संसदेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर विविध प्रश्नांवरून जोरदार हल्ला चढविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मंगळवारी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. पंतप्रधानांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी ही नेहमीच उच्च प्रतीची होती, असे जेटली यांनी म्हटले आहे.
डॉ. सिंग हे अत्यंत सभ्य गृहस्थ असून त्यांनी जे विषय हाताळले त्याची परिपूर्ण माहिती त्यांना होती. डॉ. सिंग हे राज्यसभेत सभागृहाचे नेते आहेत तर जेटली हे विरोधी पक्षनेते आहेत. गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधानांचा कारभार जवळून पाहण्याची आपल्याला संधी मिळाली. ते उत्तम अर्थमंत्रीही होते,  असेही जेटली म्हणाले. कलंकित लोकप्रतिनिधींबाबतचा अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडून टाकला तेव्हा त्यांना मुकाटय़ाने सर्व सहन करावे लागले. कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येताच किंवा टू-जी घोटाळ्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता पंतप्रधानांनी हे निर्णय रद्द केले असते तर इतिहासात त्याची वेगळीच नोंद झाली असती, असेही जेटली यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी गेल्या १० वर्षांपासून सरकारचे नेतृत्व केले असून आता ते सन्मानाने निवृत्त होत आहेत. ज्येष्ठ राजकीय मुत्सद्दी आणिमार्गदर्शन करणारे विश्वासार्ह मार्गदर्शक अशी त्यांची प्रतिमा कायम राहील, असेही जेटली यांनी म्हटले आहे.

काँग्रेस बळीचा बकरा बनवेल -जावडेकर
नवी दिल्ली:मतदानोत्तर चाचण्यांनंतर आता भाजपने काँग्रेसवर हल्ला चढविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टीकेपासून वाचविण्यासाठी काँग्रेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बळीचा बकरा करील, असे भाजपने म्हटले आहे.कामगिरी खराब झाली की त्याचे खापर इतरांवर फोडावयाचे आणि कामगिरी चांगली झाली की सोनिया आणि राहुल यांना श्रेय द्यावयाचे, हा काँग्रेसचा मंत्र आहे, असेही म्हटले आहे.