राहुल गांधींमधील पतंप्रधान बनण्याच्या क्षमतेबद्दल कॉंग्रेसच्या नेत्यांमध्येच विश्वास नाही, या शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी बुधवारी कॉंग्रेसवर हल्ला चढविला. इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वालाच लक्ष्य केले.
यावेळी अमेठीमध्ये इतिहास घडणार आहे. राहुल गांधी ही निवडणूक हरतील. अमेठीतील लोकांनी आपला निश्चय केला आहे, असे इराणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मतदारसंघात राहुल गांधीच आपले मुख्य प्रतिस्पर्धी असतील. आपचे कुमार विश्वास यांच्याशी आपली स्पर्धाच होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी इराणी यांनी पक्ष कार्यालयात पूजा आणि होमहवन केले. त्यानंतर अमेठीतून रॅली काढून त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्या. यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते.