भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विकासकामांची प्रशंसा केल्याने मनेका गांधी प्रचंड नाराज झाल्या आहेत. अमेठीच्या विकासकामांबाबत वरुणने केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असून, त्याने एखादे विधान करताना भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करावा, असे मनेका म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगली विकासकामे केली आहेत, असे विधान वरुण गांधी यांनी केले होते. मात्र गेल्या ४५ वर्षांत अमेठीमध्ये कोणतेही विकासकाम झालेले नाही, असे मत मनेका यांनी व्यक्त केले. वरुणने योग्य माहिती घेऊन विधान केलेले नाही. तो निरागस असून, त्याचे मन स्वच्छ आहे. त्यामुळे तेथील काही चांगल्या कामांची त्याने प्रशंसा केली. मात्र त्याने बोलताना भावनिक न होता बुद्धीचा वापर करावा, असा सल्ला मनेका यांनी दिला.