, भोगवाद, आर्थिक विषमता आणि ग्लोबल प्रदूषण यापलीकडेही असतं. त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही छटा पुष्कळदा ढोबळ नसतात. आणि सुदैवाने नव्या मराठी साहित्यात त्या तितक्याच तरलपणे येताना मला दिसत आहेत. प्रणव सखदेवच्या भाषेत त्या छटा ‘सटल्’ता सांभाळत येत आहेत. Subtle  या इंग्रजी शब्दाला जसं सहज तो मराठी करतो, तसं त्याच्या एका कथेत जागतिकीकरणामुळे बदललेली नातीही कशी सहज समोर येतात. कथेच्या नायकाची बायको आणि मुलगी हे गावाला गेले आहेत. त्याचा त्यांच्यावर जीव आहे. त्याची पूर्वप्रेयसी (जी आता केवळ मैत्रीण आहे!) त्याच्या घरी तिची नवी चारचाकी दाखवायला येते आहे. तो सुकं चिकन आणि व्हिस्की घेतो आहे. आणि विलास सारंगांचं पुस्तक त्यानं वाचायला घेतलं आहे. आणि हे सारं होत असताना तो सतत एकीकडे व्हॉटस्अ‍ॅपवर ग्रुपचे मेसेज बघतो आहे; फेसबुकवर सारंगांचं पुस्तक- फोटो अपलोड करतो आहे, कामवाल्या बाईला निरोप सांगतो आहे. पुढे ती पूर्वप्रेयसी त्याच्याशी रत होऊ इच्छिते. तिला तो एकदाच हवा आहे आणि हीच संधी आहे. नायक बायकोला Missin u very mch lv u असा मेसेज पाठवतो आहे. आणि बायको   same 2 u! 🙂  असं लगोलग उत्तर पाठवते आहे. पुढे नायक आणि त्याची मैत्रीण रतीमग्न होतातही; पण तरी त्या मैत्रिणीला सारखं जाणवतं की- तो शरीरानं असला, तरी मनानं या कृतीत नाही. ‘‘माझं मन नको-हवंच्या मधे झुलत होतं.. पण माझं र्अध मन सारखं मोबाइलमध्ये गुंतलेलं होतं..’’ असं तो नायक स्वगत म्हणतो. आणि ती प्रेयसीही प्रणयक्रीडा चालू असताना म्हणते, ‘‘यू आर विथ निशा आणि मयू (बायको- मुलगी). आऽऽह. हो नाऽऽ? बट तुझा एक फ्रॅगमेंटही मला खुपेऽऽ.’’ जागतिकीकरणाचा प्रेमावर, नात्यावर होणारा परिणाम मराठीत शोधायचा असेल तर प्रणव सखदेवचं हे एक वाक्य नीट बघावं. ते ताकदीचं.. अर्थाच्या अनेक शक्यता बाळगणारं वाक्य आहे. त्यात नव्या पिढीची वैचारिक स्पष्टता आहे. तिला एक फ्रॅगमेंट पुरे आहे; तिला त्याचा संसार मोडायचा-बिडायचा नाहीच. त्यात मराठीमध्ये घुसलेला इंग्रजी ‘बट्’ आहे आणि तो भाषेचं टक्कर घेणं दाखवतो आहे. (जागतिकीकरणात भाषा टक्कर घेतात. काही तरतात; काही लोप पावतात; काही परकं भाषिक धन आपलंसं करून समृद्ध होतात. उदा. मराठी!) आणि त्या वाक्यामधला प्रणयक्रीडेचा उत्कर्षबिंदू दाखवणारा ‘आऽऽह’देखील नेमका आहे. तो निलाजरा नाही आणि उगा संकोच करणाराही नाही. खरं तर तो ज्या दोन विधानांमधोमध येतो त्यामुळे तो केवळ ऐंद्रिय नव्हे, तर बुद्धिगम्यही ठरतो!

जागतिकीकरणामुळे केवळ मोबाइल आले आणि त्यांची रेंज वाढली असं झालं नाही; त्यामुळे मनाची, माणसाच्या विचारांचीही रेंज वाढली. हातातल्या फोनवर जग दिसू शकतं. आणि टीव्हीवर परके सांस्कृतिक संदर्भ नित्य दृष्टीस पडत राहतात. ग्लोबल आणि लोकल हा संघर्ष मग नुसता संघर्ष राहत नाही. त्यातून ‘ग्लोकल’ मिश्रण तयार होते. मृणालिनी वनारसे हिच्या ‘प्रतीक’ कादंबरीमध्ये असलेली गावकरी तयार पोरं ‘ग्लोबल’ला वाकवून ‘लोकल’ करतात. ‘‘प्लॅस्टिकची पिशवी नाही? ही सुट्टी करवंदं कशात ठेवायची?’’ या प्रश्नावर कातकरी मुलं थोडं अडखळतात. पण प्रतीक गाडीपाशी जाऊन म्हणतो, ‘‘ प्लॅस्टिक ठेवत न्हाय. आमची करवंदं इको-फ्रेंडली आहेत.’’ यावरून आठवलं, मागच्या वर्षी ‘साहित्यसूची’च्या दिवाळी अंकामध्ये मी दीर्घ लेख लिहिला होता.

