आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू असताना रिपब्लिकन पक्षात मात्र शांतता आहे. केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो, त्यात पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांचा समावेश होणार की नाही, एवढीच सध्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांच्यात खल सुरू आहे. कुणी किती अधिक जागा लढवायच्या यावर चर्चा रंगत आहे. त्या पाश्र्वभूमीवर रिपब्लिकन पक्षात मात्र सामसूम आहे. गेल्या महिन्यात आठवले यांनी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपकडून पक्षाला २५ ते ३० जागा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली. परंतु कोणत्या जागा लढविणार, त्याची तयारी कशी करणार, यावर कसलीही चर्चा झाली नाही. केंद्रात मंत्रिमंडळाचा कधी विस्तार होणार, त्यात आठवले यांना मंत्रीपद मिळणार की नाही, याबद्दल मात्र नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत चर्चा आहे. आठवले सध्या परदेशात आहेत.