पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत या टीकेला केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले असून आमचे एनडीए सरकार कामातूनच बोलेल असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याच्या टीकेवर त्या म्हणाल्या की, प्रत्येक क्षण्ी आमचे काम बोलते. कामाशिवाय कुणीही वेगळे काही बोलण्याची गरज नाही. गेल्या आठवडय़ात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी हे मौनी पंतप्रधान असल्याची टीका केली होती व ते एकाधिकारशाहीने वागतात ते लोकशाहीसाठी बरे नाही असेही चव्हाण म्हणाले होते. मेनका गांधी म्हणाल्या की, न बोलणे हे काही वाईट नाही, चव्हाण यांच्या वक्तव्याकडे आपण टीका म्हणून पाहात नाही. मनमोहन सिंग वीस वर्षांत बोललेच नाहीत. मोदी मंत्र्यांकडून काम करून घेत आहेत व आमचे कामच बोलते.  आपले पुत्र वरुण यांच्या राजकारणातील प्रगतीबाबत काय वाटते असे विचारले असता त्या म्हणाल्या की, तो चांगली वाटचाल करीत आहे, तो दुसऱ्यांदा खासदार झाला आहे. तो खूप वाचतो, वृत्तपत्रात लेख लिहितो, त्याच्याकडे भरपूर माहिती असते व त्याच्या प्रगतीबाबत आपण समाधानी आहोत.