शिवसेना-भाजप युती भक्कम असून लोकसभा निवडणूकच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूकही महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहोत, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला असला तरी जेथे मनसेचा उमेदवार महायुतीच्या विरोधात लढेल तेथे भाजप ताकदीने त्यांना विरोध करेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची घोषणा जरी राज यांनी केली असली तरी लोकसभा निवडणूक लढविण्याचीही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मनसे जर महायुतीविरोधात उमेदवार देऊन लढणार असेल तर ती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मदतच ठरेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळेच काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याची विनंती केली होती. राज यांनी उमेदवार जाहीर केल्यामुळे आता ज्या ठिकाणी मनसे शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात लढेल तेथे भाजप सर्वशक्तिनिशी शिवसेनेला मदत करेलस असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि भाजपमध्ये राज यांच्या भूमिकेवरून कोणतेही गैरसमज नाही. उलट युती अधिक मजबूत झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेणार-राजनाथ
नवी दिल्ली:नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या जागांबाबत भाजपमध्ये वाद सुरू असतानाच याबाबत अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेणार आहे. वाराणसी आणि लखनौच्या जागांवरून ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी आणि लालजी टंडन हे नाराज असल्याचे वृत्त आहे. याबाबत अंतिम निर्णय निवडणूक समिती घेईल, असे सांगत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.