लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच बुधवारी होणार असून त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. सात राज्यांमधील लोकसभेच्या ६४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण १७३७ उमेदवार असून जवळपास १८.४७ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राहुल गांधी, वरुण गांधी, केंद्रीय मंत्री बेणीप्रसाद वर्मा, रामविलास पासवान, राबडीदेवी, राजीव प्रताप रुडी  रिंगणात आहेत.
सीमांध्रमध्ये विधानसभेसाठीही निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्यामध्ये तेलगु देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी, केंद्रीय मंत्री के. सी. देव, एम. एम. पल्लम राजू, पनाबाका लक्ष्मी आणि माजी मंत्री डी. पुरंदेश्वरी यांचे भवितव्य ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत म्हणजेच २००९ मध्ये या ६४ जागांपैकी जवळपास निम्म्या म्हणजे ३१ जागा जागा काँग्रेसने तर केवळ पाच जागा भाजपने पटकाविल्या होत्या. मात्र या वेळी ही निवडणूक काँग्रेसला अडचणीची ठरणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

६४ जागांसाठी झुंज
* सीमांध्रमध्ये २५
* उत्तर प्रदेशातील १५
*बिहारमधील सात
* पश्चिम बंगालमधील सहा,
* उत्तराखंडमधील पाच,
* हिमाचल प्रदेशातील चार आणि जम्मू-काश्मीरमधील दोन जागा
सीमांध्रमधील विधानसभेच्या १७५ जागांसाठीही उद्याच मतदान.