माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांचे भाजपमधील पर्व अस्तंगत झाले असून आता पक्ष व्यक्तिकेंद्रित विचारांच्या विळख्यात सापडला आहे, असे मत काँग्रेसच्या नेत्या आणि वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. वाजपेयी आणि अडवाणी पर्वाचा अस्त झाला असून पक्ष व्यक्तिकेंद्री झाला आहे आणि पक्षाला लबाड कोल्ह्य़ांनी घेरले आहे. यापूर्वी पक्षाचे सरकार होते आता मोदी सरकार झाले आहे, मोदी यांनी पतीधर्म पाळला नाही तर ते राष्ट्रधर्म कसा पाळणार, असा सवालही शुक्ला यांनी केला.भाजपमधील नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला असल्याने आपण ३२ वर्षांनंतर पक्ष सोडला. छत्तीसगडमधील विलासपूरमधून आपल्याला उमेदवारी देऊन काँग्रेसने वाजपेयी यांचा सन्मान केला आहे असे त्या म्हणाल्या.