महाराष्ट्राच्या अनेक व्यथा आहेत. राज्यातील एकही खासदार त्याविषयी संसदेत ब्र काढायला तयार नाही. या व्यथांचा आवाज दिल्लीश्वरांच्या कानात घुमवण्यासाठी मनसेचे खासदार दिल्लीला जाणार आहेत. ज्यांना गुजराती अस्मिता कळते. त्यांना महाराष्ट्राची अस्मिता नक्कीच कळेल, असा ठाम विश्वास असल्याने, आपण नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात स्पष्ट केले.
मनसेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या कळवा येथे सभेसाठी ते आले होते. महाराष्ट्रात नागरी विकासाचे अनेक प्रश्न आहेत. विकासाच्या प्रश्नावर इतर प्रांतामधील खासदार एकजुटीने संसदेत आवाज उठवतात. तसे चित्र महाराष्ट्रातील खासदारांमध्ये दिसून येत नाही. राज्यातील विविध प्रश्न संसदेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मनसेने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे राज ठाकरे यांनी सांगितले.  परप्रांतीयांचे लोंढे भरभरून महाराष्ट्रात दररोज येतात. त्यामुळे राज्यातील नोकऱ्यांवर त्यांचे आक्रमण होत आहे असा आरोप त्यांनी केला.