गुजरातचा विकासदर काँग्रेसच्या सत्तेच्या काळात १७ टक्क्यांवर होता. नरेंद्र मोदींच्या काळात हा विकासदर ८ टक्क्यांवर घसरला असल्याने गुजरातच्या विकासाचे मॉडेल देशासाठी निश्चितच घातक असल्याची टीका करताना, विरोधकांनी कांद्याच्या अन् वेळप्रसंगी कवडय़ाच्या माळा जरी घातल्या तरी, शेतमालाला उच्चांकी दर मिळवून देण्याची आपली भूमिका कायम राहणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली. विकासात महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात मागेच असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या मुद्दय़ावर आमने-सामने येण्याचे दिलेले आव्हान मोदी का स्वीकारत नाहीत असा सवाल त्यांनी केला.
सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पालकमंत्री शशिकांत शिंदे, सभेचे निमंत्रक आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सारंग पाटील यांची उपस्थिती होती.
पवार म्हणाले, की मताचा पत्ता नाही तोवरच पंतप्रधानपदासाठी मोदींची उमेदवारी जाहीर करणे म्हणजे सत्तेचे केंद्रीकरणाचा प्रयत्न आहे. मोदी दोन्ही गुडघ्यांना बाशिंग बांधून तयार आहेत. टीव्ही लावला की, पांढरी दाढी आणि मोदीच मोदी आणि भाजपचे नेते तर मोदी म्हणूनच झोपेत चावळत आहेत. त्यांची काँग्रेसमुक्तीची भूमिका म्हणजे ज्या काँग्रेसने संघर्ष करून, इंग्रजांना पिटाळले, अशा काँग्रेसला मुक्त करण्याची भूमिका कितपत योग्य आहे, स्वातंत्र्य लढय़ात संघ आणि भाजपवाले होते का? मोदींना देशाचा इतिहास माहिती आहे का? चलेजावचा नारा कुठे देण्यात आला हेही मोदींना माहिती आहे का? असे प्रश्न उपस्थित करून स्वातंत्र्याचा इतिहास अहमदाबादमध्ये घडल्याचे मोदी सांगत नाहीत, हे नशीब असल्याची टीका पवारांनी केली.