मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्राची वाट लावायची आहे, असे टीकास्त्र सोडत ‘त्यांना स्वतच्या चेहऱ्यावर मते मिळत नसल्याने ते पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुखवटा घालायचे आणि आता नरेंद्र मोदी यांचा घालत आहेत, असा टोलाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरे व नितीन गडकरी यांची भेट आणि मनसेने प्रामुख्याने शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केल्याने उध्दव ठाकरे संतप्त आहेत. विधानपरिषद निवडणुकीत राहुल नार्वेकर यांच्या माघारीसंदर्भातही ‘प्रसिध्दीमाध्यमांनी विपर्यास केला, मी लवकरच खुलासा करणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप मावळचे गजानन बाबर यांनी केला आहे, तो ठाकरे यांनी फेटाळून लावला. उमेदवारी न दिल्याने ते आरोप करीत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.