उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह मंत्र्यांनी आणि सनदी अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत कारभार सुधारावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा सज्जड दम समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलताना खुशमस्कऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका असा सल्ला अखिलेश यांना देत सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा आपण घेतला नसला तरी ते काय करतात हे मला माहीत आहे. सरकारपेक्षा पक्ष मोठा आहे. हे सरकार पक्ष कमकुवत करत आहे अशा शब्दात मुलायमसिंहांनी हल्ला चढवला. यापूर्वीही मुलायमसिंह यादव यांनी सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. काही जण मला फसवण्याचा प्रयत्न करत असून, तरीही आपण मंत्री राहू अशा भ्रमात ते आहेत असा टोला मुलायमसिंहांनी लगावला. अधिकाऱ्यांनी झटपट निर्णय घ्यावेत, जनतेला मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी निर्णय व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.