‘जनमत चाचण्यां’मधून काँग्रेसचा पराभव होईल, असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात सरकारला अपयश आले, असे सांगत कमलनाथ, जयराम रमेश आणि सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक नेते पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्यावर फुटू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. राहुल हे आमचे नेते होते आणि या निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरीही तेच आमचे नेते राहतील. नव्हे, आघाडीवर राहून ते आम्हाला दिशा दाखवतील, अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी आपला पाठिंबा दिला.

हे कार्यकर्त्यांचे अपयश
राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशभर प्रचार दौरे केले, मात्र त्या दौऱ्यांचे विजयश्रीत रूपांतर करणे ही पक्ष संघटनेची-कार्यकर्त्यांची जबाबदारी असते. पराभव झाल्यास, गांधी कुटुंबीयांना नव्हे तर पक्ष संघटनेस जबाबदार धरावे लागेल, असा अभिप्राय केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी दिला.