२०१४ च्या मध्यात आलेल्या तीन मराठी कादंबऱ्यांना मी जागतिकीकरणाच्या नजरेतून अभ्यासलं होतं.. ही ‘प्रतीक’, गणेश मतकरीची ‘खिडक्या अध्र्या उघडय़ा’ आणि माझी ‘मुळारंभ’! उत्सुकांना तो लेख नेटवरही मिळेल. पण त्यातले दोन धागे इथे आजच्या लेखाच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत म्हणून मांडतो. गणेशचं पात्र एकदा म्हणतं, ‘‘मी हे सगळे पिक्चर एकाच वेळी डाऊनलोडिंगला लावायला नको होते. तसाही मी कुठे एकाच वेळी बघणार होतो? पण हाव! सारे सिनेमे आपल्याला आपल्या एकटय़ाच्या मालकीच्या हार्ड डिस्कमध्ये आणण्याची हाव.. दुसरं काय?’’ हे वाक्य मोलाचं आहे. विशेषत: त्यातला ‘हाव’ हा शब्द. ती हाव पिक्चर्सची नाही, तर ‘पझेशन’ची आहे, हे गणेश अचूक दाखवतो. मृणालिनी वनारसेची नायिका मीनल म्हणते, ‘‘मी ना कधी कधी टोटल कॉन्झर्वेटिव्ह विचार करते बघ. अजून आई-वडिलांच्या घरी राहते ना! पण आपली ऐपत बघत कधी कधी कॉन्झर्वेटिव्ह असणं ठीक वाटतं मला.’’ हे वाक्यच इतकं बोलकं आहे! नवी चोख अर्थव्यवस्था, घरगुती नातेसंबंध, नव्या स्त्रीची लग्नाच्या संदर्भाखेरीजही निराळं, स्वतंत्र राहायची इच्छा हे सगळं त्यातून दृग्गोचर होतं. माझ्या ‘मुळारंभ’मधला ओम म्हणतो, ‘‘पण बदल हा असतोच. कधी जग तुम्हाला बदलवतं, तर कधी तुम्ही ताकदीचे असाल तर तुम्ही जगाला बदलवता. पण बदल नकोच असं म्हणायची मुभा नियतीनं ठेवलेली नाही!’’ ती मुभा आताशा नियती ठेवत नाही, कारण जागतिकीकरणामुळे जगण्याला आलेली गती त्या नियतीला ठाऊक आहे. ‘‘आणि एवढं सगळं असूनही अखेर या बाकडय़ावर आपण एकटेच. आपल्या सोबतीचं असं कुणीच नाही,’’ असंही ओम मधे म्हणतो. आणि मग मला तसाच हरवलेला ‘गोगोल’ आठवतो! तोच- झुंपा लाहिरीच्या ‘नेमसेक’चा नायक. तीन प्रेयस्या आणि माया करणारं घर पाठीशी असताना हरवलेला गोगोल एकटा नाही. जागतिकीकरणानं काही माणसं हरवतही गेलीच ना! विशेषत: आत्मविश्वास कमी असलेली. आसपास बघितलं तरी अनेक ‘गोगोल’ मला दिसतात. एकामागून एक प्रेमात पडत राहणारे; कुठल्याच प्रेमातून काही न शिकणारे; स्पर्शाला भुकेले असे ते भारतीय ‘गोगोल’! अर्थात्  झुंपा ही फारच समर्थ लेखिका आहे. गोगोलचे पालक हे वरिष्ठ पिढीचे असले तरी ते जागतिकीकरणाला त्यांच्या अंगभूत वृत्तीमुळे पटकन् सामोरे जातात; हरवत नाहीत. ‘अशीमा’ (अ-सीमा.. बंगाली वळण) ही नायिका कादंबरीच्या शेवटाला वेगळा निर्णय घेते. तिचा नवरा वारलेला असतो. मुलं अमेरिकेत वाढल्यानं अमेरिकन असतात. भारत कधीच लांबचा झालेला असतो. बोस्टनचं घर हेच अशीमाचं घर असतं. पण ते आठवणींनी संपृक्त असं घर ती विकायचं ठरवते. सगळ्यातून तिला जणू मोकळं व्हायचं आहे. काही महिने ती कोलकात्यात राहणार आहे; शास्त्रीय संगीत शिकू पाहणार आहे; कधी मुलांकडे अमेरिकेत त्यांच्या सवडीनं राहणार आहे; कधी भ्रमंती करणार आहे! झुंपाचं ते विलक्षण वाक्य आधी इंग्रजीत जसंच्या तसं देतो. ते पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझ्या अंगावर काटा आलेला : ‘‘True to the meaning of her name, she will be without borders, without a home of her own, a resident everywhere and nowhere.’’ स्थलांतराचे सारे जागतिक संदर्भ त्यात आहेत. आणि स्थलांतराच्या पुढची जाण- पोक्त जाणही तिथे आहे. त्या अशीमाला आता सीमा नाहीत, र्निबध नाहीत. तुटायचं ते तुटलं. बोचायचं ते बोचलं. कापायचं ते कापलं. आता कशाची भीती? आणि का? भयरहित, सीमारहित प्रांतात ही झुंपा आपल्याला नेते आहे!

जागतिकीकरणामुळे खरं स्थलांतरही झालंच वेगाने; पण आभासी मैत्रीही अस्तित्वात आल्या. पाऊल न उचलता तुम्हाला जग गाठता येऊ लागलं. साहित्यात तो मोकळा श्वास दिसतोच आहे आता. मराठीत चॅट-विंडोज, पोस्ट वगैरेंचे उल्लेख हे अनेकदा कृत्रिमरीत्या साहित्यात उपयोजलेले दिसतात. ते संदर्भ केवळ तंत्र म्हणून येतात; त्याची कला होताना अनेकदा दिसत नाही आणि मग ते ढोबळ बनतात. पण ‘टॉकिंग ऑफ जेन ऑस्टेन इन् बगदाद’सारखं पुस्तक वाचताना जाणवतं, की ई-मेल या गोष्टीमुळे बगदादमधली इंग्रजीची प्राध्यापिका आणि ब्रिटनमधला पत्रकार यांची देशापलीकडे जात मैत्री होते; संवाद साधतो. जागतिकीकरण नेहमी नकारात्मक नजरेनेच फक्त जेव्हा लोक न्याहाळतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं. हिणकस असंही त्यात आहेच; पण सशक्त असंही काही आहे. साधं आपलं रोजचं उदाहरण.. फेसबुकमुळे समानधर्मी भेटतात आपल्याला. अपरिचित असतानाही; एकदा न भेटताही मैत्र जुळतं. मोबाइलवर नुसतं टुक-टुक करणारे जाऊ देत. तसे निरुद्योगी सगळ्याच काळांत होते. ज्यांना वाढायचं आहे, विस्तारायचं आहे, त्यांना जागतिकीकरणाचं हे नेटरूपी अंग उपयोगी आहे. साहित्यात ते सगळं येतंय आता आता. ते साहित्याचा (मराठी साहित्य त्यात आलंच. आणि ते काही मरूबिरू घातलेलं नाहीये.) पोतच बदलतंय. त्या ‘नेमसेक’मध्ये एक वाक्य आहे- ‘‘उशी-पांघरूण गुंडाळा आणि जितकं जग बघता येईल तितकं बघा. तुम्हाला कधी त्याचा पश्चात्ताप होणार नाही.’’ ती ‘pack a pillow and blanket’’ची झुंपा-आज्ञा मी, तुम्ही, आपण सारे घरबसल्या पाळू शकतो आज. बूडही न हलवता त्या संगणकामध्ये आपण जग बघतो; जगही आपल्याला तिथे भेटत राहतं. अन् मग मर्ढेकर आठवतात! ‘‘शांत जगाच्या घामावरला, उडून काळा गेला वास!’’ ..ते जुनं वाडय़ातलं, शेतातलं वगैरे शांत जग आता गेलं! पण त्यासोबत ‘काळा वास’ही गेला. तो वास स्थितिशीलतेचा होता. आणि हे नवं जग आहे आता! त्यात आव्हानं आहेतच. पण मुळात ते स्वच्छ, निखळ, थेटदेखील आहे! प्रणवच्या त्या कथेतल्या  प्रणयी ‘आऽऽह’सारखं!

डॉ. आशुतोष जावडेकर ashudentist@gmail.com