अमेठीतील एका मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आणि प्रियांका गांधी यांच्या जनसंपर्क अधिकारी(पीआरओ) प्रीती सहाय आमने-सामने आल्या असता, मतदारांना प्रभावीत करण्याचा सहाय प्रयत्न करत असल्याच्या इराणी यांच्या आरोपावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
प्रियांका गांधींच्या ‘पीए’ प्रीती सहाय अमेठीतील मतदार नसूनही त्या मतदान केंद्रावर आल्या आणि मतदारांना काँग्रेसला मत देण्यासाठी प्रभावीत करत असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. नियमांनुसार येथील मतदार नसलेल्या नागरिकांना जिल्हा सोडण्याचे आदेश असूनही प्रीती सहाय मतदान केंद्रावर आल्याची तक्रार इराणींनी निवडणूक आयोगाकडे केली असता प्रीती सहाय यांना त्वरीत अमेठी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
स्मृती इराणी यांचे जनसंपर्क अधिकारी अशोक पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “स्मृती इराणी जेव्हा २१०, २११ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर गेल्या असता त्यांना तेथे प्रियांका गांधी यांच्या पीए प्रीती सहाय दिसल्या. त्यांच्याकडे जाऊन निवडणूक केंद्रावर येण्याच्या परवानगीच्या प्रतीबद्दल(पास) विचारले असता सहाय यांनी नकार दिला. सहाय या येथील मतदार नसल्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर उपस्थित राहता येऊ शकत नाही. त्यानुसार आम्ही निवडणूक आयोगकडे तक्रार केली.”