मुंबईत २००९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत वापरलेली पालिकेची वाहने आणि विविध इमारतींमधील कार्यालयांचे भाडे निवडणूक आयोगाने अद्यापही दिलेले नाही. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांवर नोटीस बजावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
२००९ च्या निवडणुकीत पालिकेने निवडणूक आयोगाला ६३ वाहने दिली होती. वाहनांचा प्रतिदिनी सरासरी खर्च दोन हजार रुपये होता. तसेच पालिकेच्या विविध इमारतींमधील जागा आयोगाला कार्यालयासाठी देण्यात आल्या होत्या. वाहने आणि जागेचे भाडे अद्याप आयोगाने भरलेले नाही. तसेच पालिकेचे चार ते पाच हजार कर्मचारी आयोगाच्या दिमतीला देण्यात आले होते. कोटय़वधी रुपयांच्या घरात असलेली थकबाकीची रक्कम आयोगाने तात्काळ भरावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी केले. ही रक्कम आयोग भरत नाही, तोपर्यंत पालिका आपली वाहने आणि आपल्या जागा वापरू देणार नाही, असे अडतानी यांनी स्पष्ट केले.

बॅनर्सवर आज कारवाई
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई बॅनर्समुक्त करण्याची मुदत १३ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण दिवसबर मुंबईतील बॅनर्स उतरविण्यात येतील. सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथके स्थापन करण्यात आली असून ही पथके दिवसभर कारवाई करतील.