काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या जाहीर सभेत मोदी यांच्यावरच हल्ला चढविला. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्याचप्रमाणे काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या योजनांचे श्रेय मोदी लाटत आहेत, असेही गांधी म्हणाले.नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळून राहुल गांधी यांनी त्यांची तुलना हिटलरशी केली. मोदी एकीकडे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्र्यांनाच स्थान दिले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.गुजरातमध्ये कोणत्या प्रकारची चौकीदारी सुरू आहे, शेतकऱ्यांकडून लाखो एकर जमीन बळकावून ती बडय़ा उद्योगसमूहांना दिली जात आहे. शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा आवाज दडपला जात आहे. शेतकऱ्यांची जमीन लाटणे ही चौकीदारी आहे का, याला चोरी म्हणतात, चौकीदारी नाही, असेही ते म्हणाले.