जसवंत सिंह यांना भाजपने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण त्यांनी फडकावले होते. राजस्थानमधील बाडमेर मतदार संघातून जसवंत सिंह यांना अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. जसवंत सिंह यांची शेवटपर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. त्याला त्यांनी दाद दिली नाही. पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. ज्येष्ठ नेत्यांचा भाजपमध्ये सन्मान होत नसल्याचा आरोपही केला होता.

अँटनींबाबत मोदींच्या मताशी वेंकय्या नायडू असहमत
कोची:संरक्षणमंत्री ए.के. अँटनी पाकिस्तानचे हस्तक असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते वेंकय्या नायडू यांनी मोदींच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. अँटनी आपले मित्र आहेत. ते पाकिस्तानचे हस्तक नाहीत, अशा शब्दांत मोदींच्या वक्तव्याला त्यांनी चपराक लगावली. मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ माध्यमांनी लावला, असे नायडू म्हणाले.
दरम्यान मोदी यांनी आपल्यावर टीका केली असल्याने आपल्याला वेदना झालेल्या नाहीत, मात्र अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सशस्त्र दलाचे खच्चीकरण होऊ शकते आणि त्याचा लाभ शत्रूला होऊ शकतो, असे अ‍ॅण्टनी यांनी थिरुअनंतपुरम येथे पत्रकारांना सांगितले. अ‍ॅण्टनी हे पाकिस्तानचे हस्तक असून भारताचे शत्रू आहेत, अशी टीका मोदी यांनी केली होती.शत्रूला  लाभ  होईल, असे वक्तव्य देशभक्त करणार नाही, असे अ‍ॅण्टनी यांनी म्हटले आहे.

भाजपचे राजकारण फुटीरतावादी -पंतप्रधान
खुमताई (आसाम):भाजप फुटीरतावादी राजकारण करीत असून अशा प्रकारचा पक्ष देशाचा विकास करू शकणार नाही, असा हल्ला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी चढविला.जो पक्ष फुटीरतावादी राजकारण करतो तो देशाचा विकास करू शकणार नाही. भारत विविध प्रकारची संस्कृती, भाषा, धर्म असलेला देश आहे आणि भाजप फुटीरतावादी राजकारण करीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.जोरहाट लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बी. के. हांडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत डॉ. सिंग बोलत होते.

दोनच मतदारांचे केंद्र
इटानगर : अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्य़ात मालोगाव येथे केवळ दोन मतदारांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जवळपास आठ मतदान केंद्रे १०हून कमी मतदारांसाठी, २० मतदान केंद्रे २० हून अधिक मतदारांसाठी आणि १०५ मतदान केंद्रे ५० हून अधिक मतदारांसाठी उभारण्यात आली आहेत. अरुणाचल प्रदेशात एकूण २१५८ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून त्यापैकी ६६४ ही अत्यंत दुर्गम भागांत आहेत. अरुणाचल प्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या ६० जागांसाठी ९एप्रिल रोजी मतदान होणार आहे.