माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी हीन दर्जाचे राजकारण करत असून, हे राजकारण त्यांना आणि राष्ट्रीय राजकारणाला शोभणारे नाही, असे शरसंधान सोनिया यांनी केले.
मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श घ्यावा. वाजपेयींसह अन्य माजी पंतप्रधानांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवली. मात्र राजीव गांधी यांच्यावर टीका करून मोदी यांनी आपण या पदाला लायक नसल्याचे दाखवून दिले आहे. राजकारणात क्षुल्लक मुद्दे आणून मोदी हीन पातळीचे राजकारण करत आहेत, असे सोनिया म्हणाल्या. राजीव गांधी ज्या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते, त्या वेळी त्यांनी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा जाहीर अवमान केला होता, अशी टीका मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेठी येथील सभेत केली होती.