काही बडय़ा उद्योगसमूहांवर मेहेरनजर करण्यात आल्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी ओदिशातील काँग्रेस आणि भाजप या विरोधी पक्षांनी केली आहे. उद्योगसमूह उभारण्यासाठी काही बडय़ा समूहांना सरकारी जमीन भाडय़ाने देण्यात आली होती ती जमीनच  बँकेकडे गहाण ठेवून मोठय़ा प्रमाणावर कर्ज मिळविण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले असून हा महाघोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला आहे.
राज्य सरकारच्या औद्योगिक पायाभूत विकास महामंडळाने १२ प्रवर्तकांना विविध वित्तीय संस्थांकडून ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी सरकारी जमीन गहाण ठेवण्याची अनुमती दिली, असा ठपका ‘कॅग’ने ठेवल्यानंतर विरोधी पक्षांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.
‘कॅग’ने उघड केलेला हा महाघोटाळा असून त्यावरून बीजेडी सरकार हे सर्वसामान्यांसाठी नव्हे तर बडय़ा उद्योगपतींसाठी अनुकूल असल्याचे सिद्ध होते.