भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या ‘राज’कारणामुळे पक्षातील दुसऱ्या फळीतील विशेषत बिहारमधील नेते अस्वस्थ आहेत. नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. राज भेटीचा वेगळा अर्थ काढला जावू नये यासाठी राज्य प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनाच उद्धव यांच्या भेटीसाठी धाडण्यात आले. रूडी बिहारमधून राज्यसभा सदस्य आहेत, हे विशेष
महायुतीच्या मतांमध्ये फूट पडू नये यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याची ‘राज’शिष्टाई गडकरी यांनी केली होती. त्यावरून शिवसेना व भाजप युतीत तणाव निर्माण झाला आहे. शिवाय, गडकरी-राज चर्चा निष्फळ ठरल्याने बिहारी नेते आपली अस्वस्थता बोलून दाखवत आहेत. राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी गडकरी यांनी पक्षनेतृत्वाशी चर्चा केल्याचा दावा केला जात असला तरी; या भेटीतून काहीही निष्पन्न न झाल्याने बिहारी नेते नाराज आहेत. बिहारमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी ‘येणारे दशक दलित व मागासवर्गीयांचे असेल’, असे विधान केले होते. या विधानामुळेही बरीच खळबळ माजली आहे.  एकीकडे मोदींच्या ‘त्या’ विधानाचे पडसाद उमटत असताना गडकरी-राज भेटीची चर्चा बिहारमध्ये सुरु झाली आहे. राज ठाकरे यांच्याशी जवळीक दिसल्याने बिहार व उत्तर प्रदेशमध्ये फटका बसण्याची भीती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.