अन्न सुरक्षा कायद्यामुळे राजकीय लाभ होईल, असे चित्र उभे केले गेले. पण यासह अनेक लोकोपयोगी योजनांचा फारसा राजकीय लाभ निवडणुकीत झालेला दिसत नाही, असा सूर मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी लावला.
अन्न सुरक्षा योजनेचे आम्ही प्रचार सभांमध्ये गोडवे गायले, पण लोकांकडून त्यावर काहीच प्रतिक्रिया उमटत नव्हती, याकडे एका मंत्र्याने लक्ष वेधले. आरोग्य जीवनदायी योजनांच्या माध्यमातून राज्यात लाखांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. शासनाने विविध ५५ योजना राबविल्या असून, त्याची जाहिरातबाजीही करण्यात आली. पण या साऱ्यांचा कितपत उपयोग झाला, असा सवाल काही मंत्र्यांनी उपस्थित केल्याचे समजते.
सरकारी योजनांचा २००९च्या निवडणुकीत चांगला राजकीय फायदा झाला होता. यंदा मात्र योजनेचा तेवढा फायदा झाला नाही, असा सत्ताधारी काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.