वर्ध्यातील सभेपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज सेवाग्रामच्या महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट देऊन महात्माजींच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर व सचिव डॉ.श्रीराम जाधव यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यातून नरेंद्र मोदी यांना नक्षलवादावर महात्मा गांधींचा मार्ग हेच उत्तर असल्याचे सूचित करण्यात आले. भारतासह सर्व जग आज सांप्रदायिकता, जागतिक तापमान व पर्यावरण हानीने त्रस्त आहे. त्याचे निराकरण करण्यात भारतातील विद्यमान सरकार, त्यांचे सहयोगी, तसेच विरोधी पक्षही अपयशी ठरले आहेत. धर्मवादी, नक्षल व माओवादी विचारप्रणाली ताकदीने पुढे येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या राजकीय पक्षांना त्या पाश्र्वभूमीवर सावधान राहण्याची गरज आहे.  बापूंनी दाखविलेल्या मार्गावर चालणेच क्रमप्राप्त ठरते, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे व सेवाग्राम आश्रमचे कार्यकर्ते उपस्थित होते.