भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग असमर्थ ठरल्याने त्यांच्या सरकारची कामगिरी खालावली आणि नरेंद्र मोदी व अरविंद केजरीवाल यांचा उदय झाला, असे पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी नमूद केल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची लक्षणे दिसत आहेत.
तथापि, बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी पंतप्रधानांनी कठोर पावले उचलली असती तर त्यांचे सरकार कोसळले असते. द्रमुक आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासारखे घटक पक्ष असल्याने अनेक बाबी पणाला लागल्या होत्या, असेही बारू यांनी म्हटले आहे.
आपण स्वत: प्रामाणिक आहोत, या दृष्टिकोनातून जनता आपल्याकडे पाहते आणि आरोप अन्य लोकांवर होत आहेत, असा डॉ. सिंग यांचा विश्वास होता. त्याबाबत आपण काय करणार, असा पंतप्रधानांचा सवाल होता, असे बारू यांनी डॉ. सिंग यांच्या हवाल्याने स्पष्ट केले.
यूपीए-२ मध्ये पंतप्रधानांना यश मिळाले असते तर अरविंद केजरीवाल यांचा उदयच झाला नसता. पंतप्रधान सक्षम आहेत आणि मध्यमवर्गीयांच्या पिढय़ांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे, असेही बारू यांनी त्यांच्या ‘दी अ‍ॅक्सिडेण्टल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अ‍ॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावरील चर्चेच्या वेळी सांगितले.