१९८० पासून सातत्याने गांधी घराण्याचा परंपरागत ‘मतदारसंघ’ म्हणून अमेठी ओळखला जातो. क्षारयुक्त असल्यामुळे कृषी क्षेत्रासाठी फारशी उपयुक्त नसणारी जमीन आणि एकही मोठा उद्योग नसल्यामुळे काँग्रेसच्या ‘अग्रघराण्या’शी एकनिष्ठ राहण्यातच आपलं हित असल्याची येथील मतदारांची भावना आहे. त्यातच राजीव गांधी यांची दिल्लीत असतानाही या मतदारसंघाशी असलेली बांधीलकी आणि निष्ठा याचाही मतदारांवर प्रभाव आहे. मात्र देशातील काँग्रेसविरोधी जनभावनेचे प्रतिबिंब १९९८ साली येथेही उमटले होते आणि जागा भाजपला मिळाली होती. त्यामुळे यंदा काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. येथे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, आपचे कुमार विश्वास आणि भाजपच्या स्मृती इराणी अशा तिरंगी लढत असली तरी प्रामुख्याने आप व काँग्रेस यांच्यात खरी टक्कर आहे. २० टक्के मुस्लीम मतदारांची पक्षनिष्ठा हा काँग्रेससाठी मुख्य मुद्दा असला तरी विकास, मोदींची लाट, कुमार विश्वास यांचा प्रचार व जन यात्रा यांनी रंगत आणली आहे.
राहुल गांधी

१९८० पासून सातत्याने काँग्रेसनिष्ठ मतदारसंघ आणि प्रियंका गांधी यांचा प्रचार
राजीव गांधी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाबद्दल असलेली आत्मीयता
अवधी या बोलीभाषेतून संवाद साधण्यात आलेले अपयश
दिल्लीत असताना मतदारसंघाकडे ते स्वत तसेच अन्य काँग्रेस नेते न फिरकणे

कुमार विश्वास
युवकप्रिय कवी आणि भ्रष्टाचारविरोधी लढणारे धर्मनिरपेक्ष व्यक्ती अशी प्रतिमा
काँग्रेसतर्फे आपल्याला गृहीत धरले जात असल्याची जनभावना
आम आदमी पक्षातर्फे केजरीवालांसह एकही ‘स्टार’ प्रचारक न येणं
संघ व लष्कर-ए-तय्यबाची तुलना करणे, आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल.

भाजपच्या स्मृती इराणी यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी अमेठीत स्वत सभा घेतली असून इराणी यांचा भरही प्रचारफेऱ्यांवर आहे. लोकांच्या मनांत असलेली काँग्रेसविरोधी भावना, १९९८ मधील भाजप अनुकुल इतिहास आणि आम आदमी पक्षाकडून प्रचारासाठी कोणीही न येणे हे स्मृती यांच्या पथ्थ्यावर पडेल अशी चिन्हे आहेत.