अमेठी आणि रायबरेली या नेहरू-गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांना लागूनच सुलतानपूर मतदारसंघ येतो. भाजपचे सरचिटणीस ३४ वर्षीय वरुण गांधी यांच्या उमेदवारीने तो यावेळी चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे वरुण यांचे वडील संजय गांधी यांचे जुने मित्र असलेले संजय सिंह २००९ मध्ये येथून निवडून आले. या वेळी त्यांच्या पत्नी अमिता यांचा सामना वरुण यांच्याशी आहे. समाजवादी पक्षाचे शकील अहमद आणि बसपचे पवन पांडे हेही रिंगणात आहे. भाजप, बसप आणि काँग्रेस यांना आलटून-पालटून येथील जनतेने संधी दिली आहे. त्याामुळे कुठल्या एका पक्षाचा शिक्का या मतदारसंघावर नाही. वरुण यांनी त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक पिलभीत मतदारसंघ सोडून सुलतानपूरमधून नशीब अजमावयाचे ठरवले आहे. अर्थात गांधी आडनावाचा करिष्मा वरुण यांच्या कामी येण्याची चिन्हे आहेत. चुलतभाऊ राहुल गांधी यांची केलेली स्तुती नंतर प्रियंका यांनी केलेली टीका. त्यावर वरुण यांच्या आई मनेका यांनी दिलेले उत्तर या सगळ्या गोष्टींमुळे हा मतदारसंघ वादाचा केंद्रबिंदू ठरला. एकंदर वातावरण पाहता वरूण यांना गांधी घराण्याचा फायदा मिळण्याची चिन्हे आहेत.

*भाजपचे तरुण पिढीतील प्रमुख नेते, आक्रमक वक्तृत्व, प्रश्न समजावून घेण्याची हातोटी
* सरकार आल्यास महत्त्वाचे पद मिळण्याच्या शक्यतेने सहानुभूती
*या परिसरात भाजपचे संघटन कमकुवत
*काँग्रेसच्या उमेदवाराचे मतदारसंघात काम

*या विभागात बरेच वर्षे कार्यरत असल्याचा फायदा
*वरुण बाहेरचे उमेदवार असल्याचा जोरदार प्रचार
*प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका शक्य
*वरुण यांचे पक्षातील स्थान पाहता काँग्रेसच्या प्रचारात अडचणी