बिगर भाजप आणि बिगर काँग्रेसी नेत्यांची मोट बांधून तयार करण्यात आलेली तिसरी आघाडी काँग्रेसचे हितसंबंध जोपासणारीच आह़े  ही आघाडी देशाचे काहीही भले करू शकत नाही, असा थेट आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे केला आह़े
येथे सोमवारी पक्षाच्या प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि तिसऱ्या आघाडीचे मुख्य प्रवर्तक नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला़  सहा महिन्यांपूर्वी तुम्ही तिसऱ्या आघाडीबद्दल ऐकले होते का? ही आघाडी निवडणुकांच्या तोंडावर अस्तित्वात आली़  ही निवडणुकांची खराबी करू शकेल़  परंतु, देशासाठी काही चांगले करू शकणार नाही, असेही मोदी म्हणाल़े
भाजपसाठी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे की, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या कल्याणासाठी कार्य करण़े  परंतु, इतर पक्षांनी मात्र धर्मनिरपेक्षतेचा ‘मोदींना सत्तापदी पोहोचण्यापासून रोखणे’ असा संकुचित अर्थ घेतला आहे, अशी टीकाही मोदींनी केली़  तसेच नितीश कुमार यांच्या विकासाच्या दाव्यांवरही त्यांनी टीका केली़  बिहारमध्ये केवळ २३ टक्के लोकांच्या घरी शौचालये आहेत, अशी माहिती त्यांनी दिली़

पासवान – मोदींची पहिलीच सभा
रालोआमध्ये नव्याने सहभागी झालेल्या रामविलास पासवान यांच्यासह सोमवारी पहिल्यांदाच मोदींनी सभा घेतली़  पासवान त्यांचे पुत्र चिराग यांच्या उपस्थितीत मोदींनी नितीश कुमारांना सातत्याने लक्ष्य केल़े  बिहार हे दहशतवाद्यांसाठी मोकळे रान झाले आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, ‘पासवान यांच्याशी वैचारिक मतभेद असूनही त्यांनी कधीही बैठकांमध्ये आपल्यासोबत छायाचित्रे काढून घेण्याची भीती बाळगली नाही़ ’ पासवान यांनीही या वेळी मोदींवर स्तुतिसुमने उधळली़  मोदी गरीब कुटुंबात जन्माला आले आहेत़  ते राजकीय अस्पृश्यतेला बळी पडले आहेत़  परंतु, लवकरच ते सत्तापदी विराजमान होतील आणि वर्षभरानंतर असा कोणताही समुदाय राहणार नाही जो मोदींना त्यांचा नेता मानणार नाही, असे पासवान या वेळी म्हणाल़